Monday, December 04, 2006

पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा....

आज इथे खूप पाऊस पडतोय. का कुणास ठावूक पण पावसाने माझ्या मनातला एक कोपरा अलगद ओला करून ठेवलाय. माणसाचा अनूभव आपण त्याने बघितलेल्या पावसाळ्यांत मोजतो. मी मात्र आयुष्याच्या अनुभवांमधे हरवलेले पावसाळे शोधतो. कधी ते सापडतायत असं वटतं तर कधी त्यांचा अजिबात थांग लागत नाही. धो धो आला की आपल्याला चिंब करून सोडतो, त्याचा अनुभव त्या एका क्षणापुरता. तो आपण साठवून ठेवू शकत नाही. साठवून ठेवायचा प्रयत्न केला की मग त्याचं पाणी होतं, तो पाऊस रहात नाही. आणि मग आपण त्यला जुन्या आठवणींतच शोधायला लागतो.

धो धो पाऊस कोसळतोय, मी शाळेतून घरी येतोय. हातात छत्री आहे पण ती वार्‍याने उडतेय. मी रस्त्याबाजूच्या दुकानाच्या शेडमधे थांबतो. दप्तरातून लपवून आणलेली मोठ्ठी प्लास्टिक ची पिशवी काढतो. त्या पिशवीत दप्तर सरकवतो. पाठीवरचं दप्तर प्लास्टिकच्या पिशवीत लपतं आणि माझ्या हातात येतं. मी छत्री बंद करून खुशाल शेडबाहेर येतो. दप्तरातली पुस्तकं माझ्या हुशारीला दाद देत असतात. मी पावसात मनसोक्त भिजतो. रस्त्यात साठलेलं पाणी खुशाल माझ्या गमबुटांमधे जावू देतो. शक्य झालं तर साठलेल्या पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेतो. त्या गमबुटांत साठलेल्या पाण्याने मनातला एक कोपरा कायमचा भारून जातो. घर जवळ येतं तस प्लस्टिकच्या पिशवीतलं दप्तर हळूच बाहेर येतं. पिशवी कचर्‍याच्या टोपलीत जाते आणि वारा खूप असल्याने भिजल्याचं कारण आजीला सांगितलं जातं. आजच्यासारखा कधी पाऊस आला की पावसाबरोबर ते दप्तर, ती पुस्तकं, ती छत्री आणि आजीसुद्धा खूप खूप मागे रहिल्याचं जाणवतं

दर आठवड्यात यावा तसा ह्या आठवड्यातही रविवार येतो. रविवार म्हंटला की संध्याकाळी क्रिकेट खेळायचा कार्यक्रम ठरलेला असतो. नेहमी हवाहवासा वाटणारा पऊस रविवारी मात्र नकोसा झालेला असतो. एकदा का अंगण ओलं झालं की संध्याकाळपर्यंत ते नक्कीच वाळणार नसतं. मी दर पंधरा मिनिटांनी बाहेर येवून ढगांकडे पहात असतो. हे माझंच नाही तर सगळ्याच मुलांचं चाललेलं असतं. खेळाची वेळ जवळ येते तसं मनाला बरं वाटायला लागतं. आता पाऊस येणार नाही ह्याची हळूहळू खात्री पटू लागते, आणि अचानक सरींवर सरी कोसळू लगतात. पावसावर सगळी मुलं कावतात, बिचारा पऊस आमच्यासठी थांबतो. तशाच ओल्या अंगणात काही उत्साही मुलं क्रिकेट सुरू करतात, टेनिसचा चेंडू अवघा पाऊस स्वतःमधे साठवतो. मी तो जोरदार फटकावतो आणि तो सरळ सान्यांच्या घरात जातो. विळीवर दोन तुकडे झालेला चेंडू घेऊन साने आणि चाळीतली मुलं तेव्हा थांबलेला खेळ आता मझ्या मनात सुरू करतात.

नवरात्रातले धामधुमीचे दिवस असतात. संध्याकाळी सर्वांना रात्री होवू घातलेल्य नाटकाची चाहूल लागलेली असते. हॊशी कलाकारांना कार्यक्रमाचा ताण आलेला असतो. मनातल्या मनात संवादांची उजळणी चालू असते. अचानक आभाळ लाल होवू लागतं. चाळीतला कुणी जाणता सर्वांना सांगतो, हे ढग तर पावसाचेच. मग ह्या पावसाला कसंतरी कटवण्यासाठी मखरातल्या देवीच्या विनवण्या केल्या जातात. बर्‍याचदा पाऊस शहाण्या मुलासारखा आल्यापावली परततो. मखरातल्या देवीला नारळ वाहीला जातो. तेव्हाच्या त्या नाटकाचा पडदा अलगद अत्ता माझ्या मनात वर जावू लागतो. स्टेजवरच्या पत्रांमध्ये मी स्वतःला शोधत रहातो.

पंधरा ऑगस्टचा दिवस असतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त, पाऊस धो धो कोसळत असतो. मी भीमाशंकराच्या डोंगराला भिडलेला असतो. गणेश घाटाची वाट सोपी पण न संपणारी म्हणून शिडी घाटाची चटचट पोहोचणारी वाट पकडलेली असते. हाताने एका मोठ्या दगडाचा आधार घेतलेला असतो. पाय खालच्या वाटेला घट्ट धरून असतात. कानांमध्ये तुफ़ान वारा घोंघावत असतो आणि पावसाच्या धारा मला झोडपून काढत असतात. वार्‍यावर स्वार होवून आलेल्या पावसाचे धपाटे खावून असं वाटतं की ह्या क्षणी जर आपण इथे न येता घरी थांबलो असतो, तर किती बरं झालं असतं. आज मन असा कोणताही विचार न करता सरसर सह्याद्री चाढू लागतं.

मी आणि ती समुद्र्किनारी फिरत असतो. न बोलावून्सुद्धा पाऊस माझ्या मदतीला धावून येतो. अर्थातच आमच्या दोघांकडे एकच छत्री असते. एका छत्रीतून दोन जणांनी जाण्याची एरवी नकोशी वाटणारी कसरत हवीहवीशी वाटायला लागते. मरीन लाइन्सच्या कट्ट्यावर लाटा जोरजोरात आपटत असतात. हातात गरमागरम कणीस असतं आणि त्याला लावलेल्या मसाल्यापेक्षासुद्ध लज्जतदार असा तिचा चोरटा स्पर्श असतो.

विचार करता करता पाऊस थांबून उन्हं कधी पसरली कळलंच नाही. पावसाची साठवण करता येत नसली तरी आठवण आपण मात्र नक्कीच करू शकतो.