Wednesday, November 14, 2007

गर्ता

सर्व वाचकांना आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी आणि येते नववर्ष सर्वांना मजेचे, आनंदाचे आणि मनस्वी जावो.

मनोगताच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथेची लिंक देत आहे. दिवाळीच्या फराळाचा अस्वाद घेता घेता जरूर वाचावी.

http://www.manogat.com/diwali/2007/node/27.html

अंक जमून आला आहे असे वाटले. जमल्यास जरूर वाचावा.

- कोहम

Friday, November 02, 2007

घर असावे घरासारखे

फुललेल्या गुलाबांवरून नजरेला बळजबरीने खेचतच मी घरात शिरतो. लाल, पिवळे आणि पांढरे गुलाब. त्याच्या सोबतीने, कसली माहीत नाही, पण पांढरी फुलं पिवळा मध्य असलेली. कुंपणाशेजारी फुललेली जास्वंद आणि जमिनीवर गवताचा हिरवा गालिचा. म्हणजे, नजर जाताक्षणी पायताण बाजूला काढून अनवाणी चालावसं वाटायला लावणारा.

आतमध्ये गेल्यावर दिसताक्षणी लक्ष वेधून घेतं ते समोरच्या मोठ्या भिंतीवर लावलेलं पेंटिंग. नदीकाठी असलेली एक सुंदर झोपडी. भिंतीच्या शेजारी ओपन प्लान किचन, त्यातला ओव्हन नवा कोरा. भिंतीच्या दुसऱ्या बाजूला चढत जाणारा जिना, वर दोन बेडरुम्स, समोर प्रशस्त बाल्कनी. बाल्कनीतून लक्ष वेधून घेणारं एक झाड आणि झाडाच्या सर्वात वरच्या खोबणीत मॅग्पाइ चं घरटं. त्यातली काळी पांढरी पिल्लं स्पष्ट दिसतायत. वाह! घर असावं तर असं.

असं म्हणजे कसं? सुंदर बाग असलेल्या ह्या घरासारखं की चित्रातल्या त्या नदीबाजूच्या झोपडीसारखं की समोरच्या घरट्यासारखं?

कही गोष्टी आपण किती गृहित धरतो नाही? घर ही त्यातलीच एक गोष्ट. जन्माला येताना आपल्याला घराचा चॉइस असतो का? नाही. जिथे आपण जन्मतो ते आपलं घर.

माझं घर कसं? बाग असलेल्या घरासारखं नाहीच नाही. झोपडीसारखं? असेलही पण तितकसं निसर्गरम्य वगैरे काही नाही. मग घरट्यासारखं? असेल कदाचित ह्या समोरच्या घरट्यासारखंच असेल.

आभाळ पेलती पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी....पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे.

हं. माझ्या हया आवडत्या ओळी होत्या एके काळी. अजूनही आहेत. ही पूर्ण कल्पनाच किती रोमॅन्टिक आहे ना? जगाच्या दृष्टीने यःकश्चित असणारा बाप, आभाळासारख्या समस्या आपल्या खांद्यावर पेलतो पण त्याचं घरटं मात्र सुरक्षित ठेवतो. म्हणून जगाच्या दृष्टीने यःकश्चित असलेली व्यक्ती, घराच्या नजरेत बाप असते.

असं होतं का माझं घर? होतं. आभाळ पेलणाऱ्या पंखांखाली सुरक्षित असलेलं. होतं का? अजूनही आहे. पण पंखाच्या संकल्पना बदलल्या आणि आभाळाच्याही.

तसं पाहिलं तर माझं घर काही सुंदर वगैरे नव्हे. निसर्गरम्य तर नव्हेच नव्हे. म्हणजे ते सुंदर वगैरे करण्याच्या ज्या काही शक्यता होत्या त्यांचा आम्ही पुरेपूर पाठपुरावा केला. नाही असं नाही. पण आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठे येणार. ह्या गोष्टी माझ्या घरात नाहीत किंवा कमी आहेत ही जाणीवच कधी झाली नाही? का बरं?

कदाचित घर हे दगडविटांचं बनलेलं नसतंच मुळी. घर बनलेलं असतं आभाळ पेलणाऱ्या पंखांचं. तापलेल्या फणफणणाऱ्या कपाळावर ठेवलेल्या थंड पाण्याच्या घडीचं. डोळ्यात टचकन जमणाऱ्या पाण्याचं, पाठीत मारलेल्या सणसणीत रट्ट्याचं, भावाबहिणींच्या भांडणाचं, त्यांना ओरडणाऱ्या आईचं, समजावणाऱ्या आजीचं, एकत्र बसून केलेल्या दिवाळीच्या कंदिलाचं, घरात येणाऱ्या गणपतीचं, संध्याकाळी म्हटलेल्या शुभंकरोतीचं आणि रात्री झोपताना एकलेल्या अंगाईचं.

आज मागे वळून माझ्याच घराकडे बघताना कसं वाटतं माहितेय? घरट्यातून उडून गेलेल्या पिल्लासारखं. म्हणूनच म्हटलं. आभाळ आणि पंख ह्यांचे संदर्भ तेवढे बदलले. घर होतं तसंच आहे.

ह्या घरट्यातून पिल्लू उडावे
दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती

हे गाणं आता माझ्याच घराचंच वाटायला लागतं.

मग माझं घर कसं? ह्या बागवाल्या घरासारखं? चित्रातल्या झोपडीसारखं? की समोरच्या घरट्यासारखं?

माझं घर फक्त माझ्या घरासारखं.

Friday, October 19, 2007

बये दार उघड...

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो......

.... बाई अंबाबाई तूच ग आम्हाला तारू शकशील. काही काही म्हणून मनासारखं होत नाही बघ. गेल्या नवरात्रीपासून चाललंय, घरात नवं फर्निचर घेऊ पण पैशाची सोय होईल तर शप्पथ. किती दिवस गं असं तुला बोलवायचं आणि ह्या जुन्या टेबलावर ठेवायचं? बरं नाही वाटंत मनाला. त्यात गेल्या वर्षी ह्यांची बदली झाली दुसऱ्या ऑफिसात. तिथला साहेब कडक आहे म्हणे. वरची चिरीमिरीसुद्धा बंद झाली. आता तूच बघ ना. घरात दोन मुलं. मोठा असतो आपल्याच तंद्रीत. धाकटी अजून कॉलेजात आहे. पण आज ना उद्या तिचं लग्न करायला लागणार. त्याचे पैसे कुठून गं आणायचे आम्ही. त्यात हल्ली खर्च का कमी झालेत? आताच कांदा पदराला वांदा लावून गेला. गणपती नवरात्राच्या वर्गण्या. कसं गं व्हायचं आमचं? केबल वाले एक मधे पैसे वाढवतंच असतात. वीज, असते तेव्हा खर्चिकच असते की गं. बये आता तूच काहीतरी कर. ह्यांची बदली पुन्हा जुन्या ऑफिसात कर मी खणा नारळानी ओटी भरेन तुझी आणि पुढच्या वर्षी घटस्थापना नव्या कोऱ्या टेबलावर करेन मग तर झालं? बये दार उघड गं बये दार उघड......

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला...

..... तिच्या आयला आज पण सचिन खेळला नाही. दुर्गामाते आता तूच काहीतरी बघ. तू म्हणजे एकद ऑस्ट्रेलिअन असल्यासारखी वागतेस हल्ली. एखाद दुसरा तरी विजय आपल्या टीम ला मिळावा की नाही. बघ आम्ही तुला एवढे नवस बोललो आणि वर्ल्ड कपला आपल्या टीमला तू दाणकन आदळलंस. मग काय उपयोग आमच्या भक्तीचा आणि तुझ्या शक्तीचा अंबे? तू फक्त त्या हेडन आणि सायमंडस ला सांभाळ, बाकी सगळं आम्ही बघून घेतो काय? अगं शेवटी काहीही झलं तरी ती आपलीच टीम आहे. तुला जरी आम्ही जगन्माता म्हटलं तरी, पहिला प्रेफरन्स आपल्या भरतातल्या लेकरांना तू द्यायला पहिजे की नाही? बये दार उघड. नामुष्की व्हायची वेळ आलेय. ही सिरीज बरोबरीत तरी सोडव, बये दार उघड......

उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो....

......काय क्युट आहे ना तो? काय आरती म्हणतोय? काय आरती म्हणतोय वाह! जोडीदार पाहिजे तर असा. आपलं नशीबच फुटकं. एक मुलगा धड सांगून येईल तर शप्पथ. कुणी काळाच आहे, तर कुणी उंचच आहे. कुणाला पुणं सोडायचं नाही, तर कुणाला मुंबईत राहायचं नाही. देवी, शारदे आता तूच सांग माझं लग्न जमायचं तरी कसं ग. त्यात गेल्या आठवड्यात पाहिलेला मुलगा आवडला. तसा ठीकठाकच होता. पण चांगली नोकरी, स्वतःचं घर मुंबईत, बोलायलाही बरा होता. म्हणजे भेटले तेव्हा वाटलं की त्यालाही मी आवडलेय, पण एक आठवडा झाला तरी काही निरोप नाही. आतापर्यंत मी इतक्या मुलांना नकार दिले. आता मला आवडेल असा मुलगा सापडलाय तर तो मला नाही म्हणणार की काय? शारदादेवी, काहीतरी कर गं. लहांपणापसून मी तुला पुजत आले. आता माझं एवढं काम कर ना गं. आता नाही ते चहा पोह्यांचे कार्यक्रम सहन होत. बरा मुलगा मिळालाय आता त्याने हो म्हणुदे. प्लीज देवी. प्लीज, बये दार उघड...

भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

..... आयला किती वेळ ही आरती चालणार आहे? चुकीच्या वेळेलाच आलो देवळात. मला वाटलं उशिरा आलो तर गर्दी थोडी कमी असेल. तर आता नेमकी आरती. नेमका साला आजच आमचा टोपी आला. तसं टोपीला टोपी घालणं एकदम सोपं आहे. पण काय आहे त्या छपरीला असं वाटतं की उशिरा बसतो तोच काम करतो. साला म्हणून आपण लेट. काय त्रास आहे. कालीमाते पाहिलंस. नीट तुझं दर्शन घेणं सुद्धा दुरापास्त झालंय. तिथे तो टोपी. तिथून सुटून आलो तर इथे आरती, आता आमच्या सारख्या भाविकानं काय करायचं तरी काय. माते, तूच काहीतरी कर आता. दोन चार ठिकाणी अप्लाय केलाय. एक इंटरव्ह्यूही झाला काल. बराच झाला. पण काय? तू मनात आणलंस तर काहीही होईल. पकलोय मी ह्या देशात. एखादं ऑन्साईट पोस्टिंग मिळुदे माते. त्यात अमेरिकेत मिळालं तर बरंच. काय आहे एच वन बी हाल्ली सहज ट्रान्स्फ़र होतो. मग ग्रीन कार्ड, एखदी झकास छोकरी बघुन लग्न. दर वर्षी न चुकता नवरात्रात तुझ्या देवळात येईन आई. बये माझ्या नशीबाचे दरवाजे उघड ग, बये दर उघड....

आनंदे प्रेम ते आलं सद्भावे क्रिडता हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

....... टेन्शन, टेन्शन झालंय डोक्याला. ह्या शेअर बाजाराचं काही खरं नाही. म्हणजे मी एखादा शेअर घ्यावा आणि त्याचा भाव उतरावा हे हल्ली नेहमीचंच झालंय. त्या भार्गवराम धनसोखीलालनं दिलेल्या टिप्स सुद्धा हल्ली चुकतायत. संतोषीमाते, हे काय चाललंय काय. मला शक्ती दे माते. ह्या बाजारात विजयी होण्यासाठी मला बुद्धी दे. माझी धनसंपत्ती वाढली की मी तुला सोन्याचा मुकुट अर्पण करीन. काहीतरी करून मला चांगल्या टिप्स मिळूदेत माते. जन्माची सगळी कमाई ह्या बाजारात गुंतवून बसलोय. बाजार तेजीत असताना पैसे गुंतवले, त्यानंतर बाजार पडला. आता बाजार पुन्हा जोरात आहे माते, पण मी घेतलेले शेअर्स अजूनही खालीच आहेत माते. काहीतरी युक्ती कर आणि मला नफ्यात आण माते. दार उघड अंबे दार उघड.

जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

भवानीमाते, तू तर सगळं जाणतेसंच. आमच्यासाठी परिस्थिती किती कठीण झालेय ते. विरोधी पक्ष आमच्या वाईटावर टपून बसलेले आहेतच. पण आमच्या पक्षातले अंतर्गत विरोधक, ते जास्त हैराण करतायत माते. दिल्लीशी जवळीक साधावी तर राज्यावरची पकड जाते. राज्य पकडून राहावं तर विरोधक दिल्लीश्वरांच्या कानांत चुगल्या करायला सरसावतात. माते तुझ्या कृपेने आजवर आमदारकी खासदारकी मंत्रीपदं सगळम सगळं मिळालं. आताच्या एवढ्या पेचप्रसंगातून मार्ग काढ माते. मला माहितेय खून, मारामारी, दंगली हे सगळं वाईट आहे. पण करायला लागतं ना माते. नाहीतर सत्ता मिळवून जनसेवा करणार तरी कशी. वाचव माते. तूच वाचव आता ह्यातून. स्वतः चालत प्रतापगडावर जाईन बये, दार उघ्ड आणि तुझ्या कृपेचा वर्षाव आमच्यावर कर, बये दार उघड......

......आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपेकरुनी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. टाळ, झांजा, टाळ्या आणि आवाज टिपेला पोहोचतात.....

....बये दार उघड. बये, मला गाडी, बये मला पैसा, मला नवरा, मला घर, मला खेळणी, मला पुस्तकं, मला सत्ता, मला खुर्ची, मला टेबल, मला रस्ते, मला आगगाडी, मला बैल, मला रान, मला पाणी, मला लोणी, मला पीठ, मला मरण, मला पुरण, मला नोकरी, मला छोकरी, मला जेवण, मला बंगला, मला लाईफ, मला वाईफ, मला शांतता, मला काय? मला? मला? अजून, मला अजून, अधिक, अधिकाधिक, पोट फुटेस्तोवर. बये दार उघड बये दार उघड.......

- कोहम

Tuesday, September 25, 2007

Happy Birth Day Koham....

"कोहम चा शोध घेत रहायचं. हा शोध घेताना, जगाच्या प्रयोगशाळेत आयुष्याचे प्रयोग करत रहायचे, आणि निरिक्षणं ह्या ब्लॉगमध्ये नोंदवायची. फारफारतंर अनुमान नोंदवायचं. निष्कर्श मात्र काढायचे नाहीत. कुणी वाचंलाच हा ब्लॊग, तर त्यांचा निष्कर्श काढायला ते मोकळे असतील......."

ह्या मिशन स्टेटमेंट ने बरोबर एक वर्षापुर्वी हा ब्लॉग सुरू केला.

ह्या मिशन स्टेटमेंटला मी किती जागलो माहित नाही.

दर आठवड्याला लिहायचंच असं म्हणून सुरू केलेला हा प्रयत्न. हळूहळू आठवड्याचे दोन झाले आणि सध्या गाडी तीनवर अडकलेय. पण चालू आहे, थांबली नाही.

एक मी होतो. कधीकधी लिहायचो. लिहिता येईल असं वाटायचं. पण चांगलं लिहू अशी खात्री नव्हती. आळस होता, कंटाळा होता. थोडी भीतीही होती. मग त्या "मी" ने लिहायची जबाबदारी "त्या"च्यावर टाकली आणि त्याच्या नावाचा ब्लॉग सुरू केला. लिहिलेलं वाईट उतरलं तर त्याच्या नावावर. पण चांगलं उतरलं तर?

अर्थात मी कधी लपून नव्हताच. ब्लॉग त्याच्या नावावर असला तरी कमेंट्स बघायला मी पुढे. सुरवातीला एक-दोनही समाधान द्यायच्या. हळूहळू आकडा वाढत गेला. कोणीच वाचत नव्हतं तोपर्यंत काहीही लिहिलेलं चालणार होतं. जास्त लोकं वाचायला लागले आणि मग थोडा ताण यायला लागला. अर्थात "त्या"ला. म्हणूनच तर त्याच्या नावचा ब्लॉग.

अपेक्षांचं ओझं वाटायला लागलं. लिहावं ते स्वानंदासाठी असं म्हणण्याचे दिवस गेले. लिहावं ते अधिकाधिक कमेंट्स मिळवण्यासाठी. म्हणजे जाहीरपणे मी काही हे स्वीकारणार नाही पण आपलं खाजगीत म्हणून सांगतोय.

स्पर्धा, असूया निर्माण व्हायला लागली. नकळतच (मी नव्हे) तो इतरांचे ब्लॉग्स बघताना पहिल्या कमेंट्स किती हे पाहायला लागला. तूलना करायला लागला. मला एवढ्याच, त्याला इतक्या का? तिला इतक्या का? असं काय छान लिहिलंय त्यांनी?

मग काही ट्रिक्स कळायला लागल्या. एक कमेंट दो. एक कमेंट लो. त्याने तेही करून पाहिलं.

पुढे ते व्यसनही कमी झालं. पण नंबर्सची अपरिहार्यता काही कमी झाली नाही. बहुदा होणारही नाही.

पण एक नियम मात्र पाळला. आवडलेल्या लिखाणाला मनापासून दाद दिली मग ती सदतिसावी असो नाहीतर पहिली. न चुकता. कितीही असूया वाटली तरीही. अर्थात त्याने.

काय आहे? कधीकधी रुढींच्या झुली न पांघरता मन मोकळं करावंसं वाटतंच. कधी कधी खरं बोलावसं वाटतंच. आज बोललो. आपण केलेल्या गोष्टींची बिलं दुसऱ्यांच्या नावावर तरी किती फाडायची? कुठेतरी स्वतः बील भरलं पाहिजेच की. आता हे सगळं खाजगीत म्हणून बरका? कुठे बोलू नका

मधुनच कधी माझा पहिला पोस्ट बघतो. वाटतं की खरोखरच आपण आपल्या मिशन स्टेटमेंटला जागतोय का? माहीत नाही. माहीत नाही असं म्हणायचं कारण खरं उत्तर तितकसं आनंददायी नाही.

वाटतं थांबावं. जोपर्यंत पुन्हा स्वानंदासाठी लिहू शकत नाही तोपर्यंत थांबावं. But what about numbers' obsession? स्वतःचा अहं पोसायची सवय सोडायची?

कळतं पण वळत नाही.

Happy Birth Day Koham......

Friday, September 14, 2007

बाजार

कालचा अख्खा दिवस सततच्या पावसाने भिजून गेला. घरी असताना छान छान वाटणारा पाऊस बाहेरगावी फिरायला गेल्यावर मात्र नकोसा होतो.

पण "आज" तसा नव्हताच. सकाळी सकाळी सूर्यनारायणानं दर्शन दिलं आणि आज त्याचंच राज्य असल्याची ग्वाही दिली. चला, म्हंटलं आल्या उनाचं सोनं करून घेऊया, म्हणून सकाळी लवकरच घराबाहेर पडलो.

खरंतर होबार्ट हे गाव असं आहे, की सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळा सोडल्या तर इथे गर्दी म्हणून दिसत नाही. इथे सगळे दर्दीच. अगदी मला आवडतं तस्सं गाव. शांत, सुंदर आणि स्वच्छ. म्हणजे निरभ्र आभाळाच्या कॅनव्हासवर हिरवे डोंगर, निळं पाणी. निसर्गाची भव्यता आणि यःकश्चित आपण. त्यामुळे शनिवारी सकाळी बाहेर पडल्यावर फार लोक दिसतील अशी अपेक्षाच नव्हती. पण होबार्टने एक सुखद धक्का दिला. होबार्टचं शनिवारी भरणारं सालामांका मार्केट लोकांनी तुडुंब भरलं होतं.

बऱ्याच लोकांना गर्दी आवडत नाही. मला मनापासून आवडते. कारण गर्दीत मिळतो तसा एकांत कुठेच मिळत नाही. डोकं विचारांनी भणभणलं की सरळ मुंबई व्ही.टी. च्या गर्दीत स्वतःला झोकून द्यावं. इतके लोक असतात तिथे की तुम्ही एक समुद्राचा थेंब होऊन जाता. क्षुल्लक, यःकश्चित. मग तुमचा चेहेरा काळजीने किती का लंबा चौडा होईना. नोबडी बॉदर्स. किंवा अत्यानंदाने तुम्ही स्वतःशीच हसलात आणि तुमचं हास्य तुमच्या चेहेऱ्यावर उमटलं, तरी कोणी विचारत नाही, काय वेड्यासारखा हसतोयस म्हणून.

गर्दीतलाच एक बनून गेलो. समोर पसरला होता एक रंगीबेरंगी बाजार. काय नव्हतं तिथे? उदबत्तीपासून हत्तीपर्यंत सर्व गोष्टी मिळतात अशीच ती जागा. विचारांचं विमान उडायला ह्यापेक्षा चांगला रन-वे कुठचा असणार. कुठे शोभेच्या वस्तू होत्या, कुठे मेणबत्त्या, कुठे जुनी पुराणी पुस्तकं, खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या गोष्टी, पिशव्या, फोटो, पेंटिंग्ज, कपडे, खेळणी, दागिने. म्हणाल ते समोर हजर.

आणि माणसांच्या फक्त दोनच जमाती तिथे होत्या. विकणारा आणि विकत घेणारा. काळा असो वा गोरा, पिवळा असो वा सावळा. सगळे ह्या दोन जमातीत मोडणारे.

काही दुकानं गर्दीनं भरून चालली होती. इतकी लोकं की गर्दी आवरत नव्हती. काही दुकानं उदासवाणी रिकामी रिकामी होती. आलाच एखादा वाट चुकलेला तरी त्यालाही दूर पळवेल असा रिकामपणा. आणि सगळ्यांची धावपळ एकच. काहीतरी विकायचंय, काहीतरी विकत घ्यायचंय. विकणाऱ्याला अधिकाधिक किंमत हवी. विकत घेणाऱ्याला कमीत कमी किंमतीत ती वस्तू हवी.

आपण तरी दुसरं काय करतो म्हणा. माझी पहिली नोकरी सोडून मी दुसरी नोकरी पकडली तेव्हाचा इंटरव्ह्यू आठवला. घासाघीस. अगदी कोथींबिरीची जुडी विकत घेताना व्हावी इतकी घासाघीस. मी सांगायचं मी किती चांगला आहे, त्यांनी सांगायचं तू चांगला आहेस पण तितकाही नाहीस. कशाचा बाजार? कोण विकतोय आणि कोण विकत घेतोय? काय विकलं जातंय? वेळ? गुणवत्ता? छ्याट. मी विकल्या होत्या माझ्या प्रायॉरिटीज. माझ्यासाठी त्या लाख मोलाच्या होत्या. म्हणून मी मागत होतो लाखाचं मोल त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या दृष्टीने माझ्या प्रायॉरिटीज ची किंमत शून्य. म्हणून ते करत होते घासाघीस. काय विकून बसलो? रात्री नाटकांच्या तालमींच्यावेळी न झाडलेल्या स्टेजवरून नाकातोंडात जाणारी धूळ, गणपतीच्या गर्दीत आलेला वीट. मागच्याच महिन्यात आजीशी बोललो. ती बोलवत होती गणपतीला. यंदा पन्नासावं वर्ष आहे गणपतीचं मामाकडे. माझ्या आयुष्यातलं मामाच्या गणपतीचं पन्नासावं वर्ष विकून बसलो ना मी? बाजार. विकायचं आणि विकत घ्यायचं.

रस्त्यावरच आपली पंधरा वाद्य घेऊन बसलेल्या एकानं आपलं काम सुरू केलं आणि नकळत पावलं तिथं वळली. माणूस एक आणि वाद्य बरीच. आणि आळीपाळीनं तो एकटाच सगळी वाद्य वाजवत होता. बरीच लोकंही जमली तिथे. नकळत पायांनी ठेका धरला.

किती वाद्य वाजवतो हा एकटा? आपल्याला एकतरी आलं असतं तर काय बहार आली असती ना? शाळेत असताना तबला शिकायला जायचो. सर म्हणायचे हात चांगला बसतोय. रियाज करत राहा. मधे दहावी आली. दहावीला चांगले मार्क हवेतच. मग बारावी, आय. आय. टी., आय. आय. एम. आणि शेवटी अमेरिका, ह्या सगळ्यासाठी दहावी महत्त्वाची. तबला काय कधीही शिकता येईल. आय. आय. टी., आय. आय. एम. आणि अमेरिका ढगातच राहिले आणि तबला तेवढा हातचा गेला. काय कमावण्यासाठी काय विकलं? कसला बाजार?

त्या अवलियाला तिथेच सोडून मी पुढच्या दुकानाकडे वळलो. पुस्तकांचं दुकान. म्हणजे माझं आवडतं ठिकाण. आत बाबा आदमच्या काळातली काही पुस्तकं ठेवली होती. काही उगाचच चाळून बघितली. जुनी पुस्तकं बघताना माझी एक खोड आहे. पुस्तकाचं शेवटचं कोरं पान आणि पहिलं नाव घालायचं पान बघायचं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं "सोमी" कडून "गोम्या" ला. आता सोमी कोण आणि गोम्या कोण? शेवटचं पान पाहिलं त्यावर बदामातून गेलेला बाण, पुढे सोमीचं नाव. बहुदा गोम्या सोमीच्या प्रेमात पागल झाला असणार. पुस्तकाचं नाव "घोस्ट टाऊन्स ऑफ ऑस्ट्रेलिया". बहुतेक सोमीचा दुसरा कोणीतरी सोम्या असणार.

प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा इतिहास असेल नाही? अगदी इतिहासाच्या पुस्तकाला देखील. कुठल्या पानात एखादं मोरपीस, कुठे वर्षानुवर्ष ठेऊन विरलेलं पिंपळपान, कुठे सांडलेला पदार्थ. माझी शाळेची पुस्तकं कुठे असतील आता? असतील माझ्या कपाटात असतील अजूनही. म्हणजे आहेतच. ब्राऊन पेपर्स ची कव्हर्स. माझं नाव सांगणारं लेबल. घरी गेल्यावर चाळून पाहिली पाहिजेत एकदा. बरं झालं ठेवलीत नाहीतर कधीच त्यांचा बळी देऊन खाऱ्या दाण्याच्या पुड्या बांधल्या असत्या कुणीतरी.

चालत चालत पुढे आलो तर एक "स्कॉटिश बँड" आपले बॅगपाईपर्स लावत बसला होता. तबल्या तंबोऱ्यासारखे बॅगपाईपर्सही सुरात लावत असावेत. त्यांच्या बँडला पैशाची गरज होती. ही कला टिकवण्यासाठी. त्या वाद्यात काही वेगळीच मजा आहे. म्हणजे जुनं पण आवेशपूर्ण असं काहीतरी.

एक छोटा मुलगा आणि त्याच्या समोर त्याच्या बापाच्या वयाचा असावा असा माणूस. एकमेकांकडे तोंड करून बॅगपाईपर वाजवायला लागले. नजर एकमेकांच्या डोळ्यात. मानेच्या शिरा तट्ट फुगलेल्या. तो बापच असणार त्याचा. त्याच्या डोळ्यात कौतूक ओसंडून वाहत होतं. मुलाबद्दलचा अभिमान. आणि मुलाच्या चेहेऱ्यावर बापाच्या तोडीचं आपण वाजवू शकतो ह्याचं समाधान. शाळेत स्कॉलरशीप मिळाल्यावर माझ्या बाबांच्या चेहेऱ्यावर पण असेच भाव उमटलेले अजुनही आठवतात.

नकळत खिशाकडे हात गेला. जी सुटी नाणी हाताला लागली ती सगळी त्यांनी ठेवलेल्या टोपीत टाकली. मदत. मदत कसली? मी थोडं समाधान विकत घेतलं तिथे पैसे टाकून. माझ्या मनाला सुखावणारं समाधान. कदाचित माझा अहं कुरवाळणारं समाधान. मी काहीतरी परोपकारी केलं ह्याचं समाधान विकत घेतलं मी. शेवटी बजारच होता तो.

तासभर कधी निघून गेला कळलंच नाही. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत आलो. शेवटचं दुकान मागे पडलं. मी परत एकदा वळून बाजाराकडे पाहिलं. पुन्हा तीच माणसांची गर्दी दिसली. दोन जमातींत मोडणारी. विकणारी किंवा विकत घेणारी. घासाघीर करणारी. मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. मला मीच दिसत होतो त्यांच्यात. विकणाराही आणि विकत घेणाराही.

माझ्या पाठीमागेच एक रस्ता होता. रस्त्याच्या कडेला बाक होता. बाकावर एक आजीबाई बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला त्यांची चार-पाच वर्षाची नात. दोघींच्या काहीतरी गप्पा चालू होत्या.

तो बाजार त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. एक बहुदा त्यातून बाहेर पडली होती आणि एकीला अजून आत शिरायचं होतं.

- कोहम

Friday, August 17, 2007

भारत अधुन मधुन माझा देश आहे

भारत माझा देश आहे? खरंच आहे का? असेल बहुदा.

आजच्या दिवशी म्हणे भारताला स्वतंत्र्य मिळालं. हं, स्वातंत्र्य. हे बाकी चांगलं झालं हं. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे हवंच. आत बघा आमची हयात गेली स्वातंत्र्य मिळवण्यात. म्हणजे लहान होतो तेव्हा अभ्यासापासून स्वातंत्र्य, थोडे मोठे झालो तसे पालकांच्या कटकटीपासून स्वातंत्र्य, मग वेगवेगळ्या गर्ल फ़्रेंड्स ना भेटताना ओळखीच्या माणसांच्या नजरांपासूनचे स्वातंत्र्य, लग्न करण्याचे स्वातंत्र्य, लग्नाआधी लग्नानंतरचे करायचे स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर लग्नाआधीचे करायचे स्वातंत्र्य.

सगळ्या स्वातंत्र्याची भंकस झालेय यार, मग कसला स्वातंत्र्यदिन सेलेब्रेट करायचा. त्यात सेलेब्रेशन म्हणजे आधीपासूनच स्टॉक आणून ठेवायला लागतो. साला स्वातंत्र्यदिनाला तरी आम्हाला काय पाहिजे ते प्यायचे स्वातंत्र्य द्याल की नाही?

थोडक्यात काय? तर स्वातंत्र्य इज अ व्हेरी इंपॉर्टंट कमॉडिटी. म्हणजे कसं एकदम फ्री वाटलं पाहिजे यार. दारू पाहिजे तर दारू, गांजा पाहिजे तर गांजा, चरस पाहिजे तर चरस. काय? जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण बघा ना. आता उद्या पकडलं मला गांजा पिताना तर माला आत घालणार पोलिस. माझ्या जागी कोणी इंफ्लुएंशियल पोरगा असला की पोलिस, त्याच्याबरोबर गांजा ओढणार. म्हणजे सगळ्या इंफ्लुएंशियल डुकरांना स्वातंत्र्य. पण आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल..... घाबरू नका, माणसांचं म्हणत नाहीये......तर आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल डुकरांचं काय? आम्हाला कसलं आहे स्वातंत्र्य? हे चिखलात लोळले तर हर्बल मड बाथ, आम्ही लोळलो की गटार काय?

रोजचंच झालंय यार. ये सिस्टिम ही साली सडेली आहे. काहीपण होणार नाही ह्या देशाचं. हं दर वर्षी स्वातंत्र्यदिन मात्र सेलेब्रेट करायचा आपण. सेलेब्रेशन्स तर काय चालूच असतात त्यात हे अजून एक सेलेब्रेशन.

सेलेब्रेशन वरून आठवलं. परवा आमच्या कॉल सेंटरमध्ये टार्गेट अचिव्हमेंट चं सेलेब्रेशन होतं. सगळे साले पिऊन टुन. पण एक आहे सालं, प्यायला ना की खोटं खोटं का होईना पण स्वातंत्र्य मिळाल्याचा भास होतो काय? सगळ्या कटकटीपासून मुक्ती. हं, तर तिथे ती सॅम भेटली. सालीचं नाव सीमा आहे पण हिला बोलवायचं सॅम. सॉलिड फटाकडी आहे.

तर मी सांगितलं तसं दारू पिऊन माला स्वतंत्र वाटतच होतं. म्हटलं बघूया स्वातंत्र्याचा काही उपयोग होतोय का तिला जरा खोपाच्यात घ्यायला. साली.. बिलकुल भाव दिला नाही. सतत त्या टकल्याबरोबर फिरत होती. टकल्या म्हणजे आमचा बॉस. यू.एस. ला पाठवतोय तिला ट्रेनिंगला. साली दिवसभर फोनवर कस्टमर्सची चाटते आणि संध्याकाळी बॉसची.

पण तेही बरोबरच आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी काय उपयोग. वो टकल्या गे थोडीना है. पण चांगलं झालं. स्वतंत्र झाली साली थोड्या दिवसांसाठी तरी. आता यू.एस. ला जायचं आणि एखादा गोरा टकल्या शोधायचा म्हणजे पर्मनंटली स्वतंत्र. शेवटी काय स्वातंत्र्य महत्त्वाचं, ह्या देशापासून, ह्या सिस्टिम पासून.

मरूदे. हम तो साला इधरिच सडेगा, पूरी जिंदगी. ते मरूदे. काल नवा नोकिया घेतला. तीस हजारको लिया बाप. पण मॉडेल कसलं आहे. आमचा तो घाट्या आहे ना, तो माला नेहमी म्हणतो की, थोड्या दिवसांनी घे म्हणजे स्वस्त होईल. त्या अनाड्याला कळत नाही, की माणसाने अप टू डेट असायला पाहिजे. नवीन मोबाईल, नवीन आयपॉड, नवीन ऍपल, नवीन ब्लु बेरी, अरे ह्यात जी मजा आहे ती काय चावून चोथा झालेली मॉडेल घेण्यात आहे. आपण नेहमी लेटेस्ट मॉडेल्स वापरतो काय, मोबाईल असो नाहीतर पोरगी.

कसं एकदम स्वतंत्र वाटतं. लहानपणापासून शिकत आलो, काटकसर करावी, जास्त पैसे खर्च करू नयेत. एकदम फ़्रस्ट्रेट व्हायचो यार. बांधल्यासारखं वाटायचं. वाटायचं काय नाकर्तबगार आहेत आपले पालक. शाळेतल्या पोरांचं सगळं नवीन, लेटेस्ट. आपलं सगळं जुनं. म्हणून आता स्वतंत्र वाटतं. आपणही त्या शाळेतल्या पोरांसारखे लेटेस्ट, अप टू डेट झालो असं वाटतं. तुला कळणार नाही यार काय फीलिंग आहे ते. असं समज, तू रात्रभर दारू पितोयस, पेगवर पेग. अप बॉटम्सवर बॉटम्स अप. कसं वाटतं? सगळी ऍग्विश आपल्या पोटात ठासून भरलेय असं वाटतं की नाही. तसं वाटायचं मला लहानपणी. आणि आता? ते सगळं असह्य होऊन भडभडा ओकल्यावर जसं वाटतं ना? तसं वाटतं. स्वतंत्र. मोकळं.

साल्या आज तू नुसती मजा बघ. न्यूज मध्ये भाषणं दाखवतील ना ती बघ. म्हणे तरुण पिढीने ह्यॅव केलं पाहिजे नि त्यॅव केलं पाहिजे. हे साले खादी चड्डी, ह्यांना कोण विचारणार त्यांच्या तरुणपणी त्यांनी काय केलं ते. साले आमच्या बळावर स्वतंत्र झाले स्वतःच्या गरिबीतून. एकेकाचे बंगले बघा. गाड्या बघा. स्वतःचा उत्कर्ष बरोबर साधला हरामखोरांनी. हे काय करत होते देशासाठी त्यांच्या तरुणपणी. काही केलं असतं त्यांनी तर झालो असतो का आपण असे. ह्यांनी केलेल्या बलात्कारातून जन्मलेली आहे आजची परिस्थिती आणि म्हणूनच आम्ही असे आहोत नपुंसक आणि हो स्वतंत्र.

जाऊदे यार. फार हाय लेव्हलचं मराठी बोललो. तुला नाही समजायचं. तुलाच काय कोणी मला ऐकवलं तर मलाही नाही समजायचं. शाळेत असताना पुस्तकं वाचायचो. टिळक, सावरकर, गांधीजी. बाबू गेनूची गोष्ट वाचून डोळ्यात पाणी यायचं. भगतसिंग, राजगुरूची गोष्ट वाचून अंगात स्फुरण चढायचं. वाटायचं आपणंही काही असंच करावं देशासाठी. मग वाटायचं त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं पण आपण?

कॉलेजात मुलींची छेड काढली म्हणून गुंडांना हटकायला गेलो. तिथेच त्यांनी धुतला माला. आणि आंघोळीनंतर पंचा वाळत टाकावा तसा माला कट्ट्यावर टाकून निघून गेले.

पुढेपुढे त्याचीही सवय झाली. आपण षंढ आहोत हे मी स्वीकारलं. मला काय करायचंय? माझ्या बहिणीची तर नाही ना छेड काढली, मग मुझको क्या? ही वृत्ती बळावली. स्वतंत्र आहोत ना आपण? मग आपला एकट्याचा स्वतंत्र विचार करायला मी शिकलो. दुनिया गेली गाढवाच्या गांडीत. देशभक्ती वगैरे सगळं झूट आहे रे. कसला देश? एकत्र केलेले जमिनीचे तुकडे आहेत हे. म्हणे देश. मी पहिला कोण भारतीय? का हिंदू, मुसलमान, ब्राम्हण आणि महार. पहिली माझी जात, पहिला माझा धर्म आणि मग मी, मग माझा देश. बरोबर आहे, स्वतंत्र आहोत ना आपण.

हे सगळं पहिलं की वाटतं, खरं स्वातंत्र्य मिळेल जेव्हा मी मरेन. ते खरं स्वातंत्र्य असेल. तोपर्यंत दर वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू. काय? फुल टाईट होवून. चिअर्स. तोपर्यंत भारत अधुन मधुन माझा देश आहे. जेव्हा टीम इंडिया क्रिकेट मॅच जिंकते तेव्हा....

---------------------------------------

हे साहित्य पूर्णपणे काल्पनिक असून, लिखाणात व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते नाहीत. काल्पनिक व्यक्तिने केलेले प्रथमपुरुषी निवेदन ह्या स्वरूपातील हे लेखन आहे.

---------------------------------------

Thursday, August 02, 2007

ग्रेव्ह-डिगर

चर्चच्या गंभीर वातावरणाला शोभून दिसेल असाच परिसर. कॉर्क गावातलं हे एकमेव चर्च, कॅसलहेवन. खरोखरच स्वर्गीय वाटावा असा रमणीय परिसर. लाल विटांनी बनवलेली चर्चची इमारत. पावसाचं पाणी झटक्यात वाहून जाण्यासाठी लावलेली तपकिरी कौलं आणि समोरच्या बाजूला असलेला चर्चचा मनोरा. तोही लाल विटांनी बनवलेला. मनोऱ्याच्या कौलाखाली असलेली घंटा. अजूनही सूर्य रंगात आला की चकाकणारी. चर्चच्या मागच्याच बाजूला गावातली एकमेव नदी. चर्च आणि नदीच्या मध्ये पसरलेलं ग्रेव्हयार्ड. हो ग्रेव्हयार्डच, सिमेटरी नाही. कॉर्क गावात मेलेले कित्येक जण इथेच आहेत. कित्येक वर्ष. वातावरणाची शांतता भंगणारा एकच आवाज येतोय. खणण्याचा. ग्रेगरी, ग्रेगरीच आहे तो. चित्रासारख्या शांत असणाऱ्या परिसरात आवाज करण्याचं काम ते त्याचं. ह्या ग्रेव्हयार्डचा पिढीजात ग्रेव्ह-डिगर आहे तो. लोकांच्या कबरी खणणारा.

चर्चमध्ये आज नवीन पेस्टर आलाय, पलीकडचा गावातून. खरंतर मेंढ्या चरायला नेणं हे त्याचं काम. पण आता चर्चामध्ये मेंढ्याच नाहीत. त्यामुळे हा पोरगेलसा पेस्टर बहुदा प्रार्थनेच्या वेळी मदतनिसाचं काम करणार. लहानखुराच आहे. इव्हान त्याचं नाव. ग्रेव्हयार्डमधून नदीच्या दिशेने निघालाय. एकीकडे साडेसहा सात फूट उंचीचा, लांब केस आणि दाढी वाढलेला, ढेरपोट्या ग्रेगरी जमीन खणतोय तर समोरंच पाच फुटाच्या आताबाहेर असलेला इव्हान त्याच्याकडे बघतोय.

"काय रे पोरा? इकडे काय करतोयस?" आपल्या शरीराइतक्याच दणकट आवाजात ग्रेगरी त्याला दरडावतो.
"मी..मी इथला नवा पेस्टर आहे. आपण?"
आपली कुदळ बाजूला ठेवता ठेवता ग्रेगरी सात मजली हसतो. त्याच्या ह्या हसण्याने चिरनिद्रा घेत पडलेले आजूबाजूच्या थडग्यातील मुडदे तर उठून बसणार नाहीत ना? ह्याची इव्हानला काळजी वाटते.


"जा. तुझ्या बापाला विचार मी कोण ते. पोरा, एवढं साधं कळत नाही का तुला? ग्रेव्हयार्डमध्ये कुदळ, फावडं हाणणारा दुसरा, तिसरा कोण असणार? एकतर एखादा निद्रानाश झालेला मुडदा किंवा ग्रेव्ह-डिगर. तुला मी कोण वाटतो? मुडदा तर नाही ना?"
"नाही"
"असेन जरी मी मुडदा तरी तुला मी सांगणार नाही. समजलं? कारण मलाच कळणार नाही ह्या मुडद्यांच्या संगतीत राहून राहून आणि कबरी खणून खणून कधी मी स्वतःच मुडदा होईन ते. ह्या चर्चमधल्या फादर जेम्स ना मी किती वेळा सांगितलं की मला एक मदतनीस द्या. मला एकट्याला हे काम हल्ली झेपत नाही म्हणून. अडाणी माणसं. चर्चमध्ये मेंढ्या नाहीत तरी पेस्टर घेऊन येतात. उद्या मी मेलो की कळेल. जेव्हा कोणीच नसेल माझी कबर खणायला. माझं प्रेत सडून वास ह्यांच्या नाकात जायला लागला की त्यांना समजेल की चर्चला पेस्टर नकोय, ग्रेव्ह-डिगर हवाय"


"पण.." घाबरत घाबरत इव्हान ग्रेगरीला तोडतो.
"पण? पण बीण काही नाही. ठरलं तर मग, आतापासून तूच माझा नवा मदतनीस. काम एकदम सोपं आहे. मोकळ्या जमिनीचे पहिले दहा बाय पाच फुटाचे चौरस बनवायचे"
"चौरस?"
"हो हो, मला माहितेय माझी भूमिती कच्ची आहे ते. चौरस नाही, चौकोन बनवायचे. एका मुडद्याला एक चौकोन. समजलं? चौरस करायचे आणि वाट बघत बसायचं. काय? लगेच खड्डा खणायचा नाही. ती चर्चची घंटा दिसतेय?"
गोंधळलेला इव्हान वळून चर्चच्या घंटेकडे पाहतो.
"ती वाजली की खड्डा खणायला लागायचं. हम्म, पण पहिल्यांदा चर्चमध्ये जाऊन घंटा कसली वाजली ते विचारून यायचं समजलं? नाहीतर कुणाच्या लग्नासाठी घंटा वाजवतील आणि तू मेजवानी झोडायची सोडून, इथे खड्डा खणत बसशील. काय?
पण मित्रा एक गोष्ट ध्यानात घे. आपण चौकोन जरी पाच बाय दहाचे केले असले, तरी खड्डा मात्र तीन बाय आठ चा खणायचा. दोन मुडद्यांमध्ये सर्व बाजूंनी कमीत कमी चार फुटांचं अंतर हवं समजलं? नाहीतर एकमेकांत पाय अडकतात त्यांचे."
पुन्हा ग्रेगरी सात मजली हसतो. इव्हानला आता काय करावं हेच कळत नाही. तो ग्रेगरीने अर्धवट खणलेल्या खड्ड्याकडे बघत राहतो.

"पोरा, तू एवढा का विचारात पडलायस ते मला समजलं. खड्ड्याची खोली किती ठेवायची ते मी तुला सांगितलंच नाही. हे बघ, खोली कमीत कमी पाच फूट तरी हवी. मी खणत असताना जमीन माझ्या छाताडापर्यंत आली की मी थांबतो. पण तू तसं करू नको. तू पुरता जमिनीच्या आत जाईपर्यंत खणत राहा"
ग्रेगरीच्या एकंदरीत अवताराकडे पाहून घाबरूनच इव्हान हो म्हणतो.
"मुला, मदतनिसाची खूप गरज आहे बघ मला. मला स्वतःला मुलगा असता ना तर त्यालाच जुंपला असता बघ इथे. पण देवाची इच्छा. तो नाही तर तू. उन्हाळ्याच्या दिवसात ठीक आहे रे. पण पावसाळ्याच्या दिवसांत? खड्डा खणावा तर खाली दलदल होऊन जाते. एक माणूस काय काय करेल? खड्डा खणायचा का दलदल उपसायची मी? आताशा एकट्याने झेपत नाही दोन्ही. पण मित्रा, आता तू आलायस ना? आता काही चिंता नाही बघ. तू फादर जेम्स ला सांगून टाक. पेस्टरसारखी निरुपयोगी कामं मला नकोत. मला ग्रेव्ह-डिगर करा म्हणून."

"आपलं नाव काय? मी इव्हान." काहीतरी बोलायचं म्हणून घाबरलेला इव्हान बोलतो.
" मी ग्रेगरी. ग्रेगरी द ग्रेव्ह-डिगर. काय नाव म्हणालास तुझं? हं. इव्हान. तर इव्हान, हे काम म्हणजे खरंतर समाजकार्य आहे बघ. आणि सगळ्या समाजाला कधी न कधी उपयोगी पडणारं काम. राव असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब. शेवटी तो माझ्याकडेच येतो. मोठमोठी घरं, जमीन जुमले केले तरी माणसाला शेवटी किती जागा लागते?"
"पाच बाय दहा फूट" इव्हान उत्तरतो.
"चुकलास. मुडद्याला नेहमी आठ बाय तीन इतकीच जागा लागते. बाजूची तशीच सोडायची असते. वहीत लिहिताना आपण समास सोडतो ना? तशी. मुडद्यांचे पाय एकमेकांत अडकू नयेत म्हणून. किती वेळा तेच तेच सांगायला लागतं तुला? मन लावून सगळं काम करावं लागेल. हे काही पेस्टर सारखं सोपं काम नाही"

"लोक मुडदे घेऊन आपल्याकडे येतात. आपल्यासमोर ढसढसा रडतात. पण आपण रडायचं नाही. आपण फक्त खणायचं. काय? आधी आपण खणत खणत खड्ड्यात जायचं आणि मग मुडद्याला आत घालायचं. रडणारे एकेक मूठ माती टाकून घरी जातात. मग तो मुडदा आणि आपण. उरलेल्या मुठी आपल्याच भरायच्या. काल रडणारे उद्या हसत येतात. आपण बुजवलेल्या खड्ड्यावर फुलं ठेवायला. पण आपण हसायचं नाही. आपण खणत राहायचं, बुजवत राहायचं. त्या वेंधळ्यांना कळत नाही, उद्या त्यांचाही खड्डा खणावा लागणार आहे. हसतात लेकाचे. आपल्याला काय? जेवढे जास्त लोकं मरतील तेवढं चांगलं. जास्त खड्डे खणायचे, जास्त बुजवायचे"

"ग्रेगरी आता मला निघायला हवं. आपण नंतर कधीतरी बोलूया का?"
"पोरा, अशी घिसडघाई करून कसं चलेल? मी अजून तुला सगळी माहिती दिलीच नाही. आपल्या पंचक्रोशीत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये फक्त मीच एकटा ग्रेव्ह-डिगर आहे. जिथे मुडदा तिथे जावं लागतं. कोणत्याही दिवशी अगदी ख्रिसमस असेल तरीही आणि ईस्टर असेल तरीही. मी गेलोय ना कित्येक वर्ष ख्रिसमस लंच करून कबर खणायला. दोन-दोन, तीन-तीन दिवस प्रवास करावा लागतो खेचरांच्या गाडीतून कधी कधी. खड्डे खणायचे, बुजवायचे, खणायचे बुजवायचे. माझी बायको मला रोज सांगते सोड हे काम. शेती कर. दुसरी नोकरी कर, काहीही कर, पण हे काम सोड. पण मी ऐकत नाही. शेवटी पिढीजात काम आहे हे माझं."

घाबरलेला इव्हान आता काहीही ऐकण्याचा मनस्थितीत नसतो. तो तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो. ग्रेगरी चवताळून त्याच्या मागे धावतो आणि त्याला अडवतो.
"हरामखोरा, कुठे पळून चाललास? काय नाव म्हणालास तुझं? इव्हानच ना. इव्हान, लुच्च्या, लफंग्या, मला फसवून निघून चाललास? तुला नाही करायचं हे काम? भेकड. बायकोला घाबरतो. लंपट. माझ्यापासून पळतोस काय? पळून पळून किती पळशील? सगळ्या जगात कुठेही पळालास ना, तरी शेवटी इथेच येणार तू. सगळेच येतात. सगळे. तुझा तो फादर जेम्स पण येईल. काळजी करू नको. तुझ्यावरचा राग मी मनात ठेवणार नाही. तुझाही खड्डा खणेन. अरे, तुझा मुडदा असा उघड्यावर टाकला ना, तर सडेल. दुर्गंधी पसरेल इथे. कोल्ही, कुत्री खातील तुझा मुडदा. मी तसं होऊ देणार नाही. आणि हो तू मेलास म्हणूनही मी हसणार नाही आणि मला सोडून चाललास म्हणून मी रडणारही नाही. मी खणतच राहीन, खणतच राहीन आणि बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन."
ग्रेगरीची कुऱ्हाड अजूनच जोरात चालू लागते आणि खणत राहीन, बुजवत राहीन च्या किंकाळ्या.

इव्हान जीवाच्या आकांताने धावत चर्चमध्ये येतो. फादर जेम्स समोरूनच येत असतात. इव्हान त्यांना घडलेली घटना सांगतो. फादर जेम्स इव्हानच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे त्याला म्हणतात,
"इव्हान, ग्रेगरी हा आपल्या चर्चच्या ग्रेव्हयार्डचा ग्रेव्ह-डिगर होता. वीस वर्षापूर्वीच मागचं ग्रेव्हयार्ड बंद झालं. जावाबाहेर सिमेटरीही सुरू झाली. पण त्यापूर्वी एकदा ग्रेगरीला कबर खणायला गावाबाहेर जावं लागलं होतं. त्याची बायको गर्भार होती. तिची वेळ भरत आली होती. तरीही तो गेला, तिला एकटीला टाकून, पिढीजात काम करायला. बाळंतपणातच त्याची बायको मरण पावली आणि त्याचा नवजात मुलगाही. चार दिवसांनी तो परत आला तेव्हा त्यालाच त्याच्या बायकोची कबर खणावी लागली. चार दिवस तिचं प्रेत चिरनिद्रा घेण्यासाठी तिष्ठत होतं. तेव्हापासून तो भ्रमिष्ट झाला. ग्रेव्हयार्ड बंद झाल्यानंतरही तो रोज इथे येतो, खड्डे खणतो आणि खड्डे बुजवतो. त्याला घाबरू नकोस. तो तुला काहीही इजा करणार नाही."

कॉर्क गावातलं कॅसलहेवन चर्च अजूनही एखाद्या चित्रासारखं दिसत असतं आणि त्या शांतता भंगणाऱ्या, खणत राहीन, बुजवत राहीन, च्या किंकाळ्या.

- कोहम

------------------------------------------------------------

हे लिखाण पूर्णपणे काल्पनिक असून, कोणत्याही इंग्रजी कथेचे भाषांतर नाही. मुळात हे भाषांतर नसल्याने ही टीप लिहिण्याची गरज नव्हती, म्हणून आधी लिहिली नव्हती. शब्दयोजना मुद्दामच भाषांतरासारखी योजली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती करता येईल. पण बऱ्याच वाचकांना हे भाषांतर असल्यासारखे वाटले म्हणून हा खुलासा.

------------------------------------------------------------

Friday, July 13, 2007

तोलोलिंग

आजची रात्र कालच्यासारखी वादळी नाहीये. वारा साफ पडलाय. आभाळही निरभ्र आहे. काल इथेच ढगांची भाऊगर्दी झाली होती हे कोणाला खरं वाटेल? रात्र असूनही समोरची बर्फाच्छादित शिखरं स्पष्ट दिसतायत. चांदण्या रात्री चमचमणारा बर्फ म्हणजे डोळ्यांना मेजवानीच नाही का? पण आज? नाही. आज ही शिखरं ढगांच्या आड जातील तर बरं असंच वाटतंय.

आकाशातली ही ताऱ्यांची आरास नजरेआडच राहिलेली बरी. कधी केली होती माझ्या घराला मी अशी आरास? दिवाळीत? होय, गेल्या दिवाळीतच. दारात काढलेली रांगोळी, त्या रांगोळीच्या शेजारी ठेवलेल्या पणत्या, फराळाचे पदार्थ? नकोच तो फराळाचा विचार. मेलेली भूक पुन्हा जिवंत व्हायची. आणि काय बरं केलं होतं गेल्या दिवाळीत? शकूबरोबर उडवलेले फटाके. होय फटाकेच. हा फटाक्यांचा आवाज कुठून येतोय? इथे? फटाके?.....

आजूबाजूच्या डोंगरमाथ्यावरून कव्हर फायरिंग सुरू झालं वाटतं? म्हणजे आमची दुसरी तुकडी जवळ आली असणार. किती जवळ? खालच्या रिज पाशी? नाही शक्य नाही नाहीतर डोक्यावरून गोळ्यांचा पाऊस पडताना दिसला असता. बरेच दूर असावेत. थांबलं फायरिंग. नसतीलच जवळपास. नाहीतर फायरिंग थांबलं नसतं लगेच. किती शांत वाटतंय आता? जसं काही शांततेनेच आपली बंदूक त्या फायरिंग करणाऱ्याच्या कानशिलाला लावून चाप ओढला. काश....

आम्ही सगळे एकमेकांशी नजरेनेच बोलतोय. टोकाचे दोघे वाकून कोणी जवळ नसल्याची खात्री करतात. खरंतर तिथून काहीच दिसत नाही. पण खात्री केलेली बरी म्हणून. नक्कीच फायरिंग आजूबाजूच्या डोंगरातून झालं. डोक्यावर तोलोलिंग शांतपणे निद्रिस्त झाल्यासारखा वाटतोय. टोकाचे दोघे मध्ये येऊन बसतात. मी एक रिकामा झालेला कोपरा पकडतो. मोठी विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तोलोलिंगच्या एवढे जवळ आहोत, पण तिथे पोहोचू शकत नाही. ना खाली परतू शकत. शत्रूच्या बंदुकींना माहितेय आम्ही इथे आहोत. पण त्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. मागच्या खडकाचा भक्कम आधार आणि समोरचा फ्री फॉल आम्हाला सुरक्षित ठेवतायत. गेले दोन दिवस.

आज तारीख किती? चोवीस का पंचवीस? चौदा मे ला बातमी आली की कारगिलमध्ये घुसखोरी झाली म्हणून. मग १२१ ब्रिगेडच्या कमांडरनं दिलेली माहिती की फक्त सात आठ घुसखोर आहेत तोलोलिंगवर, त्यांना बखोटीला पकडून खाली खेचून आणा. फक्त सात आठ? मग शिवशिवणारे हात, सळसळणारं रक्त आणि एवढं एवढंसं होणारं मन. मग निघताना घरच्यांसाठी लिहिलेलं पत्र. समजा आपण परतलोच नाही तर घरी पाठवायला. पोहोचलं असेल का आता ते पत्र? नसेल पाठवलं. मिसिंग म्हणजे नॉट नेसेसरीली डेड. पण अजून किती दिवस मिसिंग? किती दिवस? अजून दोन, चार? का कायमचा?

घोंघावू लागलेला वारा मला भानावर आणतो. समोरच्या डोंगरातून फायरिंगचे आवाज येतातच आहेत. सगळ्या गोळ्यांचा उद्देश एकच. तोलोलिंग. तोलोलिंग, सोळा हजार फूट उंचीवर असलेलं. कारगिल जिल्ह्यातील एक शिखर. भारताच्या उन्हाळी चौक्या इथे बसत. हिवाळ्यात रिकाम्या केल्या जात. मीही आलो होतो ह्या भागात. पण आज? एक वेगळंच ध्येय, एक वेगळीच कामगिरी. इथून समोरचा श्रीनगर लेह मार्ग नजरेच्या आणि तोफांच्याही पट्ट्यांत.

पायात घातलेले बूट लागत होते कालपर्यंत. चालून चालून झालेल्या जखमा. बर्फदंश. आज मात्र सगळंच बधिर झालंय. सोळा हजार फूट उंची. -५ ते -११ डिग्री तापमानात चढायचं म्हणजे हट्ट्या कट्ट्या जवानालाही अकरा तास लागणार कमीत कमी. आम्हाला किती वेळ लागला? सगळी गणतीच खुंटलेय. कुठे सुरवात केली, कसे इथे पोहोचलो, काही काही आठवत नाहीये. आठवतायत फक्त वरून रोखलेल्या बंदुका, माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्या, वरून येणारे हातबाँब, कोसळणारे दगड. आठवतायत माझे आईवडील, बायको आणि हो शकू. गोळ्या इथे बरसत होत्या. ते माझ्या गावात सुरक्षित आहेत. पण दोघांचं लक्ष्य एकच. मी. आणि हो. आठवतायत तोलोलिंगवर मरून पडलेले माझे साथीदार. त्या माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर पडलेल्या माझ्या साथीदारांच्या शवांसाठी मला जगायचंय, मला लढायचंय, मला तोलोलिंग जिंकायचंय.

बाजूलाच माझा बॅकपॅक पडलाय. काहीतरी घडण्याची वाट पाहतोय बिचारा. निघालो तेव्हा पंचवीस किलोचा होता. आता किती? नक्कीच कमी झाला असणार. अन्न, पाणी, हातबाँब, सगळं संपलंय. ऍकॅडमीत शिकवलं होतं. चालायला सुरवात केल्यावर थोडा वेळ बॅकपॅकचं वजन वाटतं. थोड्या वेळाने मात्र तो शरीराचाच एक भाग होऊन जातो. खरंच. पण किती विरोधाभास आहे त्यांतसुद्धा? खालून निघताना कमीत कमी वजन असावं असं वाटतं. आता इथे वाटतंय पंचवीस किलोपेक्षा थोडं जास्त घेता आलं असतं तर? अजून थोडं अन्न? पण शेवटी ट्रेड ऑफ करावा लागतो. दोन किलो अन्न की शंभर बुलेटस? अन्न नसेल तर भुकेने मरणार, गोळ्या नसतील तर शत्रूच्या गोळीने मरणार. कसं मरायचं? उघड्या बॅकपॅकमधल्या गोळ्यांकडे मी बघत राहतो.

पोटातले कावळे आता ओरडण्याच्या पलीकडे गेलेत. किंवा ते गारठून मेले असतील. पण मला मरायचं नाहीये. नाही मरायचं मला. नकळत हात खिशाकडे जातो. मी एक सिगरेट काढून शिलगावतो. वाह! काय हल्लक वाटतंय. आता हेच अन्न आणि हीच करमणूक. मी जर ह्या सिगरेटच्या धुरासारखा असतो तर? असाच हल्लक होऊन वरपर्यंत गेलो असतो. तोलोलिंगवर. त्या भडव्यांच्या डोक्यात गोळ्या घालूनच शांत झालो असतो. शेजारचा सिगरेटचा झुरका मागतो. मी पुन्हा भानावर येतो. पुन्हा एकदा आजूबाजूला कोणी नाही ह्याची खात्री करून घेतो. आमच्या बंदुकींचा सामना केल्याशिवाय इथे पोहोचणं अशक्य आहे. शक्य असतं तर दोन दिवसात एकदातरी आलेच असते.

आजूबाजूला प्रकाश वाढत चालल्यासारखा वाटतोय. अजून एक सकाळ. अजून एक रात्र. किती वेळ थांबायचं? वाटतं सरळ ह्या खोपच्यातून बाहेर पडावं, झेलाव्यात छातीवर शत्रूच्या गोळ्या आणि संपवून टाकावा हा उंदीर मांजराचा खेळ. जाता जाता शत्रूच्या दोघा तिघांनाही घेऊन जावं. माझ्यासारखेच असतील का ते दोघं तिघं? देशासाठी मरायला तयार असलेले पण तरीही मरायला तयार नसलेले? असतील का त्यांची घरं माझ्यासारखी? त्यांचे परिवार माझ्यासारखे? नक्कीच असतील. मग कशासाठी हे सगळं? त्यांनी मला मारलं तर माझ्या लोकांचे शिव्याशाप त्यांना. मी त्यांना मारलं तर त्यांच्या लोकांचे शिव्याशाप मला. हे असंच व्हायला हवं का?........

..... सर .... आमच्या पाठीशी दोन दिवस संरक्षक म्हणून उभ्या असलेल्या खडकाच्या भेगेतून आवाज येतो. हा खडक सरळ वरपर्यंत एकसंध आहे आणि त्यात ही भेग वरपर्यंत..... हमारे पास हथियार नही है. आप उपर आके आपके ऑफिसरकी बॉडी ले जाईये ........ पाठीमागून छद्मी हसण्याचा आवाज. आवाजातला खुनशीपणा स्पष्ट जाणवतोय. आमच्या हतबलतेला हसतोय साला. अरे गांडीत दम असेल तर ये ना खाली...... हम सिर्फ अपने ऑफिसरकी नही, तुम्हारीभी बॉडी लेकर जायेंगे...... आमचा कॅप्टन गरजतो. गोठलेलं रक्त पुन्हा सळसळू लागतं. थकलेले बाहू पुन्हा स्फुरण पावू लागतात, कारण मला लढायचं असतं. त्या हुकलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर बेवारस पडलेल्या माझ्या मित्रांच्या शवांसाठी. माझ्या देशासाठी. आणि हो माझ्यासाठी.

सकाळ आता चांगलीच भरात येत असते. आणखी एक रात्र, आणखी एक सकाळ, आणखी एक युद्ध. शत्रूशी नि स्वतःच्या मनाशी. तोलोलिंग, तोलोलिंगसाठी.

-----------------

१३ जून १९९९ रोजी तोलोलिंग भारतीय सेनेने पुन्हा जिंकलं. कारगिल युद्धात कामी आलेल्या एकूण जवानांपैकी अर्धे जवान तोलोलिंग घेताना मृत्युमुखी पडले. ही लढाई ३२ दिवस चालली. सुरवातीच्या लढाईत तेवीस वर्षीय कॅप्टन सचिन निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माघार घेत, तीन दिवस, एका अशा ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता, की जिथे, समोर खोल दरी आणि पाठी कडा होता. ह्या ठिकाणाहून आपले जवान आणि शत्रू एकमेकाला बघू आणि बोलूही शकत होते. त्या प्रसंगावरून बेतलेले हे लिखाण आहे. पण मूळ संकल्पनेशिवाय बाकी सर्व लिखाण हे काल्पनिक आहे.

------------------

Friday, June 29, 2007

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग २)

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग 1)

परदेशात गाडी चालवण्याचा अनुभव नगण्य होता. त्यामुळे मनावर नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण होतंच. आज गाडी भाड्याने घ्यायची आणि उद्या परीक्षा द्यायची आणि उद्या संध्याकाळी गाडी परत करायची असं ठरलं. मी ऑफिसातून निघता निघताच धो धो पाऊस पडायला लागला. छत्री बाळगणं हे मी लहानपणापासून कमीपणाचं लक्षण मानत आलेलो आहे. त्यामुळे भिजत भिजतच मी त्या भाड्याने गाड्या देणाऱ्या स्वस्तोत्तम कंपनीच्या दुकानात शिरलो.

आतमधला कर्मचारी चिनी होता. त्याने माझ्या अवताराकडे बघून एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला. बहुदा या आधीची नोकरी त्याने पुण्यात केली असावी. किंवा माझ्या अवताराकडे बघून एकंदरीत ह्या माणसाची लायकी फार फार तर गाडी धुण्याची असू शकेल असा त्याचा समज झाला असावा. मी बुकींग केलेले आहे हे मी त्याला सांगू लागलो. ते त्याला समजेपर्यंत, आणि मी सांगतोय ते त्याला समजलंय, हे मला समजेपर्यंत, थोडा वेळ गेला. आपण कितीही हिंदी चिनी भाई भाई असं म्हटलं, तरी हे भाई जेव्हा एकमेकांशी इंग्रजीत बोलायला लागतात, तेव्हा ह्या भाईचं त्याला आणि त्या भाईचं ह्याला काही कळत नाही. आम्हा बांधवांची परिस्थिती ह्याहून अधिक वेगळी नव्हती.

शेवटी हो नाही करता करता, सोपस्कार पार पडले. त्याने माझ्याकडे पैसे मागितले. ते बहुदा बरेच डॉलर आणि पंधरा सेंट असे काहीतरी होते. पैसे भरण्याकरता मी त्याला माझं बँकेचं कार्ड दिलं. त्या कार्डाला इथे EFTPOS असं म्हणतात. ते कार्ड पाहून हा भाई "एपॉ" "एपॉ" असं काहीतरी बरळायला लागला. मला काहीच कळेना. शेवटी त्याच्या उच्चारांवरून आणि हावभावांवरून तो वरचे पंधरा सेंट सुटे मागतो आहे असा माझा समज झाला. म्हणून मी सुटे पंधरा सेंट काढून त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून तर तो शब्दशः वैतागला. आम्हा एकमेकांना इंग्रजी अजिबात येत नसल्याचा, आमच्या दोघांचाही समज झाला आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

शेवटी तो ते कार्ड EFTPOS आहे हे का Credit हे मला विचारत होता हे मला कळले. गैरसमजाचा आट्यापाट्या संपून मी त्याला पैसेही दिले. त्याने मला गाडीची चावीही दिली आणि मी जाणार, इतक्यात मला त्याने, मी गाडी कुठे घेऊन जाणार असं विचारलं. आपण पडलो "सत्याजीराव". खरं काय ते सांगितलं. त्यावर त्याने "कसं पकडलं" अशा आशयाचे काहीतरी भाव चेहऱ्यावर आणत चावी माझ्या हातातून घेतली. पैसे परत केले आणि मी लायसन्स च्या परीक्षेला त्यांची गाडी घेऊन जाऊ शकत नाही हे जाहीर केलं.

परीक्षा दुसऱ्या दिवशी होती म्हणून बचावलो. लगेच घरी गेल्यावर इंटरनेटवर दुसरी एक स्वस्तोत्तम कंपनी निवडली आणि गाडी बुक केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच परीक्षेच्या दिवशी मी जाऊन ती माडी भाडं भरून घेतलीसुद्धा. ह्यावेळी माझ्या, तिथल्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संभाषणात मी परीक्षेचा "प" देखील येऊ दिला नाही. सोबत शहराचा नकाशाही मागून घेतला. इंटरनेटवरून, त्या दुकानापासून परीक्षेच्या ठिकाणापर्यंतचा, मार्गही काढून घेतला. एकदम सोपा रस्ता होता. तुरक रोडवरून फ्रीवेला लागायचं आणि मग वारिगल (Warrigal) रोडला डावीकडे वळायचं. वर तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल अशी माहितीही मिळवली.

गाडी मी चालवणार असल्याने आणि माझा रस्ते आणि दिशा ह्यांचा अंदाज वादातीत वाईट असल्याने, मी दीड तास आधीच निघालो. तुरक रोड येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. फ्रीवेला लागलो. पहिली पाटी दिसली त्यावरच "वारागल" (Warragul) असं लिहिलेलं दिसलं आणि बाण सरळ दाखवला होता. म्हटलं चला आता पाट्या बघत बघत योग्य ठिकाणी पोहोचू. जरा हायसं वाटलं. दहा मिनिटं झाली, पंधरा झाली, अर्धा तास झाला. तरी आपलं वारागल सरळ दिशेने असल्याच्या पाट्याच येत होत्या. हळूहळू काहीतरी चुकत असल्याचा संशय यायला लागला. कारण फ्रीवेवर फक्त दहा मिनिटं जायचं होतं आणि अर्धा तास होवून गेला होता. पुन्हा एक पाटी आली आणि पुन्हा तेच. वारागल सरळ दिशेने. काहीच कळेना. शेवटी मी मोबाईल फोनवरून एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं. त्याच्या म्हणण्यानुसार मला ज्या रोडवर (Warrigal) जायचं होतं तो बरीच योजने मागे राहिला होता. आणि मी मूर्खासारखा वारागल (Warragul) च्या दिशेनं चाललो होतो.

त्याच्या सूचनेप्रमाणे मी गाडी वळवली आणि विरुद्ध दिशेने परतू लागलो. थोड्या वेळाने मला अपेक्षित असलेला वारीगल रोड आला. येताना वारीगल रोडवर डावीकडे वळा असं इंटरनेटच्या सूचनांमधे लिहिलेलं होतं. त्यामुळे उलट दिशेने येताना उजवीकडे असा विचार करून मी उजवीकडे वळलो आणि परीक्षेचं ठिकाण दिसतं का ते पाहू लागलो. पुन्हा तेच. जी जागा पाच मिनिटात यायला हवी होती, ती जागा पंचवीस मिनिटं झाली तरी येईना. तितक्यात मी वारीगल रोडला क्रॉस होणाऱ्या एका रस्त्याचं नाव पाहिलं. त्या रस्त्याचं नाव वाचून तर मला चक्करच यायची बाकी राहिली. कारण तो रस्ता दुसरा तिसरा कुणीही नसून ज्या रस्त्याने मी फ्रीवेला लागलो तो तुरक रोड होता. म्हणजे गेला तासभर ड्रायव्हिंग करत मी जिथून निघालो होतो तिथेच परत पोचलो. परीक्षा तीन वाजता सुरू होणार होती आणि आता सव्वा तीन वाजले होते.

पुढच्या गल्लीत गाडी वळवली आणि थांबवली. मित्राला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला. पण हाय रे दैवं. हॅलो म्हणताक्षणी माझ्या फोनच्या बॅटरीने मान टाकली. आता झाली का पंचाईत. बोंबला. आता करायचं तरी काय? शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीबरोबर घेतलेलं नकाशाचं पुस्तक उघडलं. ते कसं वाचायचं हे समजल्यावर मी वारीगल रोडवर डाव्या बाजूला वळण्याऐवजी उजव्या बाजूला वळलो हेही समजलं. घड्याळात साडेतीन झाले होते. खरंतर परीक्षेचेच बारा वाजले होते. पण मनात विचार केला, जाऊन तर बघू.

शेवटी चार ला पाच मिनिटं असताना मी परीक्षेच्या ठिकाणी पोचलो. मला माहीत होतं की चूक माझी होती त्यामुळे पुन्हा परीक्षेची वेळ घेणं क्रमप्राप्त होतं. माझं गाडी भाड्यानं घेण्याचं आणि स्वस्तात परीक्षा देण्याचं गणित चांगलंच चुकलं होतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या अभिनयक्षमतेचा पुरेपूर वापर करायचं मी ठरवलं. आतमध्ये जाऊन, अधिकाधिक भारतीय ऍक्सेंट काढत, मी माझी आता ड्रायव्हिंगची परीक्षा असल्याचं सांगितलं. समोरचा माणूस माझ्याकडे "आ" करून बघायलाच लागला. तो म्हणाला की दिवसाची शेवटची परीक्षा तीन वाजता होते आणि साडेचार वाजता आमचं ऑफिस बंद होतं.

आता "आ" करायची वेळ माझी होती, कारण आता माझी परीक्षा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तितक्यात मला एक नवकल्पना सुचली. मी परीक्षेची वेळ फोनवरून घेतली असल्याने, मला फोनवर चाराची वेळच देण्यात आली, अशी चक्क मी लोणकढी थाप ठोकली. हे करताना मी जड भारतीय ऍक्सेंटचा पुरेपूर वापर करण्याची काळजी घेतली. वर जितका शक्य आहे तितका केविलवाणा चेहरा केला. बहुतेक समोरच्या माणसाला माझी दया आली. मला बहुदा इंग्रजी नीट समजत नसल्याने माझा घोटाळा झाला असावा असा बहुदा त्याने समज करून घेतला. चक्क त्याने मला आजची वेळ बदलून उद्या दुपारची दिली (म्हणजे गाडी परत करायच्या वेळेआधीची). उपकृत भाव चेहऱ्यावर घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी तासभर आधीच तिथे पोचलो. परीक्षा झाली. माझ्या अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे म्हणा, शंभरी पंचाण्णव होतात तसा मीही पास झालो. लायसन्स मिळालं.

तात्पर्य. इंटरनेटवरून पत्त्यापर्यंत पोचवणाऱ्या सूचना घेऊ नयेत. घेतल्यास त्या तंतोतंत पाळाव्यात. विशेषतः रस्त्यांच्या नावांची स्पेलिंग्ज काळजीपूर्वक पाहावीत. नाहीतर "वारी"गल च्या ऐवजी "वारा" गल च्या पाठी लागून आमच्यासारखी हवा टाइट होते. तेही जमले नाही, तर आपली अभिनयक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा.

Friday, June 22, 2007

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल

समजा आपण चालवत असलेलं वाहन, सिग्नल लाल झाल्यावरही न थांबता पुढे गेलं. म्हणजे अशी चूक आपल्याकडून होणं शक्यच नसतं, पण गाडीच वेळेत थांबू शकली नाही (चूक नेहमी गाडीचीच असते) आणि आडवळणाला बसलेला समस्त वाहनचालकांचा मामा, हातवारे करत आपल्याला थांबवायला लागला, (आणि आपण थांबलोही) तर तो आपल्याकडे सर्वप्रथम कोणती वस्तू मागेल? अचूक ओळखलंत. ड्रायव्हिंग लायसन्स.

भारतात असेपर्यंत ते लायसन्स मिळवणे आणि ऐच्छिकरीत्या ते जवळ बाळगणे किंवा न बाळगणे ह्यात कठिण असं काही नव्हतंच. त्या सर्वातलं काठिण्य "चिरी मिरी" ह्या एका संकल्पनेनं नष्ट करून टाकलं होतं. पण भरताबाहेर अशी संकल्पना अस्तित्वात असल्याची खात्री नव्हती आणि असलीच तरी ती आपल्या खिशाला परवडणार नाही ह्याची खात्री होती. त्यामुळे इथे माझ्या किंवा गाडीच्या चुकीने सिग्नल तुटलाच, इथल्या मामाने (खरंतर अंकलच म्हणायला हवं) थांबवलंच, तर त्याला भारतीय लायसन्स कसं दाखवायचं?

मुळात तसं मी ते दाखवलंच तर ते लाल रंगाचं पुस्तक म्हणजेच लायसन्स असल्याचं त्याला पटवून द्यावं लागेल. समजा त्याला ते पटलंच आणि त्याने ते उघडून वाचलं, तर आत लिहिलेली अगम्य लिपी त्याला समजावी तरी कशी? आणि समजा ती लिपी रोमन असून भाषा इंग्रजी आहे, हेही मी त्याला पटवलं. तरी काय लिहिलंय हे फक्त लिहिणाऱ्यालाच कळावं (बहुदा त्यालासुद्धा कळू नये) अशा सांकेतिक पद्धतीने लिहिलेलं असल्यामुळे, ते वाचणं किंवा वाचून दाखवणंही अशक्य कोटीतलं होतं.

राहून राहून माझा फोटो मात्र त्या अंकलला दिसला असता. पण तो अठराव्या वर्षी काढलेला असल्याने, आणि माझ्या आणि त्या फोटोच्या वयोमानात आणि माझ्या आकारमानात आणि वस्तुमानात बराच फरक झालेला असल्याने, त्या फोटोतला तो मीच हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याजवळ नसल्याने, इथे नवं ड्रायव्हिंग लायसन्स काढावं हे उत्तम, हे मी ठरवलं.

त्या अनुषंगाने मी माहिती काढायला सुरवात केली. काही अनुभवी व्यक्तींनी मला ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स काढायचं सुचवलं. पण मला गाडी चालवता येत असताना, असल्या कोणत्याही स्कूलचा विद्यार्थी होणं माझ्या तत्त्वात बसणारं नव्हतं. आणि ते ड्रायव्हिंगचे धडे आणि परीक्षेकरता आकारत असलेली फी बघून, मी ही फी वाचवली तर तेवढ्यात एक सेकंड हँड खटारा गाडी येऊ शकेल, हे माझ्यातल्या एकारांताने बरोबर ताडलं. त्यामुळे मिशन लायसन्स स्वतःच पूर्ण करण्याचं मी ठरवलं.

पुढे अशी माहिती हाती आली की लायसन्स मिळवण्याकरता तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. देशात लायसन्स मिळवण्यासाठी द्यावयाच्या परीक्षेशी तुलना करता, बहुतेक इथे लायसन्स म्हणून बॅचलर ऑफ ड्रायव्हिंगची पदवी देत असावेत असा एक विचार मनात येऊन गेला आणि मी काळी कोट टोपी घालून लायसन्सदान समारंभात माझं लायसन्स स्वीकारतोय वगैरे बाष्कळ विचार माझ्या मनात तरळायला लागले. अपुरी स्वप्न अशी नको तिथे डोकं वर काढतात बघा.

मग पुढे असं कळलं की पहिली परीक्षा म्हणजे थिअरी. म्हणजे सगळे नियम वगैरे पाठ करून जायचे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संगणकावर उत्तरं द्यायची. म्हणजे करोडपती कार्यक्रमाप्रमाणे काँप्युटरजी आपल्याला एक प्रश्न आणि चार उत्तरं देणार आणि आपण त्यातून योग्य पर्याय निवडायचा. फक्त दुर्दैवाने लाइफलाइन्स उपलब्ध नव्हत्या. दुसरी परीक्षा म्हणजे ड्रायव्हिंग सिम्युलेशनची. तुम्ही कधी गाडीचा व्हिडिओगेम खेळलायत का? तसाच व्हिडिओगेम समजा. फक्त हा गेम खेळायला घसघशीत रक्कम फी म्हणून भरायला लागते आणि पहिल्या प्रयत्नात चांगला खेळता आला नाही. म्हणजेच खेळता खेळता आपलाच गेम झाला, तर पुन्हा पुन्हा खेळावा लागतो, पुन्हा पुन्हा ऐसे भरून.

तर अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा बालपणापासून व्हिडिओगेम्स खेळायच्या सवयीमुळे म्हणा, शंभरातील नव्याण्णव लोकांप्रमाणे मी पहिल्या दोन परीक्षा उत्तीर्ण झालो. म्हणजे खेळाडू जसे मुख्य सामान्याआधी सराव करतात तसा हा मुख्य ड्रायव्हिंगच्या परीक्षेचा सराव होता.

आता ड्रायव्हिंगची परीक्षा द्यायची म्हणजे पहिली सोय गाडीची करायला हवी. गाडी नाही तर मी मरायला लायसन्स का काढत होतो असा क्षुद्र विचार काही अतिउच्च बुद्धिमत्तेच्या वाचकांना पडल्यावाचून राहणार नाही. पण गंमत अशी होती, की माझे भारतीय लायसन्स इथे चार महिन्यावर चालत नाही, त्यामुळे गाडी नसली तरी घाईघाईने लायसन्स काढणे आवश्यक होते. पुन्हा तुम्ही अतिउच्च बुद्धिमत्ता असलेले वाचक असाल, तर तुम्हाला प्रश्न पडेल की, जर हाती गाडीच नाही, तर भारतीय लायसन्स नाही चालले तर बिघडते कुठे?

पण इथेच तर खरी गोम आहे. जर माझे भारतीय लायसन्स निरुपयोगी झाले असते तर ड्रायव्हिंगची परीक्षा देण्याकरता मला शिकाऊ म्हणजेच लर्निंग लायसन्स काढून महिनाभर चिपळ्या वाजवत बसावे लागले असते आणि मगच परीक्षा देता आली असती. शिवाय ह्या सगळ्या प्रकाराला बरेच पैसेही जास्त पडले असते. मी पडलो गरीब बिचारा नवखा स्थलांतरित (मायग्रंट) आणि त्यात एकारांत (म्हणजे आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी अवस्था), म्हणूनच पैसे वाचवण्याकरता ही सगळी घाई. काहींना का कंजूषपणाही वाटू शकेल. पण बऱ्याचशा परदेशस्थ देशी आणि एकारांत अतिउच्च बुद्धिमत्तेच्या लोकांची समजूत पटली असेल. कारण शेवटी हे पटायला, तेथे पाहिजे जातीचे.

आता संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी ह्या न्यायाने माझ्या लायसन्ससाठी गाडीपासून तयारी सुरू करणे आवश्यक होते. इंटरनेटवर बरीच शोधाशोध करून स्वस्तोत्तम अशी एक गाडी भाड्याने देणारी कंपनी शोधून एक गाडी परीक्षेच्या दिवसापुरती भाड्यावर घेण्याचे ठरवले. त्या कंपनीला तसे कळवले. परीक्षेसाठी फी भरली आणि वेळ घेतली. आता सगळी तयारी झाली. दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी परीक्षेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला.



(क्रमशः)

Friday, June 08, 2007

राम नाम सत्य है

ogaराम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुणीकडं वाट चुकलात जणू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पाणी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल राव उगा. पण गुडघापण डुबणार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली होती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुम्ही? किती वार सांगू पानी न्हाई इथं.

हां पण एक येळ व्हती जेव्हा ही हिर पाण्याने तुडुंब भरायची. माझा बाप मोट मारायचा आणि मी पाणी चारायचो ऊसाला. दुपारच्याला सगळे लोक इस्वाटयाला पडले मी हळूच हिरीत उतरायचा. पवायला. ह्या हिरीनंच आपल्याला पवायला शिकिवलं. बाहेर रणरणतं ऊन असलं तरी आत गारेगार वाटायचं. इथंच अख्खा दिवस पडून राहावंसं वाटायचं. पण पुन्हा ऊनं उतरली की परत पाण्याला लागायचं. बाप पुन्हा मोटंला भिडायचा, मी माझ्या हीरीचं थंडगार पाणी ऊसाला चारायचा.

मंग? काय सोपं हुतं का राव? जरा हाताबुडी आलो, तसा मोट माराया शिकिवली बापानं. पयल्यांदा लै मजा यायची. वाटायचं, आता आपण बापया मानूस झालो. मोट माराया लागलो. हळुहळू त्याचाही कट्टाळा यायला लागला. पण बामनाला पोट अन मळेकऱ्याला मोट कधी चुकलेय का? न्हाई न वं? मग मोट मारता मारताच मी माझ्या हीरीवर पंप बसवून घ्यायची सपान बघायचो. घरात बिजली, हीरीवर बिजली, आताच्या डबल टेपल रान. बराचसा ऊस, थोडी पालेभाजी, कधी रानं फिरवायला टमाटं. एकदम पाटलाच्या रानावानी सगळं फुलल्यालं दिसायचं. बैलं हिसडा द्याया लागली की माजी तार मोडायची.

मंग एक दिवस ह्या हीरीसमोरच्या खोपीत बसल्यालं असताना माय म्हणाली, लगीन ठरावलंय माजं. काय सांगू पाव्हणं? गुदगुल्याच झाल्या जणू. शेताच्या बांधाव पाय सोडून बसल्यावर पायाशी एकदम मांजराचं पिलू बिलगावं तशा गुदगुल्या. गावंदरीजवळचं रान करणाऱ्या महादू जाधवाची लेक, चंद्राक्का. काय लाजाया झालं मला? तसाच उठून हिरीकडे आलो. आपल्याला कुठलं जीवलग दोस्तं? ही हिर आणि दोन बैलं हीच आमची दोस्तं. त्यांनाच पहिली सांगिटली ही बातमी. मी न्हवरा अन चंद्री नव्हरी. पुढं चंद्राशी भांडाण झालं की हिरीलाच सांगायचो की मी. मग माझी चूक असंल, तर दुपारची भाकरी चंद्री कोणाबरोबर तरी लावून द्यायची रानाकडं. तिची चूक असंल तर मात्र सवता याची रानाकडं बुट्टी घेऊन. ती रांड, शाळंत शिकलेली. विंग्रजीत सोरी म्हणायची. मग मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकरी ग्वाड ध्वाड लागायची. वर मी माझ्या हिरीचं पाणी गटागटा प्यायचा.

अशीच एकदा नांगरणीची धावपळ चालली होती. आभाळ उतराया झालं होतं. बरंच काम अडून राहिलेलं. दुपारच्याला खोपीत मी भाकरी खाऊन इस्वाट्याला पडलेला. पाण्याला म्हणून हीरीकडं आलो. माय तेव्हा शेवंतीकडं गेली होती शेवगावाला. शेवंती म्हणजे थोरली बहीण माझी. तर चंद्री हीरीपाशी आली नि म्हणाली मायला बलवून घ्या, अन येताना चिच्चा, बोरं घेऊन या. मी धाडलं बलवणं. हे चिच्चा, बोरं काय मला समजेनात. मग एकदम डोक्यात बिजली चमकली. कालपर्यंत पोरया असलेला मी आता बाप व्हणार होतो.

मोट मारता मारता परत इचार सुरू व्हायचे. मुलगा झाला तर बरं हुईल. त्याला मी शाळंत घालेन आमच्या चंद्रीवाणी. मग तो हाताबुडी येईल. शिकून सायब हुईल. हां, पण तो रान करायचा सोडणार नाही. शेतीपण करेल. हिरीवर पंप बसवेल. मंग मला मोट नाही माराया लागणार. मग पंप पाणी खेचेल, मी शेताला पाणी पाजेन आणि तो गावाची सगळी कामं बघेल. नांगरणी, पेरणीला आम्ही दोघं झटक्यात रान उरकून टाकू. सोबतीनं कुळव हाणू, बैलांना पाला कापू, शेणं भरू. जीवाला थोडा इस्वाटा पडेल. पण कसचं काय राव? झाली पहिली बेटीच. पण फुलासारखी नाजूक, मोगरीच्या फुलासारखी. आणि मधावानी ग्वाड लेक. पण हिच्या आईला काय धाड भरली जणू. रांडेनं दगडू नाव ठिवलं पोरीचं. नजर लागाया नगं म्हणून.

मग एकापाठोपाठ एक पाच पोरं झाली. चार लेकी आणि योक ल्योक. घरचं रान कमी पडाया लागलं मंग शेजारचं रान फाळ्यावर घेतलं. तरीपण पैसं कमी पडाया लागलं. वाटलं पोरांची शाळा काही हुईत नाही. पण हिमतीनं पोरींना चवथी केलं. मंग काय करायची त्यांना शाळा. दुसऱ्याचं धन ते. पोराला मात्र फूडच्या शाळंत घातलं. येगळं मास्तर लावलं शिकवणीला. पोरगा शिकिवला पायजे. मग तो हीरीवर पंप आणेल. माझं कंबरडं तर पार मोडून गेलं की हो जलमभर मोट मारून मारून.

हळूहळू साठवणीचं पैसं संपाया लागलं. घरच्या रानातबी काही राम राहिला नाही. त्येच्या आईला त्येच्या, पूर्वीसारखं पीक देईना झालं. शेजारच्या रानाच्या मालकाने रानाचा फाळाबी वाढावला. त्या रानाच्या पिकात वरीसाचा फाळाबी निघेना झाला. मंग करावं तरी काय? बरं पावासाचं पण पूर्वीसारखं राहिलं नाही. खतं, चांगलं बी बियाणं आणाया पैसं नाहीत. आलेलं पीक शेरातला दलाल म्हणेल त्या भावाला इकायचं. शेवटी हातात काही उरायचंच नाही.

फार घोर लागून राहिला बघा जीवाला. घर ढांकंला लागलं जणू. अन हा घोर सांगणार तरी कोणाला? हल्ली मी माझं घोर या हिरीला सांगायचं बी बंद केलाय. ती बिचारी काय करनार? तेव्हा शेजारच्या रानातला शिरपा तिथं आला हुता. म्हणाला मायबाप सरकार कर्ज देणार आहे मळेकऱ्यांना. निविडणुका आल्या हुत्या ना तेव्हा. ईजबी फुकाट मिळणार म्हणून सांगत होता. पाटलाला म्हणे तेव्हा फुकाट रकमेचं बिल मायबाप सरकारनं पाठिवलं होतं. कितीबी ईज वापरा पैसं द्याया लागनार न्हाई. त्येच्या आयला त्येच्या ह्या शिरप्याच्या बेणं नको त्या वाटंनं घिवून गेलं मला. आणि सुक्कळीचं हे मायबाप सरकार, निविडणुका सरल्याव फुकाट इजबी बंद करून टाकली.

मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो. कर्ज मिळिवलं. एक सपान पुरं झालं. मी पंप घातला हिरीवर. इजेची लाईनबी घीतली. फुकाट इज म्हणून खोपीत, हीरीवर पण झगमाग दिवं लावलं. बरे दिवस आले. जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला. ल्योकबी हाताबुडी आला. त्याची शाळा तर बंद झालीच हुती. त्येच्या आयला त्येच्या, बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई. पळून जायचं उकिरडा फुकायला. त्यालाबी रानात घेतला. त्या वरसी पीकपण चांगलं झालं. पंपाचं पाणी पिऊन पिऊन ऊस तरारला. वाटलं जीवन रांकेला लागलं.

पुढच्या सालापासनं पावसाने दडीच मारली जणू. त्यात एकापाठोपाठ एक पाच पोरींची लग्न. खर्चाचा मेळ जुळविता जुळविता कंबर खचली. त्यात मायबाप सरकारनं इज फुकाट द्येणार न्हाई म्हणून सांगिटलं. आता झाली का पंचाईत. इथून तिथून, सावकाराकडून कर्ज काढून बिलं भरली. पण हितं आभाळंच फाटलं तिथं ठिगळंतरी किती मारायची अन कशी?

त्यात मागल्या महिन्यात चंद्री आजारी पडली. दवाखाने झाले. भगत झाले. सगळं झालं. इथं दातावर माराया पैसा उरला नाही, औशिदासाठी पैसं आणणार कुठून? मुलगा इथं तिथं रोजावर काम करून पैसं मिळवित होता. गांड खंजाळायला बी कुणाला सवड हुईत न्हवती, तिथं हिच्याकडं बघायचं तरी कोनी? पिकाचा सगळा पैसा तर कर्जाचे हप्ते देण्यात जात होता. आणि ल्योकाची बेगारी हिच्या औशिदात. शेवटी गेल्या हफ्त्यात रान इकायचं ठरिवलं. निदान चंद्रीला शेरात चांगल्या डागदर ला दाखिवता येईल. परवाच रानाचं पैसं मिळालं. पोराला अन चंद्रीला शेराकडे लावून दिलं. त्याना म्हटलं तुम्ही हे पैसे घेवा आन तिथेच ऱ्हावा. मी मागचं सगळं आवरून येतो.

अहो पाटील मघाधरनं एवढं बोलून राहिलोय तुम्ही लक्षच देईना झालाय? सकाळधरनं पाहतोय जे बेणं येतंय ते सुक्कळीचं पहिलं हिरीत बघतंय चुक चुक करतंय अन वाटेला लागतंय. मी एवढं बोलतंय तर बोला की वाईस.....

............हे कोणाचं मढं निघालं आणिक. अरे, ही चंद्री का रडून राहिल्येय तिथं. रांड मी मेल्याव रडावं तशी रडतिय.....................


राम नाम सत्य है. राम नाम सत्य है...................

Thursday, June 07, 2007

भाग्यश्री

Internet वर मी World Vision नावच्या एका संस्थेची website बघतोय. ही संस्था गरीब देशातील मुलांसाठी पैसे गोळा करते. "Sponsor a Child" ही त्यांची योजना मला खूपच आवडते. म्हणजे अमुक एक मुलासाठी आपण काही रक्कम देणगी म्हणून द्यायची. पण ते पैसे त्या मुलाला थेट न मिळता, त्याच्या Community च्या भल्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात एकाएकी परोपकाराची भावना जागृत होते. आणि जोषातच मी कुणातरी बालकाला "sponsor" करण्याचा निर्णय घेतो.

थोडावेळ ती website surf केल्यावर मला असं कळतं की आपण आपल्याला हव्या त्या प्रदेशातील बालक निवडू शकतो देणगी देण्यासाठी. ह्यावर अचानक माझा देशाभिमान जागृत होतो. पैसे द्यायचेच तर निदान भारतातल्या मुलासाठी तरी द्यावेत, असा विचार करून मी अधिक गरजवंत दिसणाऱ्या आफ्रिकन मुलांच्या फोटोंना बाजूला सारतो आणि भारतीय मुलांकडे वळतो.

भारतातील मुलांचे फोटो बघताना, माझ्या असं लक्षात येतं की दक्षिण भारतीय मुलांची संख्या अधिक आहे. मग अचानक माझा भाषाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत होतो. त्या सुनामीग्रस्त दक्षिण भारतीय मुलांना मी बाजूला सारतो आणि मराठी मुलांचा शोध घ्यायला लागतो. मुलांची भाषा तिथे लिहिलेली नसते, पण शहर मात्र लिहिलेलं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं शहर आणि त्यातल्या त्यात मराठी वाटेल असं नाव असलेल्या बालकासाठी देणगी द्यायचं मी निश्चित करतो.

शोध घेता घेता, एक इटुकल्या पिटुकल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर येतो. "भाग्यश्री" नाव असतं तिचं. पुण्याची मुलगी आणि नावावरून मराठी वाटतेय आणि काही महिन्यांचीच आहे, एवढ्या भांडवलावर, मी तिला "Sponsor" करण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात website च्या तळाला "World Vision is a Christian Organisation" अशी टीप दिसते. अचानक माझा हिंदू धर्माभिमान जागृत होतो. पैसे सरळ वनवासी कल्याण आश्रमाला द्यावेत का असा एक विचार मनात येतो. मनाची चलबिचल होते. पण पुन्हा तो भाग्यश्रीचा हसरा फोटो मला लाइन वर आणतो.

तरीही पैसे भरण्याच्या आधी मी भरलेल्या पैशांवर आयकरातील ८०जी सवलत मिळेल की नाही ह्याची खात्री करून घेतो. आता तर माझा निर्णय अधिकच पक्का होतो. देशाभिमान, भाषाभिमान यांची गोंजारणी, आयकरात सवलत आणि कुणा गरजूला मदत केल्याचं पुण्य, ह्यापेक्षा आणखी काय हवं? मी भराभर माझं नाव, पत्ता, देणगीची रक्कम, भरतो आणि "Sponsor Bhagyashree" वर click करतो. आपण एक अतिशय परोपकारी काम केल्याच्या जाणीवेनं माझा ऊर भरून येतो.

पुढच्याच screen वर पैशाच्या भराण्याबाबत माहिती भरायची असते. ते करता करता माझ्या असं लक्षात येतं की माझं Credit Card वापरून पैसे भरायची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. थोड्या दिवसांनी प्रयत्न करा, अशी सूचनासुद्धा screen वर येते. तेवढ्यात बायको भजी आणि चहा घेऊन येते. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री, सगळेच चहाच्या कपात विरघळून जातात......

........माझ्या नावाचं जाडजूड पाकीट Letter Box मध्ये पाहून मला आश्चर्यच वाटतं. कुतूहलाने मी ते पाकीट उघडतो. त्यात World Vision ने मला पाठवलेलं आभारप्रदर्शनाचं पत्र असतं, मी भाग्यश्री ला "sponsor" केल्याबद्दल. सोबत तिचा एक छानसा हसरा फोटो. मी चक्रावूनच जातो. पैसे न भरता हे पत्र कसं काय आलं असावं? पुन्हा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती डोकं वर काढायला लगतात. भाग्यश्रीचा हसरा फोटो मनाला टोचणी लावतो. तातडीने मी World Vision ची web site उघडतो. पण आता तिथे sponsor करण्यासाठी तिचा फोटो नसतो.

पत्रातून त्यांचा फोन नंबर समजतो. मी फोन लावतो पण त्यांचं कार्यालय आता बंद झालेलं असतं. आता काय करावं? असा विचार करता करताच मी ती कागदपत्र आणि तिचा फोटो पाकिटात टाकतो. टी. व्ही. वर क्रिकेटचा सामना सुरू होतो. ते पाकीट मी कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवतो आणि सचिनची फटकेबाजी बघायला टी. व्ही. समोर बसतो. दुसऱ्याच चेंडूवर सचिन बाद. सचिनला, त्याच्या जाहिरातींना आणि भारतीय संघाला दिलेल्या शिव्यांमध्ये पुन्हा एकदा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री विरून जातात......

...........मी माझा E Mail उघडतो. World Vision कडून मला एक E Mail आलेला असतो. विषय - "Your ID 1047587" मजकूर,

"Its very unfortunate that your sponsor child, Bhagyashree had high fever and fell sick. Failing to recover from her sickness, the girl passed away last week"

माझ्या मेंदूला झिणझिण्या येतात. डोळ्यासमोर भाग्यश्रीचा चेहरा येतो. डोळ्याच्या कडा क्षणभर पाणावतात. फोन खणखणतो. पालीकडून मित्र मला "फुटबॉल खेळायला येतोस का?" म्हणून विचारतो. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती हे सगळे, फुटबॉल ला मारलेल्या लाँग किक सारखे दूरवर जाऊन पडतात.

पण भाग्यश्री मात्र कपाटात ठेवलेल्या त्या पाकिटातील फोटोमधून माझ्याकडे बघून हसत असते. तशीच. कायमची.

Saturday, May 26, 2007

कौन कम्बख्त...

स्मॉल लाटे घेऊन ऑफिसच्या कँटिनमधून बाहेर पडताना पाऊस पडत असेल तर काय झकास दिसतो. आज छान पाऊस पडतोय. छान म्हणजे कसा? छत्री सोबत घ्यायला लागणार नाही इतका. पडतोय नाही पडतोय असा. मुसळधार पाऊस मला आवडतो. मनापासून. तो नुसते रस्तेच नाही मनाची मरगळही धुऊन काढतो. पण हा पाऊस कसा? कारंज्याच्या बाजूला उभं राहिलं तर तुषार उडतात ना तसा. आल्हाददायक. जावं का थोडं पावसात? भिजायला होईल. होऊदे ना. सगळी दुनियाच तर भिजलेय. हातातला थर्माकोलचा कप सांभाळत सांभाळत मी गच्चीत शिरतो.

खरंतर किती डिप्रेसिंग वाटतं ना? संघ्याकाळची अंधारत चाललेली वेळ, असा थेंबटलेला पाऊस. पण आज नाही वाटत. का? करड्या स्वेटरवर आता थेंबांचं डिझाइन झालंय. ते डिझाइन न बिघडवण्यासाठी का होईना, मी आत येतो. सगळं ऑफिस रिकामं झालंय. का बरं? घरी गेलेले लोकं जाता जाता आपलं रिकामपण सोडून गेले की काय? मी माझ्या डेस्क वरचं माझं सामान उचलतो आणि चालता होतो. विसरलो का काही? असूदे, सोमवारी बघू. तसंही आपलं कोण काय घेणार?

खरंतर मी सायकलने जायला हवं घरी. पण आज नको. पाऊस आहे ना. आज ट्रॅम. ऑफिसचा मागचा जिना उतरून मी रस्त्यावर येतो. खांद्यावर बॅग, एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात छत्री. नकोच ती उघडायला. पण भिजायला झालं तर? अरे इथे दुनिया भिजलेय, मग आपण का नाही? चालत चालत मी पोरांच्या स्केट पार्कपाशी येतो. एरवी माझं त्यांच्याकडे जराही लक्ष नसतं. पण आज मी मुद्दाम बघतो. वाटतं आपणही एकदा स्केट बोर्डिंग करून बघावं. पडेन च्यामारी. पाऊस म्हणून आज कोणी नाहीये. नही. एक आहे सायकलवर. घसरून पडायचंय का रे तुला? लागेल लेका. मी मराठीत बोलल्याने त्याला काहीच कळत नाही. तो तिथून हात करतो. आपल्याला काय? आपण इथून करतो. हात करायला काय पैसे पडतात होय?

त्याला हात दाखवत दाखवतच मी मुख्य रस्त्याच्या फुटपाथवर येतो. हा रिव्हर्सडेल रोड. काय छान नाव आहे ना? डेल म्हणजे टेकडी. रिव्हर्सडेल म्हणजे नदीसमोरची टेकडी. नदी नाही दिसत म्हणा इथून आता. पण नाव झकास आहे. कुणा मूर्खानं समोरच्या इमारती बांधल्या इथे? कधीतरी दिसत असेल नदी इथूनही. शांत, संथ हिरवी "यारा". आणि आता तर काय अप्रतिम दिसली असती. पावसाच्या थेंबांचं डिझाइन घेऊन. मरूदे. आपण ट्रॅमदेवीची आराधना करावी हे बरं.

स्टॉपवर पण कोण दिसत नाही आज. पाऊसामुळे असेल. तेवढ्यात एक आजीबाई हातातली छत्री सांभाळत सांभाळत येतात. मला विचारतात की मी छत्री विसरलो का? मी त्यांना हातातली छत्री दाखवतो. त्या हसतात. पण त्यांच्या हसण्यात खिन्नतेची झाक दिसतेय का? कदाचित कधीतरी त्याही फिरल्या असतील पावसात, छत्री हातात घेऊन. भिजण्याची चिंता न करता, कारण साला सगळी दुनियाच भिजत असेल तेव्हा. लांबून ट्रॅम येताना दिसते. अंधारलेल्या वातावरणात तिचे उघड मीट होणारे दिवे अधिकच छान दिसतात. हातातली कॉफी सांभाळत मी ट्रॅममध्ये चढतो. चार पाचच टाळकी असतात. मी खिडकीजवळ जाऊन बसतो.

जगाची चिंता नसते नाही ह्या ट्रॅम ला? आपल्या वेगाने जात असते. रस्ता ठरलेला, स्टॉपही ठरलेले. वेगवेगळ्या आचारांची विचारांची माणसं गुडुप पोटात घेऊन स्थितप्रज्ञासारखी चाललेली असते. अव्याहत. हातात लाटे असली की माझ्या विचारांना पाय फुटतात वाटतं? मी ट्रॅमचे धक्के एन्जॉय करत राहतो. छान डुलकी काढावी असं वाटून जातं. पण तेवढ्यात माझा स्टॉप येतो.

साला ही ट्रॅमपण माझ्यासारखीच आहे. भिजत चाललेय. बरोबर आहे, तिला जगाची चिंताच नसते. आणि आज तर अख्खी दुनिया भिजलेय. मी आणि ट्रॅमने काय घोडं मारलंय मग? असो. मी उतरतो. एखाद्या जीवाभावाच्या मैत्रिणीला करावा तसा तिला आच्छा करावा असं वाटत राहतं. ती मात्र निघून जाते. भिजत. स्थितप्रज्ञासारखी. पुन्हा. गेली तर गेली. ती काय एकटीच आहे. घरी पोहोचायला अजून दोन ट्रॅम बदलायच्यात. त्यांना आच्छा करू.

नकोच ती ट्रॅम. साधा अच्छा पण करत नाही. जावं का चालत? नको. भिजायला होईल. पण तेच तर हवंय. हातातल्या निवत चाललेल्या कॉफीचा अजून एक घोट घेऊन मी चालायला लागतो. स्वॉन स्ट्रीट वर उतरतो. राजहंसासारखीच आहे ती. लांबूनच ती यारा नदीवर डोळा ठेवून असते. दोघीही अशाच शहरापर्यंत जातात. रेल्वे लाइन ओलांडून मी बर्नली ब्रिज च्या दिशेनं चालायला लागतो. रेल्वे फाटकांना रेल्वे फाटक न म्हणता रस्ता फाटक म्हटलं पाहिजे. रेल्वेचा रस्ता सदोदित मोकळाच असतो. च्या मारी, फाटक आम्हा रस्त्यावरच्या लोकांना. असो.

हा रस्ता थोडासा कंटाळवाणा आहे. पण तेवढ्यात समोरून एक सुंदर तरुणी जॉगिंग करत येते. कशाला मरायला धावतेय पावसात? नाही. आज शुक्रवार आहे. आज उद्याकडे डेट असेल तिची. धावूदे. रोल्स रॉईसला जायला खटारा अँबॅसेटर ने जागा द्यावी तशी मी तिला जागा देतो. ती टाळू आणि दात ह्यांच्या बरोबर मध्ये जीभ लावून "थँक यू" म्हणते. सुभानल्ला. गुदगुल्याच होतात जणू.

आता समोर "यारा" दिसायला लागते. संथ वाहते यारा माई. तिरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. तिच्या शेजारून ऍलेक्झांड्रा ऍव्हेन्यू वाहतोय. यारा आणि ऍलेक्झांड्रा, एकमेकीत जीव गुंतलेल्या बहिणीच जश्या. यारा वळते म्हणून ऍलेक्झांड्रा वळते का ऍलेक्झांड्रा वळते म्हणून यारा वळते हेही कळू नये. फक्त एकच फरक आहे. एक वन वे आहे आणि दुसरी बोथ वेज. अशा ह्या दोन सुंदर बहिणींनी बखोटीला धरून दोन्ही बाजूंनी उचलावा असा त्यांच्या मध्ये बाइक ट्रॅक आहे. मी इथूनच जातो रोज. सायकलने. पण आज चालत.

समोरून एक सायकल स्वार येतोय. दमलाय लेकाचा. घामाघूम झालाय. वर पावसात भिजलाय. अरे भिजूदे ना. इथे तर सगळी दुनिया भिजलेय. ह्याला थोडावेळ सायकल चालवून देऊ का? नको. कॉफीच्या शेवटच्या काही घोटांपैकी एक घेऊन मी तो विचार उडवून टाकतो. खरंतर कॉफी संपलेलीच आहे, पण घरी पोहोचेपर्यंत पुरवायचेय. उगीचच मी एका लाकडी बाकावर बसतो. बाक ओलाच असतो. मरूदे फार फारतर काय? ओला पार्श्वभाग बघून लोक हसतील. हसूदेत लेकाचे. आपल्याला काय त्याचं. आज साला ही दुनिया भिजलेय तिथे माझ्या पार्श्वभागाची काय कथा?

नदीच्या बाजूला असलेल्या एका धक्क्यावर जाऊन मी उभा राहतो. वाटतं अशीच पाण्यात उडी मारावी. पोहत राहावं. नदी संपेपर्यंत. मग समुद्र येईल. तरीही थांबू नये. एक ते सात एका पाठोपाठ पोहावेत. पृथ्वी गोल आहे. इथेच परत पोहोचू. समजा नाही पोचलो, तर सिद्ध होईल, पृथ्वी गोल नाहीये म्हणून.

चेहरा वर करून मी आकाशाकडे बघतो. चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडतात. एकदम सकाळच्या दव पडलेल्या फुलागत वाटत. सपशेल. अररररर स्पेशल. तसाच मी चालत राहतो घर येईपर्यंत. रस्ते वळत असतात त्यांना हवे तसे. पण मी मात्र रस्ता चुकत नाही. मला जिथे वळायचं तिथे मी पण वळतो. शुक्रवार संध्याकाळ चढायला लागलेली असते. शुक्रवारी संध्याकाळी रस्त्यावरच्या सिग्नलचे लाइट पण डिस्कोत लावल्यासारखे वाटतात नाही? विल्यम्स रोडचा चढ पार करता करता माझे पाय दुखायला लागतात.

घर येतं. मी बरोबर दोन जिने चढून माझ्याच घराची बेल वाजवतो. कोणीच दार उघडत नाही, मग मी माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडतो. टेबलावर कागदावर काहीतरी खरडून ठेवलेलं असतं. "ऑफिसच्या ड्रिंक्समुळे तुला उशीर होणार आहे हा निरोप मिळाला. मोबाईल नेहमीप्रमाणे सायलेंट वर ठेवून आपण कुठेतरी भटकत असाल. म्हणून ही चिठ्ठी. मी मैत्रिणीकडे जात आहे. यायला उशीर होईल." अरेच्च्या? खरंच की. आज ड्रिंक्स होती ऑफिसमध्ये. पण मला तर अजिबात चढल्यासारखी वाटत नाहीये.

जानदो. कौन कंबख्त नशेकेलीये पीता है? हम तो पीतेहै क्यों की?........ क्यों की?........ काहीच सुचत नाहीये. जानदो.

Saturday, May 05, 2007

मी CD Player आणि मी

अवघा चौदा वर्षाचा मी, स्टेजवरून जादूचे प्रयोग करतोय. माझ्या माकडचेष्टांना ऊत आलाय. लोकं जादू सोडून मला पोट धरधरून हसतायत आणि मी ही ते सगळं enjoy करतोय. आजच्या बरोबर अर्ध होतं नाही माझं वय तेव्हा? समोरच्या T.V. वर जुन्या रेकॉर्डिंगमध्ये मलाच स्वतःला बघताना काय मजा वाटतेय? Time Freeze की काय म्हणतात ते हेच असावं. जुने मंतरलेले दिवस झर्रकन डोळ्यासमोरून उडून गेले. एक नाही दोन नाही उणीपुरी चौदा वर्ष झाली. पण तो स्टेज, तो उत्सव आणि आमची चाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते............

माझी चाळ. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत नाहीयेच मुळी. खरंतर हे नातं वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. कधी आईच्या मायेचं, कधी आजीच्या प्रेमाचं, कधी वडिलांच्या धाकाचं, जीवाभावाच्या मित्राचं आणि कधीकधी शत्रूचंसुद्धा. पण तरीसुद्धा हवंहवंसं वाटणारं. शेवटी ज्या नात्याच्या आठवणीनं टचकन डोळ्यांत पाणी येतं ते खरं नातं. त्याला नाव देण्याची गरजच काय?

अजूनही आठवतो चाळीच्या स्टेजवरचा माझा पहिला Stage Appearance. मी सांगितलेली लाकुडतोड्याची गोष्ट. खूपच लहान होतो तेव्हा, पण मी असे काही माकडचाळे केल्येयत की काय सांगू? पण माझा उत्साह वाढवण्यासाठी किती बक्षिसं दिली होती लोकांनी? नुसतं तेव्हाच नाही, पण कधीही चाळीत कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्या, चांगला झाला तर कौतुकाची थाप मिळायचीच. पण वाईट झाला तर सूचनांबरोबर प्रोत्साहनपर कौतुक व्हायचंच. वडिलधाऱ्या मंडळींनी दिलेलं ते प्रोत्साहन तेव्हाच नाही तर आजही उपयोगी पडतं.

मग माझी दहावीची परीक्षा. सगळ्या घरांघरांत जाऊन नमस्कार करून आलो होतो. मी परीक्षेला निघालो तेव्हा अर्धी चाळ माझा धीर वाढवत होती. खरंतर कोण होतो मी त्यांचा? ना नात्याचा ना गोत्याचा. खरंतर कुणीच नाही. चौपन्न बिऱ्हाडातल्या एका बिऱ्हाडातला मुलगा. आणि मी तरी कशाला केला त्या सर्वांना नमस्कार? ते काही माझे नातेवाईक नव्हते. पण कधीकधी त्याहीपेक्षा जवळचे होते. पडलो तर हात द्यायला येणारे, चुकलो तर पाठीत धपाटा घालणारे.

अजूनही घरी सुट्टीवर गेलो की परतताना अगदी सगळ्या चाळीच्या नाही पण मजल्यावरच्या वडिलधाऱ्या मंडळींना नमस्कार केल्याशिवाय घर सोडत नाही. शक्यच नाहीये ते. उद्या आमच्या पुढच्या पिढीतली मुलं "All the Best" च्या गजरात परीक्षेला जातील, पण त्यांना नमस्कार करायला आणि आशीर्वाद द्यायला कोण असतील? मुळात ती आपल्या पालकांनातरी नमस्कार करतील का?

प्रत्येक माणसात काहीनं काही गुण आढळून येईल. गुणांची खाण होती आजूबाजूला फक्त पाहण्याला नजर हवी, नळावरच्या भांडणांच्या आणि common संडासांच्या पलीकडे जाऊन बघायची. कुणी माझ्यात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण केली, तर कुणी गणितं घालून माझ्या मेंदूला कामाला लावलं. कुणी ओरडलं, भांडलं, पण आम्ही मुलांनी चांगलं वागावं असाच त्यांचा हेतू होता. कोणत्या आजींनी त्यांच्याकडे गेल्यावर न चुकता खाऊ दिला. अगदी अजूनही देतात. माझी आजी आज हयात नाही. पण तीच पाठीवरून हात फिरवतेय असं वाटतं.

आणि चाळीतले मित्र, त्यांचं तर काय सांगावं? अजूनही परत गेल्यावर, काय गद्रे, काय म्हणताय? अशी जोरदार हाक कुठूनतरी ऐकू येते. जुने दिवस आठवतात. किती ते खेळ. लंगडी, हुतुतू, खो खो, क्रिकेट. घरात अभ्यास नसेल तर आम्ही अंगणातच असू. भांडणं होत. मारामाऱ्यासुद्धा होत. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले पाढे पंचावन्न. आज चाळीत एवढ्या गाड्या झाल्यायत की मुलांना खेळायला अंगणच नाही. ही परिस्थिती पाहून चाळीला नक्की दुःख होत असेल.

तुम्ही बाहेर कितीही मोठे असाल. तो सगळा मोठेपणा बाजूला ठेवून वावरायची नम्रता चाळीने शिकवली. कोण डॉक्टर, आपला सगळा मोठेपणा बाजूला ठेवून उत्सवात अंगणंच झाडेल. कुणी मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर असलेली मुलगी किंवा सून, सार्वजनिक हळदीकुंकवासाठी सतरंजी घालण्यापासून तयारी करेल. असे धडे घेत घेत आम्ही मोठे झालो. पुढच्या पिढीचं शिक्षण हे त्यांच्या घराच्या चार भिंतीत computer च्या साहाय्याने होईल. जगाची सगळी माहिती त्यांना उपलब्ध असेल. पण पालकांच्या अपरोक्ष आगाऊपणा केल्याबद्दल टपलीत मारणारे हात असतील का त्या computer ला?

आताशा चाळीतदेखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सगळ्या चाळी पाडून उंच इमारतींचं complex बांधायचं चाललंय. माझ्यासारखी मुलंच त्यात पुढाकार घेतायत. आता आम्हाला चाळीच्या common संडासांची लाज वाटायला लागलेय. कोणतीही पूर्वसूचना न देता, काय वहिनी आज पाव भाजी वाटतं असं म्हणत स्वैपाकघरापर्यंत घुसणारे शेजारी आता आम्हाला Intruding वाटायला लागलेत. आमच्या गाड्यांसाठी चाळीचं अंगण अपुरं पडायला लागलंय आणि चाळीच्या सार्वजनिक कामांत भाग घेणं आम्हाला आता Below Dignity वाटायला लागलंय. कुणी विचारला कुठे राहत होता मुंबईत तर आम्ही शिताफीने चाळीत राहत होतो हे सांगायचं टाळू लागलोय.

चाळही आत थकलेली आहेच. म्हाडाचे टेकू लावून लावून तिला तरुण ठेवण्याचा अट्टहास अपुरा पडत चाललेला आहे. त्यामुळे ती स्वतःहून जरी कोसळली नाही तरी आमच्यातलाच कोणीतरी तिच्यावर बुल्डोझर फिरवणार हे निश्चित आहे. उद्या तिथे sky scrapper उभी राहील. आणि काल चाळीच्या अंगणात खेळणारी आम्ही मुलं आमच्या Flat चे दरवाजे बंद करून आमच्या मुलांना computer बरोबर खेळायला बसवू. शेजाऱ्यांकडे जाताना पूर्वीसारखं थेट घरांत घुसणं तिथे असभ्यपणाचं लक्षण मानलं जाईल. तुम्ही आमच्या घरातले नाही, परके आहात असं सांगणारे जाळीचे दरवाजे आणि दरवाज्यावरच्या घंटा तिथे असतील. सगळं काही छान छान आणि आनंदी असेल. पण आमच्या त्या उंच इमारतीखाली चाळीचं थडगं तिच्याच संस्कारांची होळी पाहून अश्रू गाळीत असेल.

अजूनही आठवतं. नोकरीसाठी घर सोडायची वेळ आली, रात्री उठून एकट्यानेच चाळ बघून घेतली होती. उगाचच लहान मुलासारखा कठड्यावर हात ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गॅलेरीत फिरलो होतो. जिन्याच्या पायऱ्यांवर बसून एकटाच रडलो होतो. पुन्हा कधी परत येईन माहीत नव्हतं. गाडीत बसताना गॅलेरीत उभ्या असलेल्या लोकांना अच्छा करताना मनातल्या मनात चाळीलाही अच्छा केला होता. मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मनातला आवंढा गिळला होता.

ह्या आठवणी येतात, मन एवढं एवढंसं होतं. वाटतं सोडून द्यावे जिंकलेले सारे किल्ले, परत जावं. चाळीच्या अंगणातल्या सगळ्या गाड्या केराच्या टोपलीत टाकाव्यात. सगळ्या मित्रांना परत अंगणात बोलवावं. एक जोरदार फटका मारून तळ मजल्यावरच्या काकूंच्या तावदानांची काच फोडावी. काकूंनी चेंडू विळीवर कापून द्यावा. संध्याकाळी त्याच काकूंचं दळण मी त्यांना आणून द्यावं. त्यांबद्दल त्यांनी मला खाऊ द्यावा आणि पुन्हा काच फोडणार नाही असं वदवून घ्यावं. गोकुळाष्टमीला यथेच्छ खेळावं, होळीला जीव तोडून रंगावं. उत्सवात लहान मूल होऊन हुंदडावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं.

..........CD Player मधली CD संपलेली असते. बायको मला जेवण्यासाठी बोलावते. आज जेवण नीटसं जात नाही. ती का म्हणून विचारते. मी निरुत्तर होतो..........

Wednesday, May 02, 2007

रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...

एक घाणीने बरबटलेलं गटार, खरंतर रस्ताच. बाजूला झोपडपट्टी. समोर थोडी मोकळी जागा. निळ्या गणवेषातला एक पोलिस काठी आपटंत येतो. मोकळ्या जागेत खेळणारी मुलं उधळून पळतात. एक पांगळं मूल मागेच रखडतं. पोलिस त्याच्यावर काठी उगारून त्याला धमकावतो. कदाचित पोलिसालाही त्या मुलाची दया येते. त्या मुलाला तसंच सोडून तो पुढे जातो. ते पांगळं मूल तसंच गटारात पडून रहातं. त्याचे टपोरे डोळे पाण्याने भरतात. अश्रू नाही, ते संताप, दुःख, असहायता, अपमान ह्याने भरतात. कोणी लहानपणीच मोठं केलं ह्या लहान मुलांना?

.......रोहिंग्या. बांग्लादेश आणि बर्मा ह्यांच्यातल्या एका वादाचं कारण. बर्मामधल्या एका मुस्लिम जमातीला रोहिंग्या म्हणतात. ते आश्रित म्हणून बांग्लादेशात रहातात. Official Number बावीस हजार. विस्थापित, आश्रित, Refugee......

शाळा. शाळेत मुलं काहितरी घोकतायत. काहितरी नाही, English आहे ते. "I am something" असं काहिसं. एक पोरगेलसा शिक्षक शिकवतोय. चक्क लूंगी लावून. कारणंच तसं आहे. तो Refugee असल्याने त्याने Pant घालणं त्याच्या दर्जाला साजेसं नाही. लुंगी ऎवजी Pant घातल्यामुळे खाव्या लागलेल्या माराचे व्रण अजूनही त्याच्या पाठीवर ताजे आहेत.

......मुसलमान म्हणून ते बर्मामधे वेगळे काढले जातात. लोकशाही नाही, व्यक्तीस्वातंत्र्य नाही. बांग्लादेश मुसलमान देश, लोकशाही देश म्हणून रोहिंग्यांचे लोंढेच्या लोंढे बांग्लादेशात येतात. पण त्यांच्यासाठी तरी कुठे ते आपले आहेत? उपरे म्हणून त्यांच्यावर लोकांचा आणि system चा सुद्धा राग आहे.......

एक धडधाकट माणूस चक्क ढसाढसा रडतोय. त्याच्या बायकोसमोर, मुलांसमोर. मुलांना दोन वेळेला जेवायला पण मिळत नाही असं डोळ्यात आर्जव आणून आणून सांगतोय. तो एक भांडं दाखवतो. त्यात जेवण म्हणून बनवलेलं काहीतरी असतं. हे मिश्रण आणि भात. सकाळ संध्याकाळ हेच खायचं. तेसुद्धा जर पुरेशी धनधान्याची मदत मिळाली तर. वर पोलिसांचा मार आहेच. आता त्याच्या बायकोलाही रडू येतंय. पोरगं मात्र मातीशी खेळण्यात दंगलंय. एक बचाकभर माती उचलून ते सरळ तोंडात टाकतं.

......बावीस हजार रोहिंग्या बांग्लादेश बर्मा सीमेवरच्या Refugee Camp मधे रहातात. संयुक्त राष्ट्रांकडून हे Camps चालवले जातात. पण अनधिकृतपणे बांग्लादेशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या एक लाखाहूनही अधिक आहे. त्यांना Refugee Camp मधे ज्या काही तुटपुंज्या सोयी मिळतात त्याही मिळंत नाहीत......

एक बाई आपल्या झोपडीसमोर बसलेय. तिची मुलं कसलासा पाला समोरच्या रानातून तोडून आणतात. तोच पाला ती शिजवतेय अन्न म्हणून. सात मुलं आहेत तिला. नवर्‍याला बर्मा मधे मारलं म्हणून ती मुलांना घेवून बांग्लादेशात पळून आली. पण ती अनधिकृत Refugee आहे. मुलं अधाशासारखी त्या पाल्याकडे बघतायत. ती बाई डोळ्यात असवं आणून सांगतेय. तिला आणि तिच्या नवर्‍याला बर्मिज सॆनिकांनी कॆदेत टाकलं. सतत बलात्कार. सातातली किती मुलं नवर्‍याची आणि किती दुसर्‍यांची हे सांगणंदेखील तिला शक्य नाही. तिला तिच्या मुलीची अशी अवस्था करायची नाहीये. चवदा वर्षाची आहे तिची मुलगी. पण तिला ती कुठेही जावू देत नाही. आजूबाजूचे लोक अचकट विचकट बोलतात, घरापर्यंत येवून तिला पाठव म्हणून धमकावतात.

.....रोहिंग्या लोकांविरुद्ध बांग्लादेशींमध्ये असंतोष खदखदतोय. ते स्वस्तात कामं करतात आणि स्थानिकांचा रोजगार पळवतात. ह्यामुळे स्थानिकांकडून त्यांना काही मदत मिळणं अशक्य आहे. सरकारही ते उपरे असल्याने त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. बर्मा सरकारने तर त्यांचं राष्ट्रियत्व नाकारलंय. हा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्ह नाहीत म्हणून मदत देणार्‍या देशांनीही हात आखडता घ्यायचं ठरवलंय. पण तरीही एक आशेचा किरण अद्याप आहे......

एका छोट्या hall मधे अनेक लहान लहान मुलं आणि त्यांच्या आया बसल्यायत. प्रत्येकीच्या हातात एक चंदेरी पिशवी आहे. ती एका बाजूने फोडून त्यातलं चाटण आया मुलांना खायला घालतायत. Medecins Sans Frontieres (MSF) अर्थात Doctors without Borders ह्या संस्थेचा एक स्वय़ंसेवक सांगतोय की रोहिंग्या विस्थापितांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. कारण कुपोषण. म्हणून MSF तर्फे हे पोषक अन्न बालकांना दिलं जातंय. ते बालकांना तर आवडतंच आणि त्याचा पुरवठा करणंही तितकसं अवघड नाही. हळूहळू इथल्या बालकांचं पोषण ह्यामुळे सुधारेल.

......असा आहे हा तिढा. ना घरका न घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. एकोणिसशे नव्वद सालापासून लोक Refugee म्हणून रहातायत. पंधरा वर्ष झाली. लहानांचे तरूण झाले. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तरूण उताराला लागले उद्याच्या आशेवर. म्हातारे मेले चांगल्या कबरीची स्वप्न पहात. पण बांग्लादेश, बर्मा आणि त्यांच्यातला हा तिढा आहे तसे आहेत. आणि रोहिंग्या आहेत कायमस्वरूपी Refugee......

निवेदक आपलं निवेदन संपवतो. श्रेयनामावली सुरू होते. आम्ही बघणारे मात्र सुन्न. कशा अवस्थेत लोकं रहातात? आणि आपण फालतू कारणांसाठी रडत असतो. हे विषय पण गुंतागुंतीचे. रोहिंग्या बांग्लादेशात refugee. बांग्लादेशी भारतात refugee. आणि भारतीय पश्चिमी देशांत. Refugee नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

इतक्यात श्रेयनामावली संपून जाहिराती सुरू होतात. मी चटकन भानावर येतो. घड्याळाकडे लक्ष जातं. साडेसात. मी जवळ जवळ किंचाळतोच बायकोच्या अंगावर. अगं "Dancing with the stars" सुरू झालं असेल. तार्‍यांच्या भाऊगर्दीत रोहिंग्या अस्पष्ट होत जातात.

Monday, April 30, 2007

माझी दुचाकी आणि कंसातलं विंग्रजी.

माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का? मला तर हमखास अशी खुळं पछाडतात. आणि एकदा का मला अशा भूतांनी पछाडलं, की त्यांचा पुरेपूर वीट येइपर्यंत, त्या भूतांना माझ्या मानगुटीवर धरून ठेवतो. जातील कुठे पठ्ठी?

तर सांगायचा मुद्दा हा की सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात (ज्याला परदेशात summer म्हणतात तो) मला कचेरीला दुचाकीने (ज्याला विंग्रजीमध्ये Push Bike म्हणतात ती) जाण्याच्या खुळाने पछाडलं. तसं हे खूळ जुनं नाही. लहानपणापासूनचं आहे. अगदी तिचाकी चालवत होतो तेव्हापासूनचं आहे. आता फक्त त्याने उचल खाल्ली एवढंच.

आणि त्याला कारणंही तसंच मिळालं. आमच्या कचेरीमधे अमुक एक दिवस "कचेरीला दुचाकीने दिन" (नाही कळलं ना? ज्याला आमच्या Office मधे "Ride to work Day" म्हणतांत तो) म्हणून घोषित झाला. पूर्वी दुसरीकडे काम करत असताना, मी कचेरीला दुचाकीने जायचो, ही गोष्ट मी उगाचंच सर्वांना सांगून ठेवली होती, प्रभाव (ज्याला युवा मराठीत "इम्प" म्हणतात तो) पाडायला. त्यामुळे दुचाकीने कचेरीला जाण्याची नॆतिक जबाबदारी (जिला लोकसभेत राजिनामा मागताना "Moral Responsibility" म्हणतात ती) सर्वाधिक माझ्यावर येवून पडली.

जुनी सायकल फडताळातून बाहेर काढली. तिला तेल-पाणी, वेणी-फणी करून, हवा-बिवा भरून ती कचेरीपर्यंत न डगमगता, न भिरभिरता चालेल ह्याची खात्री करून घेतली. प्रातःकाळी अर्धा तास लवकरंच निघालो. सुरवातीचा प्रवासही झकास झाला. नदीकडून वार्‍याची झुळूक अंगावर घेवून जाताना फार बरं वाटत होतं. आता नदी बाजूचा रस्ता संपून मुख्य रस्त्याला लागायचं होतं. खडा चढ होता, जोरजोरांत दुचाकीपाद (ज्याला मी सोडून बाकी अख्ख जग "Paddle" म्हणतं ते) मारायला सुरवात केली. पण हाय दॆवा, निम्म्या रस्त्यावरच दुचाकी ढिम्म. अर्थातच थोडक्या विचारांती, उरलेला चढ, तिने आणि मी, आपापल्या पायांवर चढावा, असा निर्णय मी घेतला. चतुरपणे दुचाकीला काहीतरी झाल्यामूळे मी अर्ध्या अंतरातून उतरून चालतो आहे, अशा आशयाचा अभिनय मी तिथे उपस्थित लोकांना करून दाखवला. हाच प्रसंग पुढे येत असलेल्या तीनही टेकड्या चढताना आला. अभिनेता तोच होता, प्रेक्षक फक्त वेगळे होते.

"पुन्हा पुन्हा करा आणि परिपूर्ण व्हा" (मी केलेलं "Practice makes man perfect" चे दुर्दॆवी भाषांतर), त्यमुळे मी तिसर्‍या वेळी केलेला अभिनय एवढा सुंदर होता, की तिसरी टेकडी चढताना (ती तिच्या पाय़ांनी आणि मी माझ्या पायांनी) खरंच माझ्या दुचाकीला काहीतरी झालंय असं वाटून, मला एका माणसाने काय झालं असं विचारलं. दिलं काहीतरी ठोकून.

सांगायचं तात्पर्य काय? तर "कचेरीला दुचाकीने दिन" चा मला फार काही आल्हाददायक अनुभव आला नाही. मी मनाशीच ठरवलं, दुचाकी जुनी झाली, नवी घेतली पाहिजे. तत्परतेने मी के मार्ट (ह्याला काय बरं मराठी प्रतिशब्द असेल?) मधे जावून नवी दुचाकी घेवून आलो. आता इथे तयार दुचाकी महागात पडते म्हणून "जोडणीसाठी तॆय्यार" (जिला के मार्टमधील कर्मचारी "Ready to Assemble" म्हणतात ती) दुचाकी घेवून आलो. ती जोडता जोडता माझी स्वतःचीच जोडणी परत करून घ्यावी लागते की काय? अशी शंका मला चाटून गेली. कधी सुकाणू (हा कोणता जीवाणू किंवा विषाणू न्हवे. दुचाकी चालवताना, आपले हात ज्या "Handle" वर असतात ते) बॆठकीच्या (दंड बॆठकातली बॆठक नव्हे. जर तुम्ही बर्‍याच दिवसांनी दुचाकी चालवलीत, आणि एकच दिवस नव्हे तर पुन्हा दुसर्‍या दिवशीही चालवलीत, तर सर्वात आधी जीची जाणीव व्हायला नको, तिथे हमखास होते ती ही "Seat") जागी, तर कधी बॆठक सुकाणूच्या जागी. कधी पुढच्या चाकाच्या जागी मागचं चाक, तर कधी मागच्या चाकाच्या जागी काहीच नाही. ह्यापेक्षा पळत कचेरीत जाणं परवडलं. पण नाही. एकदा मानगुटीवर भूत बसलं म्हणजे मग याचिका (ज्याला न्यायालयात "Appeal" म्हणतात ते) नाही. सुकाणू बॆठक करता करता एकदाची दुचाकी तयार झाली.

पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारी निघाली. पहिला चढ पार झाला, अंगावर मूठभर मांस चढलं (हाय दॆवा, ते कमी व्हावं म्हणून ना दुचाकीने जायचं?). दुसरा चढ सुरू होणार एवढ्यात सुकाणूने असहकार पुकारला. दुचाकीपाद तेवढे गोल गोल फिरणार मग आम्ही का नाही? असं म्हणून ते चक्क उलटं झालं. मनात आणलं असतं तर ते देखील मी गोल गोल फिरवू शकलो असतो इतकं ते ढिलं झालं. ह्या प्रसंगी माझी हुषारी कामी आली. मी पकड बरोबर ठेवलीच होती. जोडणी माझी होती ना? अर्थात दुरूस्तीही मीच केली असल्याने शेवटपर्यंत सुकाणू आपला हट्ट करीतच राहिलं. फिरलं सुकाणू हातात की काढ पकड, असं करत करत शेवटच्या टेकडीपर्यंत पोचलो. पण म्हणतात ना "दॆव जाणिले कुणी" (मुद्दाम मराठीच म्हण घेतली, उगाच भाषांतराचा लफडा नको, काय?). टेकडी पार होता होताच, नव्या दुचाकीची नवी कोरी साखळी (दुचाकीच्या दुकानात जिला "Chain" म्हणतात ती) करकचून ताणली गेली आणि कचाकचा तुटली. झालं पुन्हा के मार्ट मधे जावून ती परत करून तिचे पॆसे परत मिळवण्याची कामगिरी नशिबात आली.

दरम्यानच्या काळात माझ्या मित्रांनी मला दुचाकीचं वंगणीकरण ( वांग्याचा इथे काहीही संबंध नाही, मी "Oiling" बद्धल लिहितोय) करण्याचा सल्ला दिला. सगळे उपाय केले (उपास तापास नवस सायास सोडून) पण सापाला पाहून थबकणार्‍या घोड्यासारखी, चढ आला की माझी दुचाकी थांबलीच म्हणून समजा. मला हळूहळू पटायला लागलं की चूक सायकलची नाहिये. बहुदा मझीच शक्ती कमी पडत असावी. उगाच आपल्या नसलेल्या शक्तीचं प्रदर्शन कशाला? म्हणून दुचाकी आली तशी फडताळात परत गेली.

मधे एक मित्र घरी आला होता. तेव्हा त्याला ती बिचारी धूळ खात पडलेली दिसली. तो मला म्हणाल की ती जुनी असली तरी चांगल्या स्थितीत आहे, तेव्हा मी ती विकू बिकू नये. मी त्याला मागची सगळी कहाणी सांगितली. म्हंटलं ती काही मला उपयोगी पडेल असं वाटत नाही. तो म्हणाल की मग खालच्या गतीअनुकूलकात (मझ्यासह सगळे लोकं ज्याला "Gear" म्हणतात तो. तो कसा गतिअनुकूलक म्हणेल, हे आपलं मी अत्ता म्हणतोय) चालव. मी म्हंट्लं, खालच्या गतीअनुकूलकात पण ती वर चढत नाही. तो म्हणाला की मी कधी गतिअनुकूलअक बदलतो का दुचाकी चालवताना. मी म्हंटलं की मी कष्ट नको चालवताना म्हणून आधीच सर्वाधिक खालच्या गतिअनुकूलकामधे टाकून ठेवलेय. तो म्हणाला मूर्खा हा सगळ्यात खालचा नव्हे, सगळ्यात वरचा आहे, दुचाकी चढ चढेलच कशी?

झालं. पुन्हा माझ्या मानगुटीवरचं दुचाकीचं भूत कार्यरत झालं. पुन्हा तेल-पाणी, वेणी-फणी, हवा-बिवा करून मी सकाळी निघालो. पहिला चढ आणि उरलेल्या तीनही टेकड्या आरामात गेल्या. माझा दुचाकी वरचा आणि स्वतःवरचा विश्वास द्विगुणित झाला. आता खरंतर ह्यापूढे and they happily rode everafter असं मराठीत लिहून (आणि त्याचं विंग्रजी भाषांतर कंसात लिहून) हा लेख संपायला हवा होता. पण असं काही असतं का?

दोन आठवड्यापूर्वीच मी आणि ती (पण आता मी माझ्या पायावर आणि ती तिच्या पायवर नाही. आता दोघंही तिच्याच पायांवर) संध्याकाळी घरी परतत असताना ट्रामच्या (ह्याला मराठी प्रतिशब्द माहित असेल तर कळवा. अपनी उतनी पहुच नही) रुळावरून घसरून पडलो. पडली ती आणि लागलं मला (असं मी लग्नाआधी बायकोबद्धल म्हणायचो. काय समीकरणं बदलतात नाही काळाबरोबर). त्यामुळे ती बसलेय घरी आणि मी माझा खांदा सांभाळत फिरतोय. पण काय आहे, इतक्या जोरात पडूनसुद्धा मानेवरचं भूत आहे तिथे आहे. त्यमूळे आम्ही कधी पुन्हा एकत्र आनंदाने विहरतो हया प्रश्नाचं उत्तर काळंच देवू शकेल. (मला "Its a matter of time" म्हणायचं होतं. भलतंच काहीतरी वाटेल म्हणून हा खुलासा).

शोध

कितीतरी वेळ तो देवयानीकडे टक लावून बघत होता. अगदी एखाद्या लहान मुलाने फुलावर बसलेल्या फुलपाखराकडे पहावं तसा. आणि आपल्या किंचितश्यासुद्धा हालचालीने फुलपाखरू उडून जाऊ नये म्हणून लहान मुलाने स्तब्ध उभं रहावं तसा तो स्तब्ध उभा होता. त्याच्या किंचितश्यासुद्धा हालचालीनं तिची समाधी भंग पावेल असं त्याला वाटत होतं. किती निरागस दिसत होती देवयानी? सकाळी बांधलेल्या अंबाड्यातून निसटलेले चुकार केस चेहेर्‍यावर पसरले होते. त्या काळ्याभोर बटांखाली तिची गौर त्वचा अधिकच खुलून दिसत होती. वसंतच्या आगमनाबरोबर फुललेल्या कळीसारखी गालावरची खळी खुलली होती. मूर्तिमंत सौंदर्य वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावं असं त्याला वाटलं. तो असाच तिच्याकडे बघत राहिला असता पण पानांच्या सळसळीनं त्याला जागं केलं.

अंगात शर्ट न चढवताच तो गॅलरीत आला. दुपारचा चार साडेचाराचा सुमार असेल पण नावालासुद्धा ऊन दिसत नव्हतं. सगळीकडे हिरवा रंग विखुरला होता आणि त्या हिरवाईतून एक तांबडी वाट फुरशासारखी नागमोडी वळणं घेत गेस्ट हाऊसपर्यंत येत होती. सौंदर्याचे दोन भिन्न आविष्कार तो अनुभवत होता. देवयानी अधिक सुंदर का हे दृश्य अधिक सुंदर? विचारांच्या वावटळीत तो गुरफटत असताना एकाएकी कोणीतरी ओरडलं. क्षणार्धात त्याला लक्षात आलं की दुसरं तिसरं कुणी नाही तर तो स्वतःच ओरडला होता. हाताला चिकटलेल्या लालबुंद मुंगळ्याला सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शेवटी खेचलाच. मुंगळ्याचे दोन तुकडे झाले. हाताला चिकटलेला भाग तसाच वळवळत राहिला. निष्प्राण झाल्यावर त्याने तो हलकेच दूर केला. मेलेल्या मुंगळ्याचं अस्तित्व त्याच्या हातावर उतरलं.

त्याच्या ओरडण्यानं जागी झालेली देवयानी धावतंच बाहेर आली. तिच्या चेहेर्‍यावर चुकार बटांबरोबर काळजीही पसरली. नकळत त्याने त्याचा हात पुढे केला.

- अरे काय झालं रे हे?
- काही नाही. मुंगळा चावला झालं.
- पण एवढा मुंगळा चावेपर्यंत थांबावंच का माणसाने. आधीच त्याला दूर करावं.
- अगंपण कळायला तर हवं ना मुंगळा हातावर आहे ते?
- वा, म्हणजे झोपला बीपला होतास की काय?

तिच्या लाडिक प्रश्नावर त्याने तिला जवळ घेतली.

- हा समोरचा निसर्ग पाहतेस? विचार करत होतो की तो जास्त सुंदर का तू? आणि तेवढ्यात हा मुंगळा कडमडला. आता मला सांग, ह्याला काय म्हणावं? एका क्षणी मी समोरच्या दृश्याने बेभान झालो होतो, आणि मला भानावर आणलं कोणी? एका यःकश्चित मुंगळ्याने? आणि ह्या क्षणी मला ह्या नितांतसुंदर निसर्गापेक्षा हा मुंगळा अधिक वास्तव वाटतो आहे. अंतिम अस्तित्व कोणाचं असावं तर एका मुंगळ्याचं?

क्षणभर तिने त्याच्या बोलण्यावर विचार केला. अशा बोलण्याचं तिला नेहमीच आव्हान वाटत असे.

- अंतिम अस्तित्व त्या मुंगळ्याचं नाही, तुझंही नाही आणि माझंही नाही. खरंतर तुला जाणवणारं त्याचं अस्तित्व ही फक्त संवेदना आहे. ह्या क्षणी तुला त्याची संवेदना अधिक म्हणून त्याचं अस्तित्व तुला जाणवतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला तीव्रतेने जाणवली की दुसर्‍या क्षणी आपण तिच्या अस्तित्वाचा शोध घेत राहतो. जसा तू ह्या मेलेल्या मुंगळ्याच्या अस्तित्वाचा घेतोयस.

तो ह्या उत्तरावर विचार करत असतानाच,

- चल हो तयार आपल्याला बाहेर जायचंय ना?

असं तिने Crash Landing केलं. शब्दांच्या भरार्‍या मारून अचूक क्षणी जमिनीवर यायची देवयानीची ही अदा त्याला अतिशय प्रिय होती. त्याच्याशी बोलून ती आत निघूनही गेली. पण हा मात्र अजून तिच्या बोलण्यावर विचार करत होता.

- खरोखरच देवयानी मला सापडलेय का? की मी अजूनही तिचा शोध घेत आहे?

थोड्या वेळाने दोघं बाहेर पडले. मघाच्याच त्या नागमोडी वाटेवरून तो देवयानीबरोबर चालला होता. मघाशी पाहिलेल्या वाटेवर ते दोघं कसे दिसत असतील ह्याचा तो विचार करू लागला. त्या विचारात मुंगळ्याचं अस्तित्व कुठच्या कुठे नाहीसं झालं.

- एक प्रश्न विचारू? तो तिला म्हणाला.
- विचार ना.
- नेहमी मनात विचार येतो की देवयानी मला खरंच समजली का? की अजूनही मी तुझाच शोध घेत असतो?
- असं का वाटावं तुला?
- माहीत नाही. पण सतत मी तुलाच शोधतोय असं वाटतं.
- हे बघ, काही गोष्टी न शोधताच समजतात. तो मुंगळा तुला क्षणात समजला की नाही, मग मला तू किती दिवस ओळखतोस?
- हो. मुंगळ्याने ज्या पद्धतीनं ओळख पटवली त्या पद्धतीने नक्कीच ओळख पटकन पटते. तुझी पण पटव ना. असं म्हणून त्याने आपला हात तिच्यापुढं केला.
- चल काहीतरीच.

लाजतंच तिने त्याचा हात दूर केला. मनातल्या मनांत ती मुंगळा झाली.

चालत चालत दोघंजणं देवळात पोहोचली. त्याचा देवावर कधीच विश्वास नव्हता पण देवयानीचा होता. त्याने तिच्याबरोबर देवळात यावं असा तिचा आग्रहही नव्हता. अजून अर्ध्या तासाने बरोबर सात वाजता देवळासमोर भेटायचं ठरलं.

पूर्णपणे अंधार झाला नव्हता. पण ऊनही नव्हतं. सगळा परिसर संधिप्रकाशांत नाहून निघाला होता. पश्चिमेकडे चाललेली रंगपंचमी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. त्या पार्श्वभूमीवर काळ्या पत्थरातून घडलेला डोंगर अधिकच काळा दिसत होता. पायवाट त्याला डोंगराच्या दिशेनं नेत होती. डोंगर तसा उंच नव्हता आणि पायवाटही मळलेली होती. तसाही कुठेतरी अर्धा तास घालवायचाच होता. त्याने डोंगर चढायचं ठरवलं. पायवाट घट्ट पकडून तो डोंगर चढायला लागला. पंधरा मिनिटांतच तो डोंगर माथ्यावर पोहोचणार होता. मळलेली वाट अधिकाधिक कोरी होत होती. श्वासाचा भाता अधिकाधिक फुलत चालला होता. पायांबरोबरच विचारांनीही गती घेतली होती.

विचारांच्या सोबतीनं तो डोंगरमाथ्यावर कधी पोहोचला हे त्याचं त्यालासुद्धा कळलं नाही. क्षणभर श्वास घेण्यासाठी तो तिथेच बसला. परत फिरण्याअगोदर पलीकडल्या बाजूला काय आहे ते पाहण्यासाठी तो गेला आणि त्याने जे दृश्य पहिलं त्याने त्याचं भानच हरपलं.

सुमारे शंभर सव्वाशे पायर्‍या त्या काळाकभिन्न डोंगरातून थेट समुद्रात उतरत होत्या. देवळाकडून डोंगरावर येण्यास पायर्‍या नसाव्यात, पण डोंगरातून पाण्यात उतरणार्‍या पायर्‍या असाव्यात ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्या पायर्‍या डोंगरातून कोरलेल्या होत्या. फेसाळ समुद्राच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकच उदास आणि एकट्या वाटत होत्या. त्याच्या नकळतच तो पायर्‍या उतरायला लागला. आपण एका खोल खोल विहिरीत उतरत आहोत असा त्याला भास होवू लागला. तिन्ही बाजूने काळा डोंगर आणि समोर समुद्र.

पायर्‍या जिथे समुद्रात उतरत होत्या तिथे एक विचित्र कोपरा तयार झाला होता. एकच भरतीची लाट आणि त्या कोपर्‍यात असलेल्या कशाचीही समुद्राहूती घडणार होती. पाणी अजून तेथे पोचलं नव्हतं. भरतीला अजून अवकाश होता. पायर्‍या उतरून तो त्या कोपर्‍याच्या डोंगराकडच्या भागात जाऊन उभा राहिला. त्या पार्श्वभूमीचं वर्णन रौद्र ह्या एकाच शब्दाने करण्याजोगं होतं. पण त्या रुद्रतेतही सौंदर्य होतं, जे खिळवून ठेवणारं होतं, आकर्षक होतं, खेचणारं होतं. पाण्याचे अगणित तुषार येणार्‍या प्रत्येक लाटेसरशी त्याच्या अंगावर उडत होते. तरीसुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. अजून थोडं पुढे जाणं धोक्याचं असणार होतं, तरीदेखील त्याला पुढे जाण्याचा मोह झाला.

तो पुढे होणार इतक्यात समोर त्याला काही हालचाल दिसली. एक तरुणी काळ्या पत्थराला पाठ टेकून समुद्राकडे एकटक पाहत असलेली त्याला दिसली. खरंच कोणी तिथे आहे का आपल्याला भास होतोय, हेही त्याला कळेना. आता अंधारही पडायला लागला होता. नीट काहीच दिसत नव्हतं. अस्पष्ट ते स्पष्ट होण्यासाठी म्हणून त्याची पावलं तिथेच थबकली. सागराकडे खेचली गेलेली पावलं आता तिच्याकडे खेचली जाऊ लागली.

तो तिच्या दिशेने वळणार इतक्यात कुणीतरी त्याला हाक मारलेली त्याने ऎकली. तो आवाजच्या दिशेनं वळला. देवयानी शेवटच्या पायरीवर उभी होती. खरंतर ती शेवटची पायरी नव्हती. त्या पायरीखाली अजून दोन पायर्‍या होत्या पण वाढलेल्या भरतीच्या पाण्यात त्या हरवल्या होत्या. देवयानी चिंब भिजली होती आणि त्याच्या लक्षात आलं की तोही चिंब भिजलाय. हरवलेल्या जाणीवा परत आल्या आणि त्याचा लक्षात आलं की तो गुडघाभर पाण्यात उभा आहे.

जीवाच्या आकांताने तो पायर्‍यांच्या दिशेनं धावला. पाण्याबाहेर आल्यावर त्याला हायसं वाटलं, पण मघाशी पाहिलेली तरुणी अजूनही पाण्यातच असल्याचं त्याचा लक्षात आलं. तो तिला पाहण्यासाठी वळला. त्याची नजर तिथे पोहोचेपर्यंत एक अजस्र लाट त्या कोपर्‍यात येऊन धडकली. आवेगाने तो देवयानीकडे वळला. देवयानीने त्याला मिठीत घेतलं. तिच्या मिठीत खूप सुरक्षितता वाटली. लहान मूल होवून तो तिच्या मिठीत रडला........

- अरे ऊठ आपल्याला बाहेर जायचंय ना? उशीर होईल नाहीतर. लहान मुलाने निरागसपणे आईच्या कुशीत झोपावं तसं तिच्या कुशीत झोपलेल्या त्याला ती म्हणाली.

............ तो दचकून जागा झाला. स्वप्नाची सीमा ओलांडून तो सत्याच्या साम्राज्यात आला. क्षणभर आपण कोण आहोत, कुठे आहोत, ह्याचं त्याला भानंच राहिलं नाही. हळूहळू सगळं लक्षात आलं. ती तीच होती पण तो मात्र अजूनही स्वप्नातल्या देवयानीला शोधत होता. ती मात्र काळाच्या लाटेबरोबर कधीच खूप खूप दूर निघून गेली होती. खरंच बराच उशीर झाला होता...........

Sunday, April 22, 2007

बरखा बॆरी भयो.....

बरखा बॆरी भयो.....सजनवा....गॊड मल्हार रागातील हा ख्याल बाई गायला लागतात. बाईंचा फुरशासारखा गिरकी लागलेला आवाज, सुरवातीच्या ताना आणि समेवर बरोबर... बॆरी भयो सजनवा....लाजवाब. त्या तानांमधे, गॊड मल्हारामध्ये आणि त्रितालाच्या साथीमध्ये मी बुडून जातो. बरखा बॆरी भयो....क्या बात हॆ...बरखा बॆरी भयो......

संध्याकाळचा सुमार आहे पण रात्रीलाही लाजवेल असा अंधार झालाय. पाऊस धुवांधार कोसळतोय. समोरच्या रस्त्याचा तलाव झालाय. गटारं चुकवण्यासाठी मी रस्त्यामधल्या divider वर चालतोय कारण रस्ता दिसतंच नाहीये. मीच नाही माझ्याबरोबर असंख्य लोकं चालतायत. मुंग्यांची रांग लागावी तशी माणसांची रांग लागलेय. पाऊस कोसळतोच आहे. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर फक्त एकच भाव आहे. चिंता.

अहाहा! बॆरी भयो.....बरखा बॆरी भयो.......क्या बात हॆ....वाह......बहोत खूब...

कुणाचीतरी किंवा स्वतःची चिंता. घरी पोहोचायचं कसं? माझं बाळ घरी एकटं असेल. एक आई तडफडून सांगतेय. सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे. कुणाची पिल्लं घरी, तर कुणी पिल्ल स्वतः रस्त्यावर, घरट्यापासून दूर. Mobiles चालत नाहीयेत, दिवे चालत नाहियेत, ट्रेन, बसेस, गाड्या काहीच चालत नाहीये. चालतायत फक्त पाय. पाण्यातून रस्ता काढत काढत आपापल्या घरांकडे निघालेले लाखो पाय.

......जाने न देत मोहे पी की नगरिया.......जाने न देत.....वाहवा........समेवर परत बॆरी भयो.......बरखा बॆरी भयो........

कोणीतरी ओरडतं. पाय, पाय. पांव. समोरच्या तळं झालेल्या रस्त्यातून दोन पाय तरंगताना दिसतात. रांगेतली एखादी धीट मुंगी पाण्यात उडी मारते. चार हात मारून त्या पाय़ांपर्यंत पोहोचते. पोचल्यावर कळतं. ते पाय चालायचे कधीच थांबलेत. उलटं तरंगणारं प्रेतच हाताला लागतं. पोरंसोरं घाबरतात. आयामायांचे हात हुंदका आवरण्यासाठी तोंडाकडे जातात. मी मात्र चालत राहतो. मुंगीसारखा रांगेमध्ये. हूं की चू न करता.

......काय तान आहे.....सुरेख....बरखा बॆरी भयो.......सजनवा.....

नऊशे चव्वेचाळीस मि.मि. पाऊस अवघ्या काही तासांत. चारशेसहा लोकं त्या पावसांत गेली. कायमची. बुडून, वाहनात अडकून. रेटारेटीत. चारशे पन्नास करोड रुपयांचं नुकसान. पाण्यात. मी मुंग्यांची रांग सोडून माझ्या वारुळाकडे चालायला लागतो. तळ मजल्यावरच्या वारुळातल्या मुंग्या वरच्या मजल्यांवर सरकल्यायत. त्यांची घरं पाण्याने भरलेयत. कसा बसा मी माझ्या वारुळात पोहोचतो.

......बरखा बॆरी भयो......बाई पुढच्या ओळींना हात घालतात. गरज गरज बरसे बदरिंया......चमकन लागी पापी बिजुरिया, जाने न देत मोहे पी की नजरियां........बरखा बॆरी भयो.........बरखा बॆरी भयो......सजनवा......

आमची गाडी डोंगरावरून खाली उतरतेय. समोरचा विस्तीर्ण परिसर फक्त एकाच रंगात माखलाय. तांबड्या. हिरवा रंग नावालाही नाही. गाडी डोंगर उतरते. रस्त्याच्या कडेला पिवळं, वाळून गेलेलं गवत दिसतंय. झाडांचे नुसते वठलेले बुंधे आणि फांद्या. पानं कधीतरी असावीत अशी शंकासुद्धा येत नाहीये. तहानेने घसा कोरडा झालाय. समोरच्या धुराळलेल्या गावात गाडी शिरते. गावठाणातली एक विहीर. गाडी थांबते. उतरून बघतो तो कोरडी ठणठणीत. बाजूला टॅंकरच्या वेळा लिहिल्यायत. शेजारच्या दुकानातून मी बिस्लेरी ची बाटली आणि थोडं खाणं विकत घेतो.

......बरखा बॆरी भयो......आता बाईंचा आवाज चांगलाच तापलाय. मुडात येऊन तो सुंदर हरकती घेतोय. त्रितालाची लय वाढायला लागली आहे. एक जोरकस तान मारून बाई समेवर अलगद....बॆरी भयो...... वर येतात.......

गाडी पुढे जाते. मधे कुठे पाण्याचा हातपंप दिसतोय. मुलं त्याच्यावर काहीतरी खेळतायत. त्या पंपाचं तोंडच समोरच्या मातीच्या ढिगार्‍यात बुडलंय. आजूबाजूला मोकळी जमीन. जमीन नव्हे, शेत आहे ते. उन्हाने रापलेली. मोकळी ढाकळी ढेकळं डोळ्यात भरून राहतात. शेताच्या बांधावर एक शेतकरी उकिडवा बसलाय. आभाळाकडे डोळे लावून. त्याच्या डोळ्यांत रडायलासुद्धा पाणी नसावं.

.......बरखा बॆरी भयो.......सुभानल्ला......काय हरकती....वाहव्वा.....वाह्व्वा....जाने न देत मोहे.......

गावातून बाहेर पडताना शेवटी गावदेवीच असावं असं एक देऊळ आहे. त्याच्यापुढे गावाची वेस आणि वेशीच्या बाहेर एका मेलेल्या बॆलाचं धूड पडलंय. चारा नाही, पाणी नाही. रोगामुळे कसाईसुद्धा गिर्‍हाईक नाही. गिधाडं त्याच्या अंगाचे लचके तोडतायत. माझ्या हातांत गावात विकत घेतलेल्या खाण्याच्या पदार्थाची पुडी आहे. त्या पुडीला बांधणार्‍या वर्तमानपत्रावर दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्ज, जवाहर रोजगार योजना ह्यांबद्दल काही लिहिलंय. मघाशी घेतलेली बिस्लेरीची बाटली फोडून आता मी पाणी पितोय. आता कसं थंडगार वाटतंय.

.....बॆरी भयो........क्या बात हॆ.......तबल्याची गत....झकास......शेवटच्या अणुकुचिदार ताना घेऊन बाई शेवटची तिहाई घेतात. बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो.......

Sunday, April 15, 2007

नशा...

ह्या रिक्षावाल्याचा काय problem आहे कळंत नाही. मझ्या आणि मंजूच्या का असा मागे लागलाय? सूखाने जगू देत नाही साला. ह्याला बरोबर वठणीवर आणला पाहिजे. पण सहजशक्य आहे का ते? युद्धच पुकारावं लागेल.

टेह्ळणी करा, टेहळणी करा, शत्रू केव्हा नेम साधेल सांगता येत नाही. चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त हवा..... पण कसा बंदोबस्त ठेवणार? सामान तरी कितीसं आहे इथे? सहज माझी नजर खुर्चीकडे जाते. मी झटकन जावून खुर्ची उचलतो आणि खिडकीसमोर ठेवतो. इथूनच दिसतो साल्यचा रिक्षास्टॅंड. पण नुसत्या खुर्चीनं भागणार नाही. मी परत टेबलाजवळ जातो आणि त्यच्यावरची पुस्तकं खुर्चीवर रचतो......... हं, आता झाली भिंत चिरेबंद. आता ये म्हणावं साल्याला. आणि बरं का रे साल्या, मी काही रंगांधळा नाही. तुमचे खाकी कपडे बरोबर ओळखतो मी.

अजून काय बरं हवं होतं.......... हं, दुर्बिण. दुर्बिण कुठे ठेवलीत बहिर्जी?....... मिळत कशी नाही? मी टेबलावरचं वर्तमानपत्र घेतो, त्याची गुंडाळी करतो. झाली दुर्बिण. खुर्चीवर पाय ठेवून आता मी दुर्बिणीतून खिडकीबाहेर बघतो....... हं. हा रस्ता, हा रस्त्यावरचा विजेचा खांब, ह त्याला तेकून पथारी पसरून बसलेला चांभार आणि हा बसस्टॉप. हा रिक्षास्टॅंड, आणि ही मंजू. ही कशाला मरायला चाललेय तिथे? हजार वेळा सांगितलं रिक्षाने जावू नको म्हणून. ए, तो फसवेल तुला, गटवेल तुला. Thank God वाचलो. ती बस स्टॉपवर जावून उभी राहिली.

हा कुणी मला धक्का मारला? अरे, हा रिक्षावाला इथे काय करतोय? आणि साला मला बाजूला ढकलून माझ्याच दुर्बिणीतून बघतोय. बाहेरचं वर्णन मला ऎकायचं नाहिये रे. कोण बाई? आपल्या बाई? हरामखोरा ती बायको आहे माझी. आपल्या बाई म्हणू नकोस साल्या........... हिला पण आत्ताच गॅस संपल्याची वर्दी द्यायचेय. घरात स्टोव्ह आहे, रॉकेल आहे. .........माझं त्याच्याकडे लक्ष जातं. तो अजूनही माझी दुर्बिण वापरतोय. मी त्याला पुन्हा बजावतो. ऎकत नाही म्हणजे काय? मझा राग अनावर होतो. मी त्याला जीवाच्या आकांताने ढकलतो.

साला तो चिडला बहुतेक. उठून अंगावर येतोय. ढकलतोय. अरे साल्या जबरदस्ती करतोस काय? अजून मला तो पाठी ढकलतोय. सुशिक्षित म्हणून माज आला का असं विचारतोय. अरे बाबा माझा तसा हेतू नव्हता. शी. काय ही भाषा..... म्हणे बायको राखायची जमत नाही तुम्हाला आणि सुशिक्षित म्हणून चांगले नग उचलता? तुमच्यासारख्या छक्क्यांनी खरंतर लग्नच नाही केली पाहिजेत. म्हणे गरज असेल तर अशा बायकांशी लग्न करा ज्यांना पाहून पुरुषांच्या माना खाली गेल्या पाहिजेत. गांडीत दम नाही तर आणली कशाला बायको? का पाहू नये आम्ही वाईट नजरेने तुमच्या बायकांकडे? आम्हाला माहितेय तुम्ही झाट वाकडं करू शकत नाही आमचं....... अरे जा ना साल्या आता बोललास तेवढं पुरे नाही का? परत का येतोय हा? शी, पुन्हा गलिच्छ भाषा.......... म्हणे बाईंना स्कर्ट का काय ते घालायचा आग्रह करा. ते क्रीम बीम पायाला लावून केस झाडायचं.

गेला साला. पण काय ही घाणेरडी भाषा. त्याचे शब्द माझ्या कानांत वावटळीसारखे घुमतायत. असह्य. असह्य होतंय सगळं. अगतिकता का नपूंसकत्व? त्याचा आवाज चारही बाजूंनी माझ्यावर हल्ला करतोय. सहनशक्तीपलिकडे आहे माझ्या हे सगळं. असहाय होवून मी जोरात किंचाळतो. गेले, त्याचे घुमणारे आवाज गेले. आता फक्त नीरव शांतता.

मी थरथरतोय. थरथरतच मी खिशातली सिगरेट काढतो. पेटवतो. .........आम्ही तुमचं झाट वाकडं करू शकत नाही काय? आम्हीही तुमचं वाकडं करू शकतो.......... हातातली सिगरेट जमीनीवर आपटून मी ती चिरडतो........... असा चिरडेन मी तुला साल्या. शिपाईगिरी रक्तात आहे आमच्या. थोरल्या आबांचे वारस उगीच नाही आम्ही. ही सगळी पृथ्वी रिक्षारहित करेन आणि मगच प्राण सोडेन. अरे, ह्या छोट्या मोठ्या लढाया? ह्या हरल्या म्हणून काय झालं. The ultimate Victory is ours. माझ्यासारखी अठ्ठावीस वर्षाची कोवळी पोरं गंडवता?

हे मला एकट्याला झेपेलसं वाटत नाही. आबा आणि थोरल्या आजोबांची मदत घ्यायला हवी. पण ते तर मृत आहेत. मग? प्लॅंचेट. प्लॅंचेट करून त्यांना बोलावता येईल. मी टेबलावरचा खडू उचलतो आणि एका बाटलीचं झाकण घेतो. जमीनीवर एक गोल काढून त्याच्या मध्यभागी ते झाकण ठेवतो. आता पूर्वजांना मदतीचं आव्हान करायला हवं.

.......हे स्वर्गस्थ पूर्वजांनो, तुमच्या ह्या भाग्यशाली कुळातला नव्या दमाचा शिलेदार तुम्हाला आवाहन करीत आहे. या, आणि तुमच्या ह्या कुलदीपकाला तुमच्या दिव्य शक्तिस्रोताने भारून टाका. शक्ती द्या मला लढण्यासाठी कारण हे युद्ध साधंसुधं नाही. हे महायुद्ध आहे. नाही हे दोन व्यक्तींतलं, नाही वर्गातलं, हे महायुद्ध आहे दोन प्रवृत्तींतलं. एकीकडे आपला म्हणून मी तर दुसरीकडे त्यांचा म्हणून तो. रिक्षावाला. उन्मत्त, उद्दाम, उथळ, उलट्या काळजाचा रिक्षावाला. ज्याच्या नसानसांत भरलेय गुंडगिरी, दादागिरी. मिटरप्रमाणे पॆसे घेत नाही साला.

हा रुद्राचा आवज कुठून येतोय? प्रकाशही कमी झालाय. प्लॅंचेटचा परिणाम? .............या आबा, या थोरले आजोबा तुम्हीही या. शक्ती द्या मला लढण्यासाठी शक्ती द्या मला Please शक्ती द्या मला. Oh Its moving टोपण हललं प्लॅंचेट्ने येणार असा कॊल दिला. ते येणार शक्तीचे घट भरून आणणार, ते येणार, ते आले, ते आले, ते आले........... हा कसला आवाज? कोण टाळ्या वाजवतंय? छे.

रुद्राच्या मंत्रोच्चारात काही क्षण कसे गेले कळंत नाही. प्रकाशही पूर्ववत होतोय असं वाटतंय. सारं कसं शांत शांत वाटतंय........ मंजू, माझी मंजू. किती स्वप्न होती आपल्या दोघांची. कॉलेज संपण्याआधी लग्न केलं ते ही सगळी स्वप्न. प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच. वेळ कमी पडू नये म्हणून. पण प्रत्यक्षात मात्र, प्रत्यक्षात मात्र मी असा विचित्र वागायला लागलो. पण मी तरी काय करणार मंजू. त्याने आपल्याला जगूच द्यायचं नाही असं ठरवलं होतं ना. आपल्या प्रत्येक सुखाच्या आड येत होता तो रिक्षावाला. घरी, ऑफिसात, बाजारात, दुकानात. पण आता तू काळजी करू नकोस. आज त्या रिक्षावाल्यचा पुरता बंदोबस्त झालाय.

हरामखोरा, आम्ही चांगले नग उचलतो म्हणून तुमचं फावतं. आज थोरले आबा उभे आहेत तिच्या परतीच्या वटेवर. मंजूच्या. पाय बघायचेत काय तुला साल्या तिचे? पाय बघायचेत? बघ म्हणावं किती बघतो लुळे पाय ते. तिला कमरेखाली निकामी करण्याचं आश्वासन दिलंय थोरल्या आबांनी. कुबड्या देणारेत तिच्या हातांत. मंजूच्या. हो, काहीही करू शकतात ते. स्वर्गस्थ आहेत ते. आणि यदानकदा नाही जमलं, तर आबांनी गॅस सिलेंडर एवढ्यात मिळणार नाही ह्याची व्यवस्था केलेय. अरे, आबा म्हणजे आजोबा, वडील नाहीत मठ्ठा. ते अजून स्वर्गस्थ नाहीत. आणि मी इथे स्टोव्ह ला रॉकेल ची आंघोळ घालून ठेवलेय. पेटवला की भडका. आता सिलेंडर मिळाला नाही म्हणजे बाई स्टोव्ह पेटवणारच ना? बाई चांगल्या दिसतात म्हणून माना वळतात ना तूमच्या? आता वळवा माना, आता दाखवा हिम्मत मान वर करून बाईंकडे बघायची. मांजरासारखे सरळ व्हाल रे. ढुंगणाला पाय लावून पळूनंच जाशील तू.

विजयाचा कॆफ आता माझ्या नसानसांतून भिनलाय. रिक्षावाल्याचा पुरता बंदोबस्त झालाय. आबा आणि थोरल्या आबांनी मिळून त्याची पुरती वाट लावलेय........... सहा नंबरचा प्रतिकार काय आमचा? आता पहा आमची शिपाईगिरी............. शिपाई सावधान म्हणून मी सावधान पवित्रा घेतो. कोणी दरवाजा वाजवतंय का? असेल. आता कोणीही दरवाजा वाजवूदे. लढाई महत्त्वाची. शिपाईगिरी महत्त्वाची. युद्ध, महायुद्ध महत्त्वाचं.

..........ही मंजू माझ्या शेजारी येवून काय बरळतेय? सिलेंडर वर उचलून आणायला रिक्षावाल्याने मदत केली म्हणून सांगतेय. काय डोकं बिकं फिरलं का हिचं? ती बेअक्कल आहे. आपण आपली कवायत करावी. .......मी जोरात घोषणा देत कवायत करतो आणि मंजूच्या समोर येवून तिला एक salute ठोकतो impression मारायला. ती का रडतेय? आपला विजय झालाय मंजू. आपण जिंकलोय..... ती रडत रडत घराबाहेर निघून जाते...........

आला का हा रिक्षावाला पुन्हा. साल्या तुझं म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. वाकडं ते वाकडंच. बायको सोडून गेली म्हणून मला डिवचू नकोस हरामखोरा. तुझ्या कुजकट बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी एक दहा रुपायाची नोट त्याच्या अंगावर भिरकावतो आणि त्याला get out चा आदेश देतो. तो जवळ्जवळ घाबरूनच निघून जातो.......... हं, आता मी शांतपणे शिपाईगिरी करू शकेन. शिपाई salute कर. असं म्हणून मी एक salute ठोकतो.

समोरून एक लाल प्रकाश माझ्यावर एकवटतो. बिगुल वाजल्याचं पार्श्वसंगीत सुरू होतं. प्रकाश कमीकमी होत जातो, तसे समोरचे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. पडदा हळू हळू बंद होतो. टाळ्यांचा कडकडाट चालूच रहातो. मी माझ्या नशेमेधे धुंद तिथेच उभा असतो. मघाशी मला धमकावणारा रिक्षावाला विंगेतून धावत येतो. मला आलिंगन देतो. नाटक संपलेलं असतं, मी भानावर येत असतो. पण नाटकाची ही नशा मात्र अधिकाधिक चढत जात असते.

___________________________________________________________________

हे वर्णन डॉ. चंद्रशेखर फणसळकर ह्यांच्या "रिक्षावाला" ह्या एकांकिकेतील शेवटच्या प्रवेशाचे आहे. वर्णनात असलेली संवादात्मक वाक्य ही त्या प्रवेशातून थेट उचलली आहेत.

___________________________________________________________________