Wednesday, September 27, 2006

आप कतारमें हॆ.....

आमचं विमान कतारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आणि कुणीही जाणीव करून न देताच आपण एका खूप वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव झाली. जिथे पहावं तिथे वाळू आणि नजर पोचेपर्यंत वाळूच. अधुन मधुन छोट्या छोट्या इमारती होत्या पण त्यांनासुद्धा रंग वाळूचाच. आपल्यासारख्या फ़क्त चॊपाटीभर वाळू फायची सवय असलेल्याला इतक्या वाळूचं अजीर्ण झालं नसतं तरच नवल. सगळं अगदी रुक्ष वाटंत होतं. त्यात लोकांनी, त्यांना आखाती देशांबाबत असलेली थोडीथोडकी आणि नसलेली बरीचशी माहिती पुरवलेली होती. जाणारा माणूस पहिल्यांदाच चाललाय हे पाहून तर लोकं काहीही सांगतात. ते सगळं आठवलं आणि उगाचच आपल्या सुजलाम सुफलाम देशाची आठवण झाली.

उतरल्या उतरल्या immigration officer ची आणि आमची भेट झाली. तिथे विमानतळ अधिकारीसुद्धा लष्करासारख्या ग्णवेषात असतात. त्यांची भाषा अरबी आणि आपली इंग्रजी. (खरंतर आपली भाषा मराठीच, पण इथे अगदीच पर्याय नाही म्हणून इंग्रजी). आपली भाषा त्यांना कळत नाही आणि आपली भाषा त्यांना कळंत नाही. (अर्थात त्यांना इंग्रजी येत नसल्याने आपण ती सुखाने बोलू शकतो हेही तितकंच खरं). त्यात तो गणवेषधारी असल्याने आपण back foot वर. थोडावेळ अरबी आणि इंग्रजीचा हुतुतू रंगल्यावर, तो आम्हाला आमचे papers clear आहेत आणि आम्ही बाहेर जावू शकतो, असं सांगत आसल्याचं उमजलं. त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. अजून दोन महिने इथे रहायचं होतं. किती वेळा जीव भांड्यातून बाहेर पडणार ह्याचा हिशेब करंत करंतच आम्ही विमानतळातून बाहेर पडलो. पण एक गोष्ट मात्र मी मनाशी नक्की ठरवली, की ह्यापुढे, देव न करो, पण इथल्या गणवेषधारी माणसाशी गाठ पडलीच, तर त्याच्याशी मराठीत बोलायचं, आपलं इंग्रजी काय आणि मराठी काय, त्याला सारखंच.

आखाती देश म्हंटला की सर्वप्रथम आपल्याला आठवतो तो तिथला उकाडा. पण तिथे मात्र अगदी विरुद्ध अनुभव आला. नव्हेंबर डिसेंबर असल्याने तिथे गुलाबी थंडी होती. मध्ये मध्ये ती अधिक गुलाबी झाली की आम्हा मुंबईकरांना दणका देवून जाई. थंडीचं सोडा, पण अरबस्तानातला पाऊस पाहूनतर अगदी माझी "आजि म्या ब्रम्ह पाहिला", अशी अवस्था झाली. आणि नुसता पाऊस नाही, तर बदाबदा कोसळणारा पाऊस बघूनतंर मला भरूनंच आलं. तर असा हा तिथे कधीमधी हजेरी लावणारा पाऊस, आमच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सकाळी धो धो कोसळायला लागला. (मी प्रशिक्षण द्यायला कतारला गेलो होतो, ह्यावर माझ्या ओळखीच्या ब‍र्‍याच लोकांचा अजुनही विश्वास नाही.) बरं पहिला दिवस असल्याने बरंचसं साहित्यही माझ्याकडेच होतं. एका हातात माझी laptop ची bag, दुसर्‍या हातात training material ची पिशवी आणि धो धो कोसळणारा पाऊस अशा अवस्थेत मी taxi ची वाट पहायला लागलो. द्दहा मिनिटं झाली, पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तरी taxi नाही. आता करायचं काय? training सुरू व्हायची वेळ झालेली. पाऊस थोडा कमी झालेला, म्ह्टलं चालायला सुरूवात करूया, मिळेल taxi. नवा देश नवं शहर, रस्ता कुठून माहित असायला? तेवढ्यात एक माणूस आडोशाला उभा असलेला दिसला. दक्षिण भारतीय वाटत होता. त्याला रस्ता विचारला. सुदॆवाने त्यालाही मला जायचं होतं तिथेच जायचं होतं. म्हणाला मिळेल taxi. पुन्हा पंधरा मिनिटं taxi ची आराधना करूनही taxi काही आली नाही आणि आम्ही पुन्हा चालायला लागलो. बोलता बोलता कळ्लं की तो श्रीलंकन आहे. दोन्ही हातांत भरपूर सामान घेवून चालताना होणरी माझी तारांबळ त्याच्या लक्षात आली. आपण होवून त्याने माझी bag घेतली. यथावकाश taxi मिळाली आणि मझं ठिकाणही आलं. मी त्याला पॆसे देवू केले. "I don't accept money from friends". अरे? एका तासाच्या ओळखीत ह्याने तर मला आपला मित्र करून टाकलं? जाताना मला तो आपलं personal card द्यायला विसरला नाही. म्हणाला, कोलंबोला आलास की नक्की घरी ये. फ़िश करी खायला घालीन. त्या न खाल्लेल्या फ़िश करीची चव अजूनही तोंडात रेंगाळतेय.

पण त्या दिवसापासून taxi चा मात्र मी धसकाच घेतला. बरं तिथे taxi ला दुसरा पर्याय नाही. कारण तोच एकमेव public transport. Train तर सोडाच पण कतारमध्ये school bus सोडून दुसरी कोणती bus ही दिसली नाही. पण एकदा taxi मिळाली की त्या सारथ्याबरोबर गप्पा मारण्यात वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. असाच एकदा एक पाकिस्तानी सारथी मिळाला. मी सवयीनेच त्याला विचारलं,
- आप कहांके हॆ? (आश्चर्याची गोष्ट म्हणजे. माझं खास ठेवणीतलं, अस्सल मराठमोळं हिंदी त्याला समजलं.)
- पाकिस्तानके. आप कहांके हॆ. त्याचा प्रतिप्रश्न.
- आपके पडोसी हॆ, इंडियासे. (भारताबाहेर कुठल्याही भाषेत भारताला "इंडिया" च म्हणतात. अगदी मराठीतसुद्धा.)
क्षणभर त्याने एक छोटा pause घेतला.
- ख्रिश्चन हॆ क्या? (मी हिंदू किंवा मुसलमान नाही असं त्याला का वाटलं ते तोच जाणे.)
- हिंदू. माझं संक्षिप्त उत्तर.
हिंदू म्हटल्यावर तो ज्या त्वेशाने वळला ते पाहून जवळजवळ माझी बोबडीच वळली होती, पण त्यपूर्वीच तो म्हणाला,
- हिंदू हो ना तो बिलकूल डरनेका नही.
मी बहुदा "डरलो" हे त्याने ओळ्खलं असावं, पण मी आपण त्या गावचेच नाही हे दर्शवणारा अभिनय केला. पण त्यच्यावर माझ्या अभिनयाचा काहीही परिणाम झाला नाही.
- मॆ हूं ना? कुछ जरूरत पडे तो मुझे बोलिये, मॆ जरूर मदत करुंगा.
त्याचं हे भारतप्रेम समजायला मलाच थोडा वेळ लागला. माझ्या चेहेर्‍यावरचा गोंधळलेला भाव बहुदा त्याने ओळ्खला.
- एक काम किजिये, आप पॆसेही मत दिजिये. आपसे क्या पॆसा लेना?

हे मात्र अतीच झालं. आमच्या मुंबईला taxi ने बरोबर पॆसे संगितले तरी आम्ही धन्य होतो, इथे त्याचा पकिस्तानी व्यवसाय बंधू साक्षात पॆसे नकोच म्हणंत होता. बळेबळेच त्याच्या खिशात पॆसे कोंबून मी बाहेर पडलो. अशा गोष्टीही घडू शकतात? का हे फ़क्त भारतीय उपखंडबाहेरच घडू शकतं?

असाच एकदा पाऊस पडत असताना, एक पाकिस्तानी taxi वाला मला म्हणाला होता, सांभाळून रस्ता cross कर, इथे पावसात गाड्या घसरून बरेच अपघात होतात. का कोण जाणे पण इथले taxi वाले फ़ार प्रेमाने वागतात असं वाटलं. भाडं जास्त असतं, कदाचित त्याचा परिणाम असेल.

आम्हाला रहायला जे अपार्टमेंट दिलं होतं, त्या बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावर एक पूल टेबल होतं. तिथून मी आणि माझा एक सहकारी घरी परतंत होतो. lift मधे आमच्या बरोबर एक अरब त्यांचा तो पांढरा झगा वगॆरे घालून उभा होता. माझा सहकारी त्याचा मजला आल्यावर उतरला. तोपर्यंत आम्ही एकमेकांशी मराठीत बोलत होतो. आता lift मधे मी आणि तो पांढरा झगा, दोघेच होतो. lift सुरू झाल्यावर त्याने मला विचारलं,

- कुठचे तुम्ही?
पांढर्‍या झग्याकडून अरबी किंवा अरबाळलेली इंग्रजी ह्याशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नसतं, त्यामुळे तो काय म्हणाला ते मला कळलंच नाही. मी त्याला अगादी "pardon me" म्हटलं. तो पुन्हा म्हणाला
- कुठचे तुम्ही?
एक क्षणभर माझा विश्वासच बसेना. पांढरा झागा घातलेला, दाढी वाढवलेला, आणि कुकरच्या रिंगसारखी रिंग डोक्यावर घालून डोक्यावरचं फडकं सांभाळणारा अरब, शुद्ध, अस्खलित मराठीत मला विचारतो, की मी कुठचा? हा प्रश्न ऎकल्यावर मी कोण हे मी विसरलॊ नाही हेच माझं नशिब.
- मुंबई.
माझ्या नकळंतच मी त्याला उत्तर दिलं. माझा उडालेला गोंधाळ त्याला कळंला असावा.
- तसा मी रत्नागिरिचा, पण मुंबईला होतो.
असं म्हणुन त्याने मला जे काही पठाणी आलिंगन दिलं, त्यानेच मी भानावर आलो. तो त्याचा मजला आल्यावर उतरलाही. मी मात्र ह्या सांस्कृतिक धक्क्यातून लिफ्ट तळ मजल्यावर आल्याशिवाय बाहेर आलो नाही.

बकी तिथले अरब एकदम खुशालचेंडू असतात. त्यांचे concepts clear आहेत. त्यांच्याजवळ चिक्कार पॆसा आहे, त्यामुळे काम करणं, हे आपलं काम नाही, हे त्यांनी पक्का ओळखलय. काम करायलाच तर बाहेरून इथे लोकं येतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, फिलिपिन्स, एवढंच काय पण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रिलियातूनसुद्धा लोकं येतात. पण ह्या सर्वांच्यात सरळ सरळ वर्गवारी आहे. सावळ्या किंवा काळ्या कातडीला जेवढा पगार मिळतो त्यच्या दुप्पट पगार गोर्‍या कातडीला मिळतो. सरळ सरळ हिशेब. तुम्हाला काय येतं, किती येतं ह्याला काही विशेष अर्थ नाही.

- पहिले काही दिवस ह्या गोष्टीचा त्रास होतो. पण मग सवय होते. आमचे एक स्नेही सांगत होते.
- Gulf ची नोकरी म्हणजे trap आहे. सुरवातीला रग्गड पॆसा मिळतो म्हणून लोकं येतात. परत गेलं तर इतका पगार मिळत नाही. अगदी इथला experience सुद्धा count होत नाही. पुढेपुढे सवय होवून जाते. वर्षातून एकदा एक महिना India ला जाय्ला मिळतं त्यावर वर्ष काढायचं.

तिथे सुबत्ता खूप आहे. ऎश्वर्य आहे. पण तरीसुद्धा काहीतरी कमी आहे. बाहेरून, भारतातून आलेली माणसं हसतात खिदळतात, पण कुठेतरी त्यांना आपण आपल्या देशापासून दूर आहोत ह्याचा दुःख असतं. आणि तिथले नियमही असेच आहेत की प्रत्येक क्षणाला ते तुम्हाला बजावत असतात की तुम्ही इथे परके आहात.
- मुंबईच्या airport वर उतरलं की एकदम घारी आल्यासारखं वाटतं. कोचिनचा जॉर्ज आम्हाला सांगत होता.

तसे आमच्या training मधे काही अरबी लोकही होते. काही दिवसांनंतर आमची त्यांच्याशी मॆत्रीही झाली. इतकी की मी त्यांच्याशी इस्लामवरूनसुद्धा गप्पा मारल्या. त्यांनाही मी भारताबद्धल आणि हिंदू धर्माबद्धल (मला असलेली) माहिती दिली. त्यांच्यातच मला, आपल्या डोक्यावरची रिंग माझ्या डोक्यावर ठेवून ती balance कशी करायची हे शिकवणारा युसुफ भेटला. माझ्या दहा मुलांपॆकी सर्वात मोठ्या मुलाएवढा आहेस आणि तरीसुद्धा मला शिकवण्याइतका अनुभव आहे असं म्हणुन कौतूक करणारा खलील भेटला. स्वतःच्या घरी जेवायला बोलावणारा पकिस्तानी मुहम्मद भेटला.

एक गोष्ट मात्र खरी, की कतारच्या वाळवंटातसुद्धा माणसाला माणसाबद्धल प्रेम आहे, ओलावा आहे. कदाचित वाळवंटातला शुष्कपणाच तो ओलावा माणसांमधे निर्माण करत असावा. मनात फक्त एकच विचार येतो की हा आपलेपणा आपल्या स्वतःच्या देशात का मिळत नाही? का आजुबाजूला असुनही, तो जाणवण्यासाठी, आपल्या घरापासून, देशापासून, फार फार दूर जावं लागतं, जिथे थोडासा ओलावासुद्धा मन सुखावून जातो.

Sunday, September 24, 2006

कोहम कोहम?

नमस्कार मंडळी,
आज माझा ब्लॊग लिहिण्याचा पहिलाच दिवस. गेले तीन आठवडे मी ब्लॊग न लिहिण्यासाठी कारणं शोधतोय. पण आज मात्र कोणतही कारण शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे हा ब्लॊग सुरू करण्यावाचून दुसरा पर्यायही नाही. प्रत्येक गोष्ट करताना ती आपण का करतो, ह्याचा पक्का विचार मनाशी करणं हा खरंतंर माझा स्वभाव नव्हे, पण हा ब्लॊग सुरू करताना का कोण जणे पण पहिल्यांदा हाच विचार येतो, की मी हा ब्लॊग का बरं लिहित आहे? वरवर पहिलं तर हा प्रश्न तसा सोप्पा आहे. पण खरं सांगतो बाबांनो, बराच विचार करुनही उत्तर सापडेना.
एकदा वाटलं, मी माझी रोजनिशी लिहिणार आहे. पण, ते वाटतं तितकं सोपं नाही. आपलं आयुष्य, आपंणच जगासमोर तटस्थपणे मांडणं, ह्यासारखं अवघड काम नाही. आणि असली अवघड कामं करणं मला तितकसं लाभत नाही असा माझा पूर्वानुभव आहे. मग काय बरं कारण असावं? कदाचित माझा असा गॆरसमज झाला असावा का, की आपण थोडं बरं लिहितो, आणि म्हणून आपण लिहित रहावं? माझं अत्तापर्यंतच लिखाण वाचून सुज्ञांस मी कसे लिहितो, ह्याचा अंदाज आला असेलचं आणि त्यामुळे, मी बरे लिहितो हे माझ्या ब्लॊग लिहिण्याचे कारण नसावे, हेही त्यांनी ओळ्खले असेलंच.
शेवटी, मी स्वतःशीच माझ्या ब्लॊग लिहिण्याचं कारण ठरवलं. माणूस जन्माला येतो तोच मुळी कोहम कोहम करत येतो. आणि मरताना जरी तो कोहम कोहम करीत मरत नसला तरी, जन्माला येताना पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलं असतंच असं नाही. त्यात तसं काही गॆर आहे असंही मला वाटंत नाही. जीवनाचा प्रवासंच मुळी आपलं स्वत्व शोधण्यसाठी असावा असं वाटतं. ज्याला तो कोण हे समंजलं, त्याला त्याचं आयुष्य समजलं, आणि ज्याला त्याचं आयुष्य समजलं त्याच्या आय़ुष्यात मजा काय ती राहिली. हे म्हणजे, पहिलेलं नाटक पुन्हा पाहिल्यासारखं आहे. त्यामुळे माणसाने कोहम कोहम करीतच जगावं, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर ताबडतोब मरून जावं. जेवढं ह्या प्रश्नाचं उत्तर कठीण, तेवढंच आयुष्य समृद्ध.
मग म्हंटलं चला, ब्लॊग लिहिण्याचं एकतरी कारण मिळालं. कोहम चा शोध घेत रहायचं. हा शोध घेताना, जगाच्या प्रयोगशाळेत आयुष्याचे प्रयोग करंत रहायचे, आणि निरिक्षणं ह्या ब्लॊग्मध्ये नोंदवायची. फारफारतंर अनुमान नोंदवायचं. निष्कर्श मात्र काढायचे नाहीत. कुणी वाचंलाच हा ब्लॊग, तर त्यांचा निष्कर्श काढायला ते मोकळे आसतील.......