Monday, August 25, 2008

खो खो

हा खो खो चा खेळ एकदम आवडला. संवेद हा खेळ सुरू केल्याबद्दल धन्यवाद. खेळ आवडला अशासाठी की खेळ एकदम सोपा आहे. मागे "आपण का लिहितो?" चा खो खो सुरू झाला होता. तो जरा कठीण होता. आपण कोणत्या गोष्टी का करतो हे शोधून काढणं भलतंच कठीण आहे. त्या मानाने आपल्याला आवडलेलं चिकटवणं एकदम सोपं.

जास्वंदी खो दिल्याबद्दल थँक्स. सहसा खो खो मध्ये माझा वेळ मला कुणी कधी खो देईल ह्याची वाट बघण्यात जायचा. मी ब्लॉगीय खो खो बद्दल बोलत नाहीये. मैदानी खो खो बद्दल बोलतोय. तेव्हा ब्लॉगवर का होईना, खो मिळाल्यामुळे भरपूर धावून घ्यायचं ठरवलंय.

दोन कविता पटकन सुचल्या. पहिली भाऊसाहेब पाटणकरांची आहे. ती आवडण्याचं कारण म्हणजे विनोदी ढंगाने जाणारी ही कविता पटकन जीवनाचं, की मृत्यूचं सत्य सांगून जाते. दुसरी कुसुमाग्रजांची आहे. ही कविता बहुतेक सर्वांना माहीत असेलच, पण माझ्या आवडत्या कवितांच्या यादीत हिचा नंबर खूप वरचा आहे म्हणून चिकटवतोय.

----- X -----

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

- भाऊसाहेब पाटणकर

----- X -----

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी..,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी....

क्षणभर बसला, नंतर हसला... बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’...

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!

- कुसुमाग्रज

----- X -----

माझा खो गायत्री आणि संवादिनीला

गायत्रीला आधीच खो मिळालेला असल्याने मी माझा खो बदलत आहे. माझा खो दीपाला. तिच्या स्वतःच्या कविता खूप छान असतात. तिला आवडणाऱ्या कविता नक्कीच सुंदर असणार.

9 comments:

a Sane man said...

sahiyet!!!

आश्लेषा said...

"मृत्यू " अप्रतिम!!!

Sumedha said...

गायत्रीला आधीच खो दिलेला आहे, तू दुसर्‍या कोणाला तरी दे न, अजून दोन वेगळ्या कविता वाचायला मिळतील!

Anand Sarolkar said...

Mastach ahet kavita!

"Kana" majhi pan favourite ahe. Ekdum manala bhidte hi kavita.

ulhas Gadre said...

good

Samved said...

मस्त रे..कणा म्हणजे सुंदरच

Samved said...

मागे "आपण का लिहितो?" चा खो खो सुरू झाला होता. तो जरा कठीण होता. आपण कोणत्या गोष्टी का करतो हे शोधून काढणं भलतंच कठीण आहे. ...

ही ही ही....त्रासदायक आनंद..

आणि दीपा, जे कोण, ब्लॉग गुप्त आहे रे :(

ओहित म्हणे said...

deadly poem of dead man! [:)]

Priya said...

donhi kavita chhaan! 'kaNaa' tar khaas aawaDatee, agadee shaaLepaasun!