Saturday, February 24, 2007

Formality नावाची Abnormality......

Formality चा त्रास तुम्ही कधी अनुभवलाय का? मला हल्ली फार जाणवायला लागलंय की सगळं अधिकाधिक Formal होत चाललंय. मॆत्री Formal, भांडण तेसुद्धा Formal, हसणं formal, रुसणंसुद्धा formal. कशामुळे होतंय हे?

परवा एकाला आणि त्यच्या बायकोला जेवायला बोलावलं. का? सहवासाने आनंद मिळतो म्हणून? नाही. चक्क formality म्हणून. त्यांनी आधी आम्हाला बोलावलं होतं, मग आम्हीपण त्यांना बोलावलं पहिजे ही expectation असते म्हणून. खरंतर असं चार चॊघात सांगणं हे निलाजरेपणाचं ठरेल. पण करावं तरी काय? बरं तर बरं इस हमाममें तो सभी नंगे हॆ. कोणाला कोणाची लाज वाटणार?

मला तर ह्या प्रकरणाचा विलक्षण उबग आलेला आहे. ह्यांनी असं केलं, आणि त्यांनी तसं केलं, मग आम्हीपण काहीतरी केलं पाहिजे हे pressure. कशासाठी? एखादी गोष्ट केवळ मनाला भावली म्हणून नाही का करता येणार? एखादी व्यक्ती मनापासून नाही आवडली तर त्या व्यक्तीला दूर नाही का सारता येणार? म्हणजे त्या व्यक्तीचा काही दोष आहे असं नव्हे, पण सूरच जुळला नाही तर गाणं कुठलं जन्मायला? नुसती बेसुरांची भाऊगर्दी.

कदाचित ह्यामागे insecurity ची भावना असेल. जेवढे लोकं, कृत्रिमरित्या का होईना, पण आपल्या आजूबाजूला बांधून ठेवता येतील तितके ठेवायचे. कधी गरज लागेल सांगता येत नाही. कदाचित हा स्वार्थ formality मागे असेल.

माणसाने फुलपाखरासारखं का जगू नये? आवडेल त्या फुलावर बसावं, नावडेल ते फूल सोडून द्यावं. फुलपाखरू पण नावडत्या फुलाचं मन राखंत असेल का? formality म्हणून? उद्या आवडतं फूल नाहिसं झालं तर काय घ्या? म्हणून?

आपण सगळेच business like होवू लागलोय. सगळ्याचा business केलाय आपण. मागच्या आठवड्यात अमुकने मला फोन केला, म्हणून ह्या आठवड्यात मी त्याला केला पहिजे. तमुकचे एवढे मित्र, मग माझेपण हवेत. मग मी मित्र जमवायचा धंदा सुरू करायचा. तसं झाली की मॆत्री गेली बाजूला, formality तेवढी शिल्लक. मग नको ते प्रश्न सतावायला लागतात. अमुकने घरी पार्टी केली, तमुकला बोलावलं, पण मला नाही बोलावलं, अशी रिकामटेकडी भुतं मानगुटीवर येवून बसतात. आपण मॆत्रीचा business तर करून टाकला नाहिये ना?

काय साधतोय आपण ह्या business मधून? कोणता profit मिळवतोय? अधिकाधिक लोकांशी आपलं जमतं किंवा अधिकाधिक लोकं मला मित्र मानातात हे बेगडी समाधान? का उद्या गरज लागली तर दहा लोकं मदतीला धावतील हे untested assumption? कशाला हवंय हे सगळं?

प्रत्येकाने स्वतंत्रपणे का फुलू नये? बाजूचं फूल कसं फुलतंय यावर आपलं फुलणं अवलंबून असावं का? Comparison किंवा Competition आली की मग formality हळूच मागच्या दारानं प्रवेश करते, दूध प्यायला खिडकीतून चोरून घुसणार्‍या मांजरीसारखी. ती नुसताच आपला आनंद हिरावत नाही, तर आपल्याभोवती एक अभेद्य कवच निर्माण करते. समोरचा माणूस त्या कवचापशीच येवून थांबतो. त्याचं माणूसपण जाणवतंच नाही. जाणवत रहातात त्या अतिशय निरुपयोगी वरवरच्या गोष्टी.

आणि मग होतात माणसांची बेटं. बाह्यरंगी सुंदर, आकर्षक पण दुर्गम. त्या बेटांमधले दुवेच नाहिसे झालेले असतात. मधे फक्त उरतो formality चा अथांग सागर. आज त्यानं आपली बेटं केलीत. उद्या तो ही बेटंही पुरती बुडवणार हे निश्चित.

वाटतं "जागते रहो" मधल्या मोतिलाल सारखं धुंद होवून एकदा तरी म्हणावं,

दिलने हमसे जो कहा
हमने वॆसा ही किया

फिर कभी फुरसतसे सोचेंगे
बुरा था या भला

जिंदगी ख्वाब हॆ
ख्वाब में झूठ क्या, ऒर भला सच हॆ क्या?

सब सच हॆ......

Saturday, February 17, 2007

प्रेमाला उपमा नाही...

आज V-day. V-day म्हणून आज मुद्दाम लिहायला बसलोय. पण काहीच सुचत नाहीये. बघा ना, प्रेमासारखी विश्वव्यापी गोष्ट आहे. किती लिहिण्यासारखं आहे त्यावर? कितीही. पण परत विचार केल्यावर असं वाटतं की प्रेम म्हणजे "तुमचं आमचं एकदम Same" असतं की. मग मी माझे "प्रेम"ळ अनुभव तुम्हाला सांगण्यात तरी काय अर्थ आहे?

मुळात प्रेम म्हणजे काय असतं तरी काय? प्रेम म्हणजे कदाचित एखादा बासरीचा सूर असेल. अगदी "Call of the Valley" मधून उच्लून आणलेला. कानाला गोड भासणारा, मनाला हळुवार बनवणारा. इतर वाद्यवृंदातलाच असणारा पण तरीदेखील आपलं वेगळेपण जाणवून देणारा.

की असेल प्रेम म्हणजे पाण्यात भिजवलेलं पीठ. जे अश्वत्थाम्याला त्याच्या आईने दूध म्हणून दिलं होतं? दिसतं तसं नसतं च्या सदरात मोडणारं.

किंवा असेल प्रेम म्हणजे एक खुर्ची. सत्तेची, अधिकाराची. आपला विचार लोकाम्वर लादायला वापरायची. दुसर्‍याच्या सुखाच्या नावाखाली, त्याला टोपी घालून आपली पोळी भाजून घेण्यासाठीची.

कदाचित प्रेम असेल एखादी भिकारीण, एखाद्या कळकट, मळकट रस्त्याशेजारच्या गटारात पाय पसरून बसलेली. जिच्या कनवटीला असेल शिळ्या भाकरीचा अर्धा तुकडा आणि पोटात भुकेचा आगडोंब. असतील जिच्या झोपडीत वाट पहाणारी भुकेली मुलं.

की प्रेम म्हणजे असेल एखादी मादक तरुणी? नाहीतरी म्हणतातच ना की प्रेम विचारशून्य असतं म्हणून. विचारशून्य असतं हे मान्य. पण विकारशून्य असतं का? सांगता येत नाही...

किंवा असेल प्रेम म्हणजे एखादा सॆनिक. मनात एकच लक्ष्य ठेवून समोरच्या शत्रूला सामोरा जाणारा. गोळ्या छातीवर घेत मृत्यूला कवटाळणारा.

की असेल प्रेम म्हणजे अफूची गोळी? घेतली एकदा की सर्व दुःख दडपणारी. मनाला मूर्ख बनवत सर्व दुःखांच्या संवेदना कमी करणारी. थोड्या वेळा करता.

प्रेम कशात नाही सांगा? रामात प्रेम आहे, कामात प्रेम आहे. किड्यात प्रेम आहे, विड्यात प्रेम आहे. Phone प्रेम आहे, engaged tone सुद्धा प्रेम आहे. गुलाबी पाकिट प्रेम आहे, सिनेमाचं तिकिट प्रेम आहे. पाण्याबाहेरचा मासा म्हणजे प्रेम आहे, द्युतातला फासा म्हणजे प्रेम आहे. कुणाला पाणी म्हणजे प्रेम आहे, कुणाला नाणी म्हणजे प्रेम आहे. कधी मी म्हणजे प्रेम, कधी ती म्हणजे प्रेम. तुम्ही म्हणजेसुद्धा प्रेम आणि आम्ही म्हणजेसुद्धा प्रेम. प्रेम म्हणजे फक्त प्रेम. Absolute प्रेम. तुमचं आणि आमचं सेम सेम...

प्रेमाला उपमा नाही हेच खरं.......

Saturday, February 10, 2007

आम्ही वेडे

जगतो असे मदमस्त आम्ही, नाही कधी जगला कुणी
म्हणती वेडे, खुळे आणिक म्हणती वेडे पीर कुणी

कोणी कोणा सांगायचे, कोण शहाणे अन कोण वेडे,
शहाणे वेड्यांस दिसती, जसे दिसती शहाण्यांस वेडे

Thursday, February 01, 2007

एक होता राजा.......

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आणि तुम्हा आम्हा सर्वांनाच आपण राजे असल्याची आठवण झाली. फक्त आपल्यालाच नाही तर आपली कधीही आठवण न ठेवणार्‍या लोकप्रतिनिधींना आणि राजकीय पक्षांनादेखील आपली आठवण झाली, आपण मतदार राजे असल्याची.

ह्या निवडणुकांची पार्श्वभूमीच तशी निराळी पण खास आहे. शिवसेना ह्या एकमेव पक्षाने गेली कित्येक वर्ष मुंबईवर अनभिषिक्त राज्य केलं. पण हाच पक्ष आता खिळखिळा होत चाललेला आहे. सर्वप्रथम नारायण राणे आणि मग राज ठाकरे ह्यांनी शिवसेना सोडली आणि ह्या वाघाचं मांजर झालं की काय? अशी शंका येवू लागलेय. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधे मिळालेल्या अनपेक्षित यशाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची मांजरं वाघाचा आव आणंत आहेत. तिसर्‍या आघाडीचं खूळही यंदा आहेच. राज ठाकरेपण ह्या निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार ह्यात वादंच नाही.

आता ह्या सर्व प्रकरणात आपली भूमिका सर्वात महत्वाची आहे, कारण आपण इथले राजे (?) आहोत. वर म्हंटल्याप्रमाणे आपल्यासमोर बरेच पर्याय आहेत. शिवसेना आणि त्यांच्या केसात खोवलेलं भाजप चं कमळ. वाघासारखी इतरांवर आणि एकमेकांवर गुरगुरणारी कॉंग्रेसची मांजरं, जिच्याबद्धल काहीच कल्पना नाही अशी मनसे, आणि बेडकीसारखी फुगून बॆल होवू पहणारी तिसरी आघाडी. वर थंडोबा आणि बंडोबा ह्यांनी मिळून झालेले, आणि कोणताही पक्षीय भेदाभेद (मुख्यतः सत्तेत सहभागी होताना) न पाळणारे अपक्षही आहेत. आता इतक्या सगळ्या पर्यायांतून म्या पामराने एकाला निवडावं तरी कसं?

शिवसेनेला मुंबईने आतापर्यंत न चुकता साथ दिली होती. आतापर्यंत म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने शिवसेनेला धोभीपछाड घातली. यंदा मुंबई काय करणार? सांगता येत नाही. शिवसेना म्हणते की आम्ही Fly Overs केले. आम्ही म्हणतो चांगलं केलत. Express Way केला. आम्ही म्हंटलं चांगलं केलत. पण लेकांनो त्याचं Credit मागच्या निवडणुकांच्यावेळी घेतलत ना? मग पुन्हा पुन्हा तेच काय सांगता? एक काम करायचं आणि पुढच्या दहा लोकसभा निवडणुकांत, पंधरा विधानसभा निवडणुकीत आणि वीस महापालिका निवडणुकीत तेच टुमणं वाजवायचं? खरं तर शिवसेनेने आम्हाला संभ्रमातच पाडलं आहे. आम्हाला हा आमचा वाटणारा हा पक्ष. पण त्याने आम्हाला Identity Crisis मधेच टाकलं आहे. आता आम्हाला समजंतच नाही की आम्ही नक्की मराठी, मुंबईकर का हिंदू? मी मराठी म्हणत आम्ही वाढलो, गर्व से कहओ हम हिंदू हॆ म्हणत मोठे झालो, आणि आता मी मुंबईकर म्हणून आम्हाला सर्वसमावेशक करता? हा विषय खरंतर महापलिका निवडणुकांसाठी गॆरलागू आहे. ते सोडा, आपण आता सत्ताधार्‍यांनी काय कामं केली ते पाहू.

उद्धव ठाकरे काही आठवड्यांपूर्वी म्हणत होते की आम्ही ऎंशी टक्के वचननामा पूर्ण केला. परवाच्या सभेत म्हणाले पंच्याहत्तर टक्के पूर्ण केला. काय चाललय काय? काही दिवसांमध्ये तुम्ही दिलेली वचनं वाढली की तुम्ही केलेली कामं कमी झाली. ह्या वेगाने दोन फ़ेब्रूआरीला तुम्ही म्हणाल आम्ही काहीच केलं नाही पाच वर्षात. आणि जर तुम्ही आम्हाला शंभर टक्के वचनं दिलीत तर त्यातली ऎंशी टक्केच पूर्ण झाली हे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटंत? का एवढं तरी काम केलंत म्हणजे आभाळाला हात टेकले तुमचे?एक अख्खं वर्ष काय झोपा काढल्या का तुमच्या नगरसेवकांनी? बरं तुम्ही सांगत सुटलाय की आम्ही पंच्याण्णव पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्यात. आम्हीच मुंबईत येणारे लोंढे थोपवू शकलो असतो. आम्ही सहमत आहोत. उत्तरभारतीय आणि इतर झोपडपट्टीवासी ह्यांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही पंच्याण्णव पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या नसत्यात आणि फुकट घरांची योजना जाहीर केली नसतीत, तर त्यांनंतर मुंबईत दुपटीने येणारे लोंढे थांबले नसते का?

बरं, शिवसेनेवर आम्ही नाराज मग आम्ही इतर पर्यायांचा विचार करायला लागलो. कॉंग्रेस हा जरी मोठा पक्ष असला तरी आमच्या दृष्टीने Next Best पर्याय म्हणजे म.न.से. राज ठाकरे ह्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडली आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून नवा पक्ष काढला त्याने आम्ही प्रभावित झालो. महराष्ट्राला तारणहार मिळाला असं आम्हाला वाटलं. त्यांनी सुरूवातही छान केली. सर्वांना बरोबर घेवून जायची तयारी दाखवली. त्यांचा सर्वधर्मसमभावसुद्धा आम्हाला भावला. पण सध्या बघावं तर त्यांचा One Word Agenda चालू आहे. शिवसेना. बाळासाहेबांच्या विरुद्ध म्हणे हे काही बोलणार नाहीत पण शिवसेने विरुद्ध बोलणार. बरं आम्हाला आणखी एक गोष्ट समजत नाही, ती म्हणजे आम्ही आमचं मत म.न.से. ल का द्यावं? काय केलंय त्यांनी अद्याप? गेलं वर्षभर वाट बघतोय, पण काही काम चाललंय असं दिसत तरी नाही. त्यमूळे त्यांना मत दिलं तर ते फुकटच जाण्याची शक्यता अधिक, त्यमुळे आमचं मत त्यांनाही जाणार नाही.

रहाता र्‍हायल्या दोन कॉंग्रेस आणि तिसरी आघाडी. कॉंग्रेस म्हणे महाराष्ट्रात मजबूत झालेय. नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आल्यापासून तर प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा ह्यांना, निवडणुका म्हणजे कुस्तीचा फड असून नारायण राणे नामक हिंदकेसरी पॆलवान आपल्या गटात आल्यासारखं वाटतय. विधानसभा पोटनिवडणुकांतला विजयही त्यांना भलताच चढलाय. पण मुंबईत नारायण राण्यांची मात्रा चालणं तसं अवघडंच आहे. वर गेल्या नऊ वर्षात त्यांच्या सरकारने काय दिवे लावलेत तेही आम्ही पहातोच आहोत. झोपडपट्ट्या बनतच आहेत आणि हे दोन हजार पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करायला निघालेत. ही युक्ती चांगली आहे. २००५ मध्ये २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करायच्या. २०१० मध्ये २००५ पर्यंतच्या आणि असंच पुढे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत वाढणार्‍या झोपडपट्ट्यांची मतं कॉंग्रेसलाच नाही का? आता झोपड्याच नाहीत तर अनधिकृत बांधकामंही अधिकृत करायला निघालेत हे. SEZ चा वाद आहेच. त्यात बरेचसे मंत्री मंत्र्यालयात बसून काम करण्याऎवजी उकीरडा फुंकण्यातच धन्यता मनतात. कुणी पोटनिवडणुकांची जबाबदारी घेतय तर कूणी आणखी कशाची. कामाची जबाबदारी कोण घेणार? हे शिवसेनेला सांगतायत की काम दाखवा आणि मतं मिळवा. मग तुम्ही काय दाखवून मतं मागणार? आणि तुम्ही दाखवलंतही तरी भलतं सलतं बघायला लोकांना वेळतरी आहे का? त्यामुळे आमचं मत तुम्हाला तर नाहीच नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस्बद्धल काय बोलावे? त्यांची काही ताकत मुंबईत आहे असं तर आम्हाल अजिबात वाटत नाही. आम्ही बारामतीचे रहाणारेही नाही त्यमुळे राष्ट्रवादीने काय काय विकासकामं केली ते आम्हाला माहीतही नाही. बरं ह्याच्या भाषाणांतही कुठे मुंबईचा उल्लेख येत नाही. आबा पाटील म्हणतात की स्वच्छ उमेदवाराला निवडून द्या. स्वतः मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देतात. आता काय म्हणायचं ह्याला? शरद पवार म्हणतात ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही ते मुंबई काय सांभाळणार? खुद शीशेके घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर नही फेका करते पवार साहब. जरा पुण्यात जावून बघा. धाकले पवार दादा आणि थोरले आबा ह्यांच्यात कलगी तुर्‍याचा सामना रंगलाय.

आता उरली, बलानुक्रमे सहावी असणारी तिसरी आघाडी. प्रामुख्याने दलित आणि मुसलमान ह्यांची मतं विभागण्यासाठी बनवलेली. स्वतःच्या हिमतीवर काही करण्याची कुवत नाही आणि दुसरा काही करत असेल तर त्याला ते करू द्यायचं नाही ही ह्यांची विचारसरणी. तसं आम्ही जतिभेद वगॆरे मानत नाही. प्ण सखेद असं म्हणावं लागतं की आम्ही ना मुसलमान ना दलित, त्यामुळे आमच्याकडे तिसरी आघाडी मत मागणारही नाही, त्यमुळे मत देण्याचा प्रश्नच नाही. आणि असतो जरी आम्ही दलित किंव मुस्लिम, तरी अबू आझमी आणि आठवलेंना मत देण्याइतके मूर्ख तर नक्कीच नाही.

सुरवातीला निवडणुका आल्याने आपण राजे असल्याची आठवण होवून मला हर्षवायू झाल्याचं आपण वाचलंतच. पण आता सर्वच पर्यायांचा फडशा पडला आहे आणि आमच्यासमोर शेवटचा पर्याय राहिला आहे. तो म्हणजे आमचं मत बाद करण्याचा. तुम्ही आमच्याशी सहमत असाल तर तुम्हीही आपलं मत बाद करू शकता. निवडणूक आयोगानं तशी सोयच केली आहे यंदा.

पण मला सांगा असं मत कोणालाच न देवून कसं चालेल? खरंतर आम्हाला हे मानवत नाही पण आमच्यासमोर दुसरा पर्यायच नाही. आम्ही करायचं तरी काय? टीका करणारे लेख लिहायचे की स्वतः पुढे होवून काहीतरी करायचा प्रयत्न करायचा बदल घडवण्यासाठी? आमच्याप्रमाणेच तुम्हालाही आजच्या राजकारण्यांबद्धल घृणा वाटत असेल. तुम्हीही आमच्याप्रमाणे आजच्या राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वहात असाल. पण आपण राजकारण्यांना शिव्या देवून त्यांना काय ओव्या ऎकू येणारेत का? आम्ही घरात आमची खुर्ची गरम करून कागदावर कितीही गरम झालो तरी त्याचा कोणावर काय परिणाम होणार आहे? अयोग्य लोकं राजकारणात आहेत असं आम्ही सतत म्हणंत रहायचं पण योग्य लोकं कोण ते मात्र सांगायचं नाही. आमच्याप्रमाणेच तुम्हालाही वाटत असेल की राजकारणात चांगल्या लोकांनी असणं गरजेचं आहे. ही गरज आपल्या सर्वांनाच दिसते मग आपणच त्याबाबत काही करू नये? का शेजार्‍यांच्या घरात कधीतरी शिवाजी जन्माला येईल म्हणून आपण वाट बघत बसायचं. आपणच ठरवायला हवं आपण खरोखरंच राजे होवू शकतो का?