Saturday, January 27, 2007

एक शून्य माधव आपटे....

अत्ताच "डोंबिवली फास्ट" बघितला. मनामधे एक वादळ उधळलं. तो चित्रपट कसा आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच नव्हे. तो चित्रपट बघताना काही प्रश्न मनांत उभे राहीले. कल्पना आहे की सर्वच प्रश्नांना उत्तरं नसतात. पण परिक्षेतला अख्खाच्या अख्खा पेपर कोरा द्यावा? माधव आपटे शेवटी एक शून्यच व्हावा? का म्हणून?

खरंतर आपण सगळेच माधव आपटे आहोत. शक्यतो सरळ मार्गाने सामान्य जीवन जगण्याचा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. नियम पाळावे अशी आपल्या सर्वांचीच ईच्छा असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्षात आणायचं कुणी? त्या माधव आपटेने?

का आपण असं बुळ्यासारखं सहन करत जगायचं? सिग्नल तोडला म्हणून भरायला लागणार्‍या पाचशे रुपये दंडातले साडेचारशे रुपये वाचावेत म्हणून? का सगळेच नियम तोडतात, आम्ही एकटे काय जग बदलणार म्हणून?

मी बोललो कोणाविरुद्ध तर मलच मुस्काटात पडेल म्हणून शेपूट घालून आपण गप्प बसायचं? किती दिवस? ह्यापेक्षा किडे मुंग्यांचं आयुष्य बरं. आपल्याकडे ह्यावर एक रामबाण उत्तर आहे. सगळी system च सडलेली आहे असं म्हणायचं आणि आपण स्वतः त्या system चा एक अविभाज्य घटक बनत जायचं. कधी लाच देताना, तर कधी लाच घेताना. कधी सिग्नल तोडताना तर कधी जास्त पॆसे देवून licence बनवून घेताना.

कोणाची बनली आहे ही system? चंद्रावरचे का मंगळावरचे लोकं बनवतात आणि चालवतात ही system? तुम्ही आम्हीच बनलोय ना ह्या system ची चाकं, रस्ते, इंजिन आणि इंधन? मग का नाही आपण सगळे मिळून ही system सुधरवू शकत? का नाही आपण एका नागरिकाची कर्तव्य पार पाडू शकत. सगळा दोष इतरांवर तरी का मारायचा? उद्या इतरांनी express tower मधून उडी मारली, आपण मारू?

किती संवेदनाशून्य बनत चाललो आहोत आपण? माझं काम झालं नं, दुनिया गई भाड मे असं आपलं का व्हावं? आपण आपल्या समाजाचे, देशाचं काही देणं लागतो असा विचार का नाही येत आपल्या मनामधे. कायदा वाकवून केलेली कामं एका माणसाचा फायदा करून देतील, पण त्यमुळे इतर अनेकांचं नुकसान होईल हा विचार कोणी करायचा? तुम्ही मी म्हणू, की आम्ही काहीच बेकायदेशीर काम करत नाही. पण अरे दुसरा बेकायदेशीर काम करत असताना आपण त्याकडे काणाडोळा करणं चूक नाही का? कोण भांडणार आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी? माधव आपटे?

जावूदे तुम्ही आम्ही तरी काय, भावनेच्या भरात मी काहीतरी खरडणार, तुम्ही ते वाचणार आणि घरातल्या सुरक्षित वतावरणात शेपूट घालून बसणार. शेवटी माधव आपटे एक शून्यच रहाणार. एक भलं मोठं शून्य. ना आपल्यासाठी त्याची धन बाजू ना ऋण. ना त्याच्यामुळे आपली total वाढणार ना कमी होणार. कोणी झालाच माधव आपटे तर त्याच्यासाठी आपण एक सुस्कारा टाकणार आणि त्याला एक शून्य ठरवून आपापल्या कामांना लागणार.......

Tuesday, January 23, 2007

रडुबाई....

एक मुलगा होता. सगळ्याच मुलांसारखा तो एक साधासुधा मुलगा. लहान होता, तेव्हा त्याचे गोरे गोरे गाल टॉमॅटोसारखे लाल लाल होत. त्याच्या आजुबाजुची मोठी मोठी माण्से मग आपला मोठेपणा सोडून देत आणि त्याला त्याच्या गालांचे टॉमॅटो मागीत. त्याला वाटे की खरंच कोणी आपल्या गालांचे टॉमॅटो घरी नेवून आमटीत टाकले तर? ह्या विचारानेच तो घाबरा घुबरा होई आणि रडंत रडंत धुम ठोके. लहान झालेले मोठे आपापल्या कामाला लागले, की तो हळूच जावून आरशात पाही आणि गालांची लाली शाबूत असल्याची खात्री करून घेई. मगच त्याचा जीव भांड्यात पडे.

जशी सगळी लहान मुलं जातात तसा तोही शी-शू वर्गात जाई. त्याच्या बाई त्याला खूप आवडत आणि त्यांचाही तो अतिशय लाडका होता. त्याल त्या रडुबाई म्हणत आणि आपला हा हिरो बाईंनी दिलेल्या नावाला नक्की जागत असे. दुसर्‍या बाई वर्गावर आल्या की ह्याने भोकाड पसरलेच म्हणून समजा.

पण तसा हा आपला रडुबाई लबाडही होता. रोजच्या अभ्यासात पाटीवर काढायचे पाढे तो पंधरा दिवसांतून एकदाच काढत असे. पाटीवरची तारीख बदलली की झाले ह्याचे काम.

आपला हा "रडुबाई" मुळातच उत्सवप्रीय. गणपती आले म्हणजे त्याचा आनंद गगनात मावेनसा होई. दहा दिवस नुसता आनंदसोहळा असे. मग कधीतरी हा सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेई. स्टेजवर गेल्यावर त्याचे हात-पाय लटपटंत. मग हा १० मिनिटांत करायचा कार्यक्रम दोनच मिनिटांत संपवे आणि स्टेजवरून धुम ठोके.

त्याला माहित असे की आपला कार्यक्र्म चांगला नाही झाला. तरीदेखील त्यला वाटे की आपल्याला बक्षिस मिळेल. मग उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभ संपेपर्यंत तो त्याचं नाव घेतलं जण्याची वाट पाही. त्याला ते बक्षिस हवं असे, कारण त्याच्या मित्रांना कोणतं ना कोणतं बक्षिस मिळालेलं असे. त्याला वाईट वाटे, रडू येई. पण ते कुणालाही न जाणवू देता, हा कुठेतरी धुम ठोके.

थोड्या वेळानी गणपती बप्पा निघायची वेळ होई. उत्तरपूजा झाल्यावर कोणीतरी जाणता देवाला साकडं घाली की सर्वांच्या ईच्छा पूर्ण होवूदेत म्हणून. सगळीकडे गंभीर शांतता पसरून राही. आपल्या ह्या रडुबाईच्या डोळ्यात टचकन पाणी येई. मांडवाची आवराआवर तो दुरूनच पहात राही. मखरात नसलेली गणपतीची मूर्तीमात्र त्याला अस्वस्थ करून सोडी. मग तो नेहमीप्रमाणेच तिथुन धुम ठोके.

असा हा रडुबाई लहानाचा मोठा कधी झाला ते इतरांनाच काय पण त्यालासुद्धा कळलं नाही. आणि एक दिवस त्याला नोकरीसाठी परदेशी जायची वेळ आली. रडुबाईच नाही तर त्याच्या घरातली सर्वजण हरखून गेली. जाण्याचा दिवस आला. रडुबाई आता मोठा झाला असल्याने रडू शकला नही. घरातून निघता निघता आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवलं नाही. पण तरीसुद्धा तो निर्धाराने रडला नही. बाबांनी त्याला नीट रहा, एकटाच जातोयस तेव्हा काळजी घे असं सांगितलं तरीपण तो रडला नाही. बहिणीला समजावता समजावता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने ते अश्रू निर्धाराने थोपवून धरले.

परदेशी पोचल्यावर तो मात्र ओक्साबोक्शी रडला. गाल खेचणारे शेजारी, बाई, गणपती बप्पा, आई, बाबा, बहीण सगळे सगळे त्याला अजूनही आठवतात आणि तोही त्यांना आठवून मनातल्या मनातच रडतो. आता तो मोठा झालाय ना? मग तो कधीकधी आपल्या आठवणी लिहून काढतो. लिहिता लिहिता डोळे कधी भरून येतात त्याचं त्यालपण समजंत नाही. धुरकट डोळ्यांत त्याला लहानगा रडुबाई दिसू लागतो......