Wednesday, August 27, 2008

दहीहंडी

एक छोटासा मुलगा.

नखशिखान्त भिजलेला. दिवस पावसाचे आहेत, पाऊस अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून देतोय. पावसाच्या पाण्याने तर तो भिजलाच आहे, पण दोन्ही बाजूंनी अंगणात भरभरून पडणाऱ्या पाण्याने जास्त भिजलाय. कुडकुडतोय. सूर्याला झाकणारे ढग तात्पुरते बाजूला होतात, आणि अंगणात पाण्याऐवजी ऊन सांडतं. पाऊस थांबलाय पण वरच्या मजल्यांवरून पडणारं पाणीपण कमी झालंय.

अंगणात मांडी ठोकून बसलेला एखादा टग्या पटकन ओरडतो, "घरात नाही पाणी घागर उताणी रे उताणी". त्याच्या अवती भवतीने बसलेली सगळी मुलं, त्याचा कित्ता गिरवतात. तोही जोरात ओरडतो. मोठ्या मुलांच्या आरडाओरडीत त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. पण केलेल्या आवाहनाला जागून पुन्हा एकदा पाण्याचा आणि पाण्याच्या फुग्यांचा मारा सुरू होतो. पुन्हा थंडी वाजायला लागते, पण तो तसाच बसून राहतो.

त्याचं लक्ष डोक्यावर बांधलेली हंडी असते. मनातल्या मनात तो पुन्हा उजळणी करतो. ह्यावेळी आपणंच हंडी फोडायची. आपणंच पुढे व्हायचं. तो पुढे पुढे करणाऱ्यातला नाही, त्याच्यामुळे दुसरीच मुलं दर वर्षी हंडी फोडून जातात. ह्या वर्षी मात्र त्याने ठरवलंय की तोच हंडी फोडणार.

तळ मजल्यावरच्या काकू एक मोठी पाण्याची बादली घेऊन घराबाहेर येतात. त्याचं लक्ष नाहीये पण काकूंना बघितल्यावर एकदम त्याची ट्यूब पेटते. तळ मजल्यावरच्या काकू म्हणजे गरम पाणी नक्की. अंगणात बसलेली अर्ध्याहून अधिक मुलं, काकूंच्या पुढ्यात असतात आणि काकू तपेलीने गरम पाणी ओतत असतात. थंडीत कडकडल्यावर कढत पाणी अंगावर काय सही वाटतं. तोही घाईघाईने उठतो. धावत गर्दीपाशी पोचतो. मोठ्या मुलांचा राडा चाललेला असतो आणि काकूंची तपेली फारच छोटी. गरम पाणी त्याच्यापर्यंत पोचतंच नाही. समोरची मुलं शेवटी बादलीतलं उरलं सुरलं पाणी आपल्या डोक्यावर ओतून घेतात आणि रिकामी बादली काकूंच्या हवाली करतात.

पोरांपैकी कुणीतरी दुसऱ्या कुणालातरी भजन म्हणायचा आग्रह करतं. नाही हो करता करता भजन सुरू होतं

चंद्रभागेला पूर आला, पूर आला पाणी लागले वडाला
रुक्मिणी म्हणते अहो विठोबा पुंडलिक माझा बुडाला.

गाणाऱ्या मागोमाग सगळी पोरं, "बुडाला, बुडाला, बुडाला..." चा घोष करतात. त्याचं लक्ष हंडीकडेच असतं. आपण कसं पुढे व्हायचं, कसं झटक्यात चढायचं आणि कशी हंडी फोडायची, डोक्याने फोडायची का? नको मोठ्या मुलांची हंडी ते डोक्याने फोडतात. आपण लहान मुलांची हंडी नारळाने फोडायची, पण नारळ शिंकाळ्यातून बाहेरच नाही आला तर? गेल्या वर्षी झालं होतं. नारळ अडकून बसला आणि सगळे कोसळले. नाही नाही. असं होता कामा नये. तसं आपल्या हातून झालं आणि दुसऱ्या वेळी आपल्याला दिलीच नाही फोडायला तर? नाही निघाला नारळ तर सरळ डोक्याने फोडायची.

कुठूनतरी आलेला पाण्याचा फुगा खाडकन त्याच्या डोक्यावर बसला आणि तो पुन्हा जागा झाला.

आता मुलांनी गोल रिंगण केलं. एका टग्याला आत घेतलं आणि खुंटण मिरची सुरू झाली. सगळ्यांनी हात धरले. रिंगणातल्या मुलाने कडं तोडून बाहेर पळायचं असा खेळ.

"खुंटण मिरची" रिंगणातला मुलगा ओरडला.
" जाशील कैशी? " कड्यातल्या मुलांचा आवाज
" आई बोलावते" मुलगा.
" भरं करिते" कड्यातली मुलं.

मग आतल्या मुलाने मुसंडी मारून कडं तोडायचा प्रयत्न करायचा. खेळात त्याचं लक्षच नव्हतं. त्याचं लक्ष्य एकच. हंडी.

पुन्हा पाऊस सुरू झाला. मुलांच्या खेळालाही जोर चढला, फुगड्या, पाठी मारणं, किती किती, एकामागून एक खेळ खेळले गेले. मग कुणीतरी ओरडलं. चला रे, लहान मुलांची हंडी फोडून टाकूया. उशीर होईल नाहीतर दुसऱ्या हंडीला. चला चला म्हणून सगळी पोरं सरसावली. त्याची उत्कंठा अतिशय वाढली होती. कधी एकदा मी हंडी फोडतो असं त्याला झालं होतं.

त्यातल्या त्यात धिप्पाड मुलांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून गोल केला.

हा झाला खालचा थर. त्याच्यावर दोन मुलांचा अजून एक थर आणि त्यांच्या खांद्यावर मी. की फुटलीच हंडी. त्याने पुन्हा एकदा उजळणी केली.

खालचा थर तयार झाला. त्यांच्या खांद्यावर दोन मुलं चढली. ह्यावेळी कोण फोडणारे हंडी? कुणीतरी काका ओरडले. तो पटकन पुढे झाला. दोघांनी त्याला वर चढवला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता आपण हंडी फोडणार ह्या कल्पनेने त्याला जोष चढला. दुसऱ्या थरातली मुलं एकमेकाचे खांदे धरून तळातल्या थरावर उकिडवी बसली होती. त्याने सराइतासारखा एक पाय एकाच्या खांद्यावर ठेवला.

दुसरा पाय दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवायचा. एका हाताने एकाचं आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्याचं डोकं पकडून ठेवायचं. उकिडवे बसलेले ते हळूहळू उभे राहणार ते उभे राहिले की हळू हळू त्यांची डोकी सोडायची आणि सावकाश उभं राहून हंडीच शिंकाळं पकडायचं. हंडीवरचा नारळ काढायचा आणि हंडी फोडायची. एकच गिलका होईल, गुलालाने गुलाबी झालेलं, घरा घरातून जमा केलेलं दूध, दही, ताक, लोणी सगळ्यांच्या अंगावर पसरेल, हंडीला लावलेली केळी, काकड्या जमिनीवर पडतील. हंडीतली नाणी खळकन जमिनीवर पडतील, मग ती वेचायला धावपळ होईल. सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं.

दुसरा पाय उचलून तो दुसऱ्या मुलाच्या खांद्यावर ठेवणार इतक्यात दोघांपैकी एकाचा पाय घसरायला लागला. त्याच्याबरोबर खालचा थरही डळमळायला लागला आणि सगळीच पोरं घसरली. त्याला वरचेवर अलगद कुणीतरी झेलला. पोरांना चेव चढला. "गोविंदा" चा गजर झाला. पोरं बेभान होऊन नाचायला लागली. तोही. कारण आता त्याला हंडी फोडायला मिळणार होती.

नाचानाच थांबल्यावर पुन्हा पोरं एकत्र झाली. आता हंडी फोडायचीच असं एकमेकांना बजावत खालचा थर लागला. त्याच्यावर दुसऱ्या थराची दोन मुलं चढली. हंडी कोण फोडणार हा प्रश्न विचारायच्या आतच. मागच्या वर्षी ज्याने हंडी फोडली त्याला कुणीतरी वर चढवला. तो वर चढला. पाण्याचा वर्षाव सुरू झाला, फुगे अंगावर फुटायला लागले. कशालाही न बधता त्या मुलाने हंडी पकडली, आतला नारळ काढून हंडी फोडलीसुद्धा. पावसाच्या पाण्यात त्याच्या डोळ्यात उतरलेला एक अश्रू कुणालाच दिसला नाही.

पोरं पुन्हा बेभान झाली. लाल लाल दही दुधाने माखलेली पोरं जमिनीवर पडलेली हंडीतली नाणी मिळवण्यासाठी झोंबायला लागली. तोही पुढे सरसावला. एक रुपया त्यालाही मिळाला. जमिनीवर पडलेली हंडीची एक खापरी त्याने आजीसाठी उचलली. हंडीची खापरी स्वैपाकघरात ठेवली की वर्षभर दूध दुभतं भरून राहतं घरात, आजी सांगायची.

रुपया आणि खापरी खिशात ठेवून त्याने दही भाताचा प्रसाद घेतला आणि तो घरी निघाला. पायऱ्या चढता चढता त्याने मनाशी ठरवलं, पुढच्या वर्षी हंडी आपणंच फोडायची.

Monday, August 25, 2008

खो खो

हा खो खो चा खेळ एकदम आवडला. संवेद हा खेळ सुरू केल्याबद्दल धन्यवाद. खेळ आवडला अशासाठी की खेळ एकदम सोपा आहे. मागे "आपण का लिहितो?" चा खो खो सुरू झाला होता. तो जरा कठीण होता. आपण कोणत्या गोष्टी का करतो हे शोधून काढणं भलतंच कठीण आहे. त्या मानाने आपल्याला आवडलेलं चिकटवणं एकदम सोपं.

जास्वंदी खो दिल्याबद्दल थँक्स. सहसा खो खो मध्ये माझा वेळ मला कुणी कधी खो देईल ह्याची वाट बघण्यात जायचा. मी ब्लॉगीय खो खो बद्दल बोलत नाहीये. मैदानी खो खो बद्दल बोलतोय. तेव्हा ब्लॉगवर का होईना, खो मिळाल्यामुळे भरपूर धावून घ्यायचं ठरवलंय.

दोन कविता पटकन सुचल्या. पहिली भाऊसाहेब पाटणकरांची आहे. ती आवडण्याचं कारण म्हणजे विनोदी ढंगाने जाणारी ही कविता पटकन जीवनाचं, की मृत्यूचं सत्य सांगून जाते. दुसरी कुसुमाग्रजांची आहे. ही कविता बहुतेक सर्वांना माहीत असेलच, पण माझ्या आवडत्या कवितांच्या यादीत हिचा नंबर खूप वरचा आहे म्हणून चिकटवतोय.

----- X -----

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

- भाऊसाहेब पाटणकर

----- X -----

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी..,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी....

क्षणभर बसला, नंतर हसला... बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’...

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!

- कुसुमाग्रज

----- X -----

माझा खो गायत्री आणि संवादिनीला

गायत्रीला आधीच खो मिळालेला असल्याने मी माझा खो बदलत आहे. माझा खो दीपाला. तिच्या स्वतःच्या कविता खूप छान असतात. तिला आवडणाऱ्या कविता नक्कीच सुंदर असणार.