Wednesday, November 02, 2011

जळ (१)

तो दिवस सुरू तरी झाला एखाद्या अगदी अतिसामान्य, रूटीन, त्याचत्या दिवसासारखा. सकाळी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो. काम काही विशेष नव्हतंच. माझ्या पोरांना कामाला लावून मी ऑफिसात आराम करायचं ठरवलं होतं. रात्रीपासूनच पावसानं जरा जोर धरला होता. जास्तच लागला पाऊस तर सरळ ऑफिस बंद करून घरी जायचा बेत होता. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सगळं भिजलं वातावरण होतं. कौलाच्या पन्हाळ्यांचं काम राहिल्याचं तेव्हाही माझ्या डोक्यात आलं. तुटक्या पन्ह्याळ्यातून पावसाच्या पाण्याचा पुन्हा एकदा पाऊस होण्याचा खेळ चाललेला होता. एकंदरीत मुंबापुरीला सक्तीची विश्रांती देण्याचं काम पाऊस करणार असं वाटायला लागलं. 

कॉम्प्युटर सुरूच होता. बाजूला फोनही होता. पण आज त्यानंही विश्रांती घ्यायची ठरवलेली होती. चाळा म्हणून कॉम्प्युटरवर इंटरनेट सुरू केलं. फोन का निपचीत पडला होता ह्याचं कारण समजलं. फोन लाइन डेड झालेली होती. तातडीने खिशातला मोबाईल काढून पाहिला. तो अजून जिवंत होता. उगाचच जरा बरं वाटलं. फोन परत खिशात ठेवणार इतक्यात तो वाजलाच. डोक्यावरची चाळीशी नाकावर ओढून नाव पाहिलं. विद्याचं होतं. 

" बोल" मी म्हणालो.
" अहो, हॅलो, ऐकू येतंय का? " बहुतेक तिला बाहेरच्या पावसाच्या आवाजात फोनवरचं काही ऐकू येत नसावं.
" होय येतंय. बोल" मी जरा आवाज चढवूनच बोललो. बहुतेक तिच्या ते लक्षात आलं असावं.
" अहो. लवकर घरी येताय ना? मुंबई तुंबलेय सगळी. लोकल बंद आहेत, रस्ते पाण्यानं भरलेत." मी वाकून खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस पडत होता पण रस्त्यावर पाणी साठल्यासारखं वाटलं नाही.
" लोकलचं सांगू नकोस. मध्य रेल्वेवर चिमणी मुतली तरी पाणी साचतं. इथे काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. " मी उगाचच फार वेळा उगाळलेला विनोद पुन्हा उगाळला.
" अहो. तुम्ही ताबडतोब या, नाहीतर ऑफिसातच राहावं लागेल. " प्रकरण गंभीर होतं तर.
" प्रिया आली का घरी?" 
" ती गेलीच नाही कॉलेजला पाऊस आहे म्हणून. लक्ष कुठे असतं हो तुमचं? " प्रिया घरीच होती. खरंच. चला मुलगी सेफ म्हटल्यावर मला बरं वाटलं.
" बरं बरं मी बघतो. येतो. फोन करतो. " मी फोन ठेवला.

नक्कीच काहीतरी गडबड होती. मी लगबगीनं टी. व्ही लावला. बातम्यांत तेच चाललेलं होतं. ऑफिसेस सोडून दिलेली होती. मी ताबडतोब मुलांना फोन केले. ही पोरं लांब लांब राहणारी उगाच नको तिथं अडकून पडतील आणि जीवाला घोर सगळ्यांच्या. सर्व मुलं हुशार असल्याने त्यांनी कामं कधीच आटोपती घेतलेली होती. कुणाचा धाक नाहीये ह्या पोरांना असं मला तेव्हाही वाटलो. घाई घाईने सगळं आवरलं. दिवे, ए. सी. बंद केला. अजूनही रस्त्यावर पाणी साठलेलं दिसत नव्हतं. मनातल्या मनात गाडी कुठच्या रस्त्यावरनं काढावी ह्याचा विचार करीत मी ऑफिसचा दरवाजा बंद केला. खिशातनं चावी काढणार इतक्यात फोन पुन्हा वाजला. विद्याला मनातल्या मनात शिव्या देत मी फोन घेतला.

" हॅलो" मी तिरसटपणे म्हणालो.
" काका, मी बोलतेय, अभ्रा" पलीकडून वेगळाच आवाज. 
" ओह अभ्रा, बोल बोल. मला वाटलं विद्याचाच फोन आला पुन्हा. बोल, काय काम काढलंस? " खांदा आणि मान ह्याच्यात फोन पकडून बोलत असताना दुसऱ्या हातानं मी दाराला कुलूपदेखील घातलं.
" काका, कुठे आहात तुम्ही? घरी की ऑफिसात? "
" मी ऑफिस बंद करून घरीच जायला निघतोय. काय झालं? तू कुठे आहेस? "
" निघालात का तुम्ही? मग असूदे. "
" अगं पण काय झालं ते तर सांग. " स्त्री दाक्षिण्य.
" काका अहो मी पावसात अडकलेय. तुमच्या ऑफिसच्या दिशेला आहे. मेन रोडवर. तुफान पाणी साचलंय. ट्रेन बंद आहेत म्हणे. ह्या भागात माझं ओळखीचंही कुणी नाही, म्हणून फोन केला. पण तुम्ही जात असाल तर जा. मी मॅनेज करीन. " आली का पंचाईत.
" तू खूप लांब आहेस का? "
" नाही साधारण अर्धा तास लागेल. "
" बरं मी थांबतो तू ये. मग आपण दोघं घरी जाऊ. "

बंद ऑफिसाचं कुलूप मी पुन्हा उघडलं आणि आतमध्ये जाऊन बसलो. 

अभ्रा. साधारण तिशीच्या आतबाहेरचं वय असेल हिचं. मला काका म्हणते. मला विशेष आवडत नाही ते. पण वय चोरूनही पन्नाशीच्या खाली ज्याला आपलं वय सांगता येत नाही त्याला तिनं म्हणावं तरी काय? आमची भेट कुठं झाली असावी? रेल्वेच्या डब्यात. बडोद्याला ऑडिटसाठी गेलो होतो, मुंबईला परत येताना सेकंड एसीच्या डब्यात माझ्या समोर ही बसलेली. बडोदा कायमचं सोडून मुंबईला चाललेली. नोकरीसाठी. कुठल्याश्या कंपनीत सेल्स मध्ये आहे म्हणे ती. मरीन ड्राइव्हला ते सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह आहे ना तिथे राहते.

मी पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. बाहेर पाऊस पडत होता पण तरीही ऑफिसात एसीशिवाय उकडतंच होतं. मी खिडकी बंद केली आणि एसीची घरघर पुन्हा सुरू केली. डोक्यावर गार वाऱ्याचा झोत आल्यावर जरा बरं वाटलं. तर सावित्रीबाई फुले वसतिगृह. तिथे ही राहते. लग्न झालेलं आहे पण नवऱ्याशी पटत नाही. म्हणूनच बडोदा सोडलं. मूल, बाळ काही नाही. मुंबईत एकटी आहे. ओळखीचंही कुणी नाही. ट्रेनमध्ये बोलता बोलता तिनं हे सगळं सांगितलेलं. खरा मी असा अनोळखी पोरींना माझा नंबर वगैरे देणाऱ्यातला नाही. पण तिला दिला. एकटी मुलगी, अनोळखी शहर, काय गरज लागेल सांगता येत नाही.

मी खिडकीतून डोकावून पाहिलं, रस्त्यावर पाणी तुंबायला लागलेलंच होतं. लवकर इथून बाहेर पडणं गरजेचं होतं. तितक्यात फोन वाजला. विद्याचा होता. मी उचललाच नाही. मी ड्राइव्ह करताना फोन उचलत नाही, त्यामुळे मी बहुदा रस्त्यातच आहे असं ती समजणार. ट्रॅफिकची बोंब असेलच म्हणजे अजून अर्धा पाऊण तास तरी विद्याचा फोन येणार नाही, तोपर्यंत मी खरंच गाडीत असेन. मी मनाशी हिशेब केला. ही पोरगी अडकली तरी कुठे?

मी अभ्राला माझा नंबर दिला. बऱ्याच दिवसांनी तिचा फोन आला. ती कोण हे कळायलाच मला बराच वेळ लागला पण आठवलं. चांगली सेटल झाली होती. नोकरी, हॉस्टेल. काही मित्र, मैत्रिणीही झाले होते म्हणे. मैत्रिणी ठीक आहे. पण ही अशी एकटी मुलगी, नवरा सोबत नाही, मित्राबित्रांपासून जरा दूर राहिली तर बरी असं आपलं माझं मत पडलं. फोना फोनी चालूच राहिली. ऑफिसच्याकामानिमित्त तिच्या घराच्या कामाच्या बाजूला गेलो की भेटायला लागलो. तिचंही काम तसं फिरतीचं त्यामुळे अधून मधून तीही चक्करटाकायला लागली ऑफिसात. 

ही अभ्रा का आली नाही? मी घड्याळात पाहिलं. अर्धा तास होऊन गेलेला होता. खिडकीबाहेरच्या रस्त्यावर पाणी वाढायला लागलेलं होतं. तेवढ्यात इतका वेळ मला न सुचलेली गोष्ट मला सुचली. मी तिला फोन लावला. तिला बहुदा पावसाच्या आवाजात फोनचा आवाज ऐकू गेला नसावा. बरं कुठून येतेय हेही सांगितलं नव्हतं त्यामुळे तिला शोधायला बाहेर जाणंही शक्य नव्हतं. काय करावं अशा विचारात असतानाच रस्त्यावरून जवळजवळ गुडघाभर पाण्यातून चालत येताना ती मला दिसली. तिच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे फूटभर तरी नक्कीच होतं.

घरी कसं जायचं ह्याचा विचार मी करत करतंच ऑफिसाच्या बाहेर पडलो. कुलूप लावलं आणि जिना उतरायला लागलो. आमच्या बिल्डिंगच्या जिन्यातपण तळाला पाणी भरलेलं. त्या पाण्यात उतरण्याचं टाळून मी तिची वाट पाहत तसाच उभा राहिलो. पाण्याच्या लाटा आधी आत आल्या आणि पाठोपाठ ती आली. नखशिखान्त भिजलेली, पांढरी ओली कुर्ती दंडाला चिकटलेली. ओले केस आणि त्यातून पडणारा पाऊस, चाफेकळी नाक, जिवणीवरचा पाण्याचा थेंब, मोठाले डोळे, एका खांद्यावर लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या हातात कसलंतरी फुलाफुलाचं डिझाइन असलेली छत्री. 

" काका" तिनं मला हाक मारली आणि मी भानावर आलो.
" अगं अभ्रा किती वेळ लावलास, मला काळजी वाटत होती फार. तुला पाहायलाच मी खाली उतरत होतो" खोटं का? मी मनातच विचार केला.
" काका किती काळजी करता तुम्ही माझी. उगाचच मी तुम्हाला थांबवलं. "
" बरं आता थांबवू नको. कारण विद्याला जर कळलं की मी अजून इथेच आहे तर माझं काही खरं नाही. आणि माझ्यावर एक उपकार करा. तू मला रस्त्यात दिसलीस असं सांग. नाहीतर माझी चोरी पकडली जायची. "
" होय काका. " ती हसून म्हणाली. तिचे पांढरे शुभ्र दात दिसले. मोत्यांचा सरीसारखे.
" चला" 

आम्ही दोघंही पाण्यातून वाट काढत पार्किंगपर्यंत गेलो. गाडीचे टायर थोडे पाण्यात होते. पण अजून गाडीच्या तळापर्यंत पाणी पोचलेलं नव्हतं. आम्ही दोघं गाडीत बसलो. मी देवाचं नाव घेतलं आणि गाडी सुरू केली. कंपाउंडमधनं गाडी बाहेर काढली आणि दाणदिशी कसलातरी आवाज झाला मी तशीच गाडी पुढे रेटली एखाद मीटर ती पुढे गेली आणि बंद पडली. गाडी सुरू करण्याचा मी निरर्थक प्रयत्न केला पण गाडी दाद देईना. शेवटी मी विद्याला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला. विद्याचं असं मत पडलं की मी उगाच अभ्राला घेऊन पावसातनं चालत वगैरे येऊ नये. ऑफिसातच थांबावं, संध्याकाळी पाऊस उतरला की मग दोघांनी घरी यावं. मलाही ते पटलं.

- क्रमशः -

Thursday, October 27, 2011

बदाबदा वाहणारं बूच

बऱ्याच दिवसांनी ब्लॉगकडे फिरकलो. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं बरंच काही वाचून माझेही बाहू स्फुरणं पावू लागले. कॉम्प्युटर उघडला. आता असं जबरदस्त काही तरी टाइप करूया की बस्स. आय ऍम बॅक ची लै कानठळ्या बसवणारी अनाउंस्मेंट वगैरे करणारं काही बाही लिहून सुखानं झोपी जावं असा एक जबरदस्त विचार मनात येऊन गेला. पण त्यापलीकडे आणि लिहिण्यासारखं असं काहीच सुचलं नाही.

मग मी स्वतःला समजावलं की थोरा मोठ्यांना नाहीका रायटर्स ब्लॉक येतो, तसा तो मलाही आला असावं. रायटर्स ब्लॉक रायटर्स ब्लॉक म्हणजे तरी काय? मराठी लेखकाला बसलेलं बूच. म्हणजे मराठी लेखक वगैरे म्हणवणाऱ्यांना दोन दिवस परसाकडे जायची वेळ आली नाही किंवा जाऊनही झाली नाही की होते तशी होणारी अंतर्बाह्य तगमग? जाऊदे ब्लॉगर्सना अजून मराठी लेखकांच्या पंक्तीला बसवायला बऱ्याच लोकांची बरीचशी हरकत आहे. त्यात ब्लॉगर्स तसं नरम गरमंच खाणारे म्हणजे बद्धकोष्ठ व्हायची शक्यता तशी कमीच. तरीही माझं असं का व्हावं?

माझ्या आजूबाजूला प्रतिभेचा असा महापूर आलेला असताना आम्ही कोरडे पाषाण कसे काय राहिलो ह्याचा विचार करत असतानाच मला विषय झाला. बरोबर, मला विषय सुचत नाही. मला विषय होतो. वरती केवढ्या प्रसववेदना झाल्या ते वाचलंत ना, अशा बेसुमार कळा येऊन गेल्यावर एकदाचा विषय झाला. विषय झाला म्हणजे खरा प्रॉब्लेम सुरू झाला. नुसतं बाळ जन्माला घालून थोडंच भागतं, त्याचं पालनपोषण करावं लागतं. कपडे लत्ते, अगदी काही नाही तर नाही गेलाबाजार ग्रोसांच्या गणतीने नॅपीज आणावे लागतात.

ते हे बाळावरनं आठवलं. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी कुणीतरी लाडात येऊन आता लवकरच नवा पाहुणा येणार हं. वगैरे म्हणालं. तोंडदेखलं मी तोंडभर हसलो आणि हो म्हटलं. पण लगेच मनात आलं पाहुणा आला की स्वतःची बॅग घेऊन येतो, हा कसला पाहुणा? ह्याची बॅग घेऊन आम्हीच त्याच्या स्वागताला हास्पिटलात जायचं. मग त्या विनोदावर मनातल्या मनात तोंडभर हसून आणि जाहीर तोंडभर हसण्याचा कार्यक्रम तीन सेकंद आधी उरकल्यामुळे मनातल्या मनातलं हसू जाहीर न करण्याचा अट्टहास करीत असताना, खाली हात आया है खाली हात जायेगा वगैरे जबरदस्त फिलॉसॉफिकल गाणी आठवायला लागली.

माझं हे असं होतं. मी बोलत होतो झालेल्या विषयाबद्दल आणि हे खाली हात आया जाया व्हायला लागलं. अर्थात एकदम चुकीचं नाहीये ते. कारण माझ्या विषयांचं पण असंच असतं खाली हातच ते येतात आणि लिहून संपल्यावर लक्षात येतं अजून हातात काही आलंच नाही. पण हल्ली माझं असं भयंकर होतं. मन थाऱ्यावर नाही.

मन थाऱ्यावर नसण्याची अनेक कारणं आहेत. पण माझी पक्की खात्री आहे की माझ्या थाऱ्यावर नसलेल्या मनाचं कारण माझी साडेसाती आहे. परवाच कुठल्यातरी फोरमवरच्या माणसानं मेल केला होता म्हणे. तूळ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू. ते वाचल्यापासून असं चाललंय बघा. गेलाबाजार नेटवर सगळ्या साडेसात्या सर्च केल्या. आता पुढची साडेसात वर्ष आमच्यावर शनीदेवांची कृपा, सॉरी अवकृपा असणार. ते शनीवरून आठवलं. कधीही कुणी शनीदेवांचं नाव घेतलं की मला पुनीत इस्सार आठवतो. होय होय तोच. महाभारतात ज्याने दुर्योधनाचं काम केलेलं आणि महाभारतातल्या समस्त ऋषिमुनींच्या दाढ्यांना लाजवतील असे अंगावरचे केस वागवत जो बेंबीच्या देठापासून ओरडून बोलायचा तोच तो. त्याला पुढे कुणीतरी सूर्यपुत्र शनीदेव पिक्चरात शनीदेव म्हणून घेतलं होतं. त्यामुळे शनीदेव, दुर्योधन आणि पुनीत इस्सार ह्यांचं काहीतरी जबरदस्त लिंकेज माझ्या बालमनावर ठसलेलं आहे.

लिंकेज वरून आठवलं. मी आता जे काही लिहिलं त्याचा मूळ विषयाशी काही संबंध होता का? नसावा. नसला तरी जोडता येईल. मी असंच ऍब्स्ट्र्रॅक्ट लिहितो असं मी उगाचच सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही विषयाचा मी कशाशीही संबंध जोडू शकतो अगदी पुनीत इस्सारशी देखील.

जी पेंटिंग्ज मला कळत नाहीत ती मला जास्त आवडल्याचं मी मान्य करतो. एका सुंदर कन्येबरोबर आर्ट गॅलेरीत एका अगम्य, चित्रविचित्र चित्राच्या समोर उभं राहून कन्यकेला इम्प्रेस करायला म्हणून वाह क्या बात है असं मी बोलून गेलो. कन्यका जवळ येऊन म्हणाली. वा, तुला समजलं मलाही समजाव ना. तेव्हाची फजिती वगळता माझी ही स्ट्रॅटेजी चांगली यशस्वी झालेली आहे. खरंतर मराठी माणसानं क्या बात है अशी दाद द्यायची काही गरज आहे का? पण हल्ली मी पाहतो ही परवलीची दाद आहे. आणखी मराठी दादा किंवा दादी (दाद चं अनेकवचन) म्हणजे माइंड ब्लोइंग, फँटास्टिक, फँटाब्युलस वगैरे वगैरे.

तर मी म्हणत काय होतो? काय म्हणत होतो ते नक्की समजत नाहीये, पण मी ऍबस्ट्रॅक्ट लिहितो ना, त्यामुळे मला नाही समजलं तरी वाचकांना त्यातून काहीतरी समजेल. माझी पेंटिंग स्ट्रॅटेजी वापरून कुणी वाहवा करणारी कमेंट करेल. मग एकाची दोन, दोनाच्या तीन, तीनाच्या वीस. वीस कमेंट्स येतील. दहाच्या वर कमेंट्स म्हणजे ब्लॉग सुपर डुपर हीटंच म्हणायचा, पुरुष ब्लॉगरांनी तरी. असं यश उगाचच मिळत नाही. तेवढं पी आर सांभाळावं लागता. आपली वाहवा करणाऱ्याची आपणंही व्याजासकट वाहवा करायची. कावळ्याने म्हणायचं गाढवाला, अहाहा काय हा तुझा आवाज, गाढवाने म्हणायचं कावळ्याला अहाहा काय रे तुझे हे दिसणे वर तुझी काव कावही खासंच.

असो तर मला सुचलेला विषय होता. काय होता? जो होता तो होता. म्हणजे तो होताही आणि नव्हताही. किंवा होत्याचं नव्हतं करणारा होता, नव्हे नव्हत्याचं होतं करणारा होता. हा आठवलं, रायटर्स ब्लॉक. लेखकाला बसलेलं बूच.

हे रे कसलं बदाबदा वाहणारं बूच?

Tuesday, June 07, 2011

अपूर्णा

पांढरी खोली एकदम शांत पहुडलेली होती आणि मीही पांढऱ्या खाटेवर. मालक नसलेलं कुत्रं जसं येणाऱ्या जाणाऱ्याची तमा न बाळगता शेपटी हालवत बसलेलं असतं अगदी तशी.

खालच्या लाकडी फ्लोअरवर कुणाच्या टोकदार बुटांचा आवाज झाला तेवढाच. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा. कुणाचा? कुणाचाही असेना का? आपलं ते शांततेचं चाललं होतं. कुणाला बोलू नका पण खरं सांगायचं तर मला शांततेचाही आवाज येतो. सगळं शांत असताना कानात कुईं करून आवाज येतो. येतो की नाही? अपर्णाला वाटतं माझ्या कानात प्रॉब्लेम आहे. तिच्यासाठी तीन वेळा डॉक्टराकडे पैशाचा पाऊस पाडून आलो, पण तरीही येतोच. अर्थात तिला आता मी सांगितलंय की आवाज यायचा बंद झालाय म्हणून आणि तसाही आला थोडा शांततेचा आवाज तर बिघडलं कुठं. तेवढीच जरा ओक्या खोलीतली बोकी वर्दळ.

बाकी अपर्णानं काळजी करणं काही चुकीचं नाहीये. दोन वेळा शिंक आली की तिसरी यायच्या आत डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचणारी ती. ती डॉक्टरकडे जा म्हणून माझ्या मागे लागली नाही तरच नवल. वर तिला म्हटलं डॉक्टरकडे पैसे टाकणं बंद कर तर मलाच बोलेल, मला काही तिची काळजीच नाही म्हणून. काळजी नाही कशी? आहे म्हणजे आहेच, पण आठवड्यातून दोनदा ती डॉक्टरकडे गेली तर अजूनच काळजी वाटणार की नाही? त्यात त्या डॉक्टरचं काही खरं नाही. उंचापुरा, नाकी, डोळी नीटस. त्याला काय अपर्णासारखी देखणी पेशंट नक्कीच आवडत असणार. मग तोही देत असेल थातुर मातुर औषध म्हणजे हिचं आपलं तिथे जाणं चालूच.

जाऊदे. मी सांगितलं तर तिला समजायचं नाही. पण एकंदरीत डॉक्टरांची जमात तशी लबाडंच. तो कानाचा डॉक्टरही तसाच. अरे हो कानावरून आठवलं. ते कानातलं सोनाराकडून आणायचं राहिलंय. पॉलिश करायला दिलंय अपर्णानं. आज आणायचं होतं की उद्या? बहुतेक आजच. आता माझी काही खैर नाही. ह्या बायकांचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे बघा, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं ही सगळी कसली लक्षणं आहेत? बैलाच्या नाकातून वेसण घालतात, त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी. गुलामगिरीची प्रतीक आहेत हे दागिने वगैरे. अपर्णासारख्या पुरोगामी बाईलाही ती आवडावीत म्हणजे कमाल आहे.

पण काय करा बाबांनो, पुरुषाचा नवरा झाला की त्याचा वेसण न घातलेला बैल होतो. मग तो आपल्याच शिंगानं आपली पाठ खाजवायचा प्रयत्न करीत राहतो. शिंग पाठीला लागत नाही, खाज काही जात नाही. मग काय करेल, फिरत राहतो बिचारा गोल गोल गोल गोल खळात. आणि बायको? बायको नवऱ्याची मजा तेवढी बघत राहते. आणि वर धान्य मळून घेते ते वेगळंच.

हो हल्ली धान्याच्या दारूवर लक्ष केंद्रित करणारेत म्हणे. कालच पेपरात वाचलं. करा लेको, धान्याची दारू करा, ऊसाची दारू करा, अजून कसली करा. ती दारू पिऊन लोकं होऊदेत दारुडे. बरं, दारुड्या लोकांची गरज सर्वात जास्त कुणाला असते सांगा? म्हणजे तुम्हाला, मला, त्यांच्या घरच्यांना, कुणाला? नाही ना ओळखलंत. अहो व्यसनमुक्ती केंद्रांना. दारुडेच नसतील तर व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांनी करायचं काय? बरं प्रश्न नुसता त्यांनी करायचं काय हा नाही. प्रश्न आपण दारुड्यांवर केलेल्या उपकाराने स्वतःच फुलून जाऊन स्वतःची कॉलर ताठ करण्याचा आहे. तरी मी अपर्णाला सांगत असतो. कॉलरवाले खादीचे पंजाबी ड्रेस घालत जा म्हणून.

कॉलरवले पंजाबी ड्रेस? नवी फॅशन आहे की काय आज कालची ही. अपर्णाला विचारून पाहिलं पाहिजे. खादीच्या फॅशन्स तिला चांगल्या माहीत असतात. खादीचे सदरे, खादीचे लेंगे, खादीच्या टोप्या. परवा असंच झालं, काहीतरी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी वगैरे. म्हणून म्हणे खादी घालावी. म्हटलं हे लेंगे सदरे वगैरे ठीक आहेत, पण खादीची अंतर्वस्त्र कुठे मिळतात? मिळतात का? नाहीच मिळत. मग हे खादीवाले घालतात काय आत? घालतात की घालतंच नाहीत? त्यावर उत्तर नव्हतं तिच्याकडे. म्हटलं कसलीही घाल, काढणार तर मीच आहे ना.

कसलं कसलं रोमँटिक बोलून गेलो मी. पण अपर्णाचं दुसरंच. रागावली. फुरंगटून बसली. फुरंगटून. जबरी शब्द आहे. हगल्या पादल्या फुरंगटून बसायला अपर्णाला आवडतं. आवडतं म्हणजे तिचा छंदच आहे तो. तिला म्हटलं डॉक्टरकडे जाणं कमी कर, लोकं काही बाही बोलतात बसली फुरंगटून. घराकडे लक्ष दे, लोकांची व्यसनं मग सोडव, बसली फुरंगटून. आता घरी आली आणि तिची 'नाकातली वेसण', आपलं ते हे, 'कानातलं कानातलं' मी आणलेलं नाही हे लक्षात आलं की बसेल फुरंगटून. कानातलं कानातलं? काहीतरी चुकल्यासारखं नाही का वाटत?

असूदे. चुका काय माणसाच्या होतंच असतात. चुका माणसांच्या होतात, चुका बायकांच्या होतात. नको त्या वेळी नको ती चूक झाली की त्यातून अजून माणसं आणि बाया तयार होतात. तयार झालेल्या हा माणसांच्या आणि बायांच्या अजून चुका. चुकांवर चुका. चुकांवर चुका. उंच चुका, बुटक्या चुका, गोऱ्या चुका, काळ्या चुका. जाड चुका बारीक चुका. अपर्णाला कानी कपाळी ओरडून सांगितलं अचूक काहीच नसतं ग या जगात. असतात त्या फक्त चुकाच. नाही पटलं. दारुड्यांची चुकलेली आयुष्य सुधारणं जास्त महत्त्वाचं आहे का?

अजून कशी आली नाही ही? गेली की काय त्या सोनाराकडे कानातलं आणायला? कानातलं? वेसण, बैल. खाज. होय खाज, मग शिंगं, माझी. खाज माझी, पाठही माझीच. सोनाराकडे नसेल. गेली असेल त्या डॉक्टराकडे. उंचा, पुरा, नाकी डोळी नीटस. खादीचा कॉलर नसलेला सदरा, खादीचा लेंगा आणि खादीची. पण ती तर मी उतरवणार. डॉक्टर तुला सोडणार नाही मी. परवा माझ्या कानात मळ काढायच्या बहाण्याने सुरा खुपलास आणि माझ्या कानाचा पडदा फाडलास हरामखोरा. आता कसा ऐकणार मी शांततेचा आवाज?

खालच्या लाकडी फ्लोअरवर पुन्हा कुणाच्यातरी टोकदार बुटांचा आवाज. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा, खादीचा कुर्ता, खादीचा लेंगा, सोन्याचे कानातले, नसलेली कॉलर. कोण ही?